मुख्य सामग्रीवर वगळा

खांदा

सुमारे बावन्न वर्षांपूर्वी तो एका सकाळी कॉलेजमधे लेक्चर घेत होता. नोकरी करता करता सीएस व आयसीडब्लूए पण करत होता. डोळ्यात स्वप्नं होती, खांद्यावर जबाबदारी होती. वर्ग चालू असतानाच शिपाई आत आला व त्यानं त्याला फोन आल्याचे सांगितले. तो त्याच फोनची वाट बघत होता. पलीकडून त्याला अपेक्षित बातमी मिळाली. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. कसंबसं लेक्चर संपवून त्यानं सासुरवाडीची वाट धरली. काही तासापूर्वी जन्माला आलेल्या त्या बाळाला त्यानं हातात घेतलं. त्या गोड गाठोड्यानं त्याच्या खांद्यावर पडलेल्या आणखी एका जबाबदारीची जाणीव त्याला करून दिली. पण त्याची त्याला फिकीर नव्हती. 

व्यावसायिक परीक्षा पास होऊन तो कॉर्पोरेट क्षेत्रात घुसला. तिथे प्रगती करता करता त्याच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या दर दिवशी वाढत गेल्या. घरच्या आघाडीवरही म्हातारे आईवडील, बायको व दोन मुलं अशी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होतीच. 

ह्या सगळ्या गडबडीत तो आमच्यापासून थोडा लांब गेला. आम्हा भावंडांचं भावविश्व हे आई आणि आजीआजोबांभोवतीच फिरत राहिलं. त्याच्या खांद्यावर बसून फिरणं किंवा थोडं मोठेपणी त्याच्या खांद्यावर मित्रत्वाचा हात टाकणं राहूनच गेलं. 

अचानक तो परत सापडला ते मी स्वतः सीए करायला लागल्यानंतर. त्याचे आणि माझे विषय आता सेम होते. त्यामुळे त्यावर काही चर्चा होऊ लागल्या. त्यातून एक नवाच 'तो' कळायला लागला. अभिमानाने आमचे खांदे रुंदावले, तर आमच्या कर्तुकी ऐकून कौतुकाने त्याचे खांदे रुंदावले. पुढे मी नोकरीचा सेफ मार्ग न पत्करता स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरवले. त्याने खांद्यावर थोपटून फक्त प्रोत्साहन दिले. 

आम्ही दोघे मोठे होत गेलो. खांद्याला खांदा लावून काम करत होतो. त्याच्या खांद्यावरच्या बहुतेक जबाबदाऱ्या आता आम्ही उचलल्या होत्या. एके दिवशी पुन्हा दोन नातवांनी त्याच्या आयुष्यात धमाल उडवून दिली. त्या दोघांना दोन खांद्यांवर बसवून फिरवून आणताना, त्यानं आमच्यावेळी राहून गेल्याची कसर भरून काढली. ह्या सगळ्या काळात त्यानं त्याची वैयक्तिक जबाबदारी कधीही आमच्या खांद्यावर टाकली नाही. आत्ता आत्ता पर्यंत तो काम करत राहिला. त्याच्या दोन्ही खांद्यांवरचं त्याचं डोकं शेवटपर्यंत शाबूत होतं.

बरोब्बर एक महिन्यापूर्वी अखेर आम्ही त्याला खांदा दिला... 

एकदाच.... 

शेवटचा....  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस