मुख्य सामग्रीवर वगळा

सत्य, विपर्यास की दिशाभूल...???

मला पर्सनली ओळखणाऱ्या लोकांना माझ्या वाचनाच्या छंदाची पुरेपूर कल्पना आहे. हातात सापडेल ते पुस्तक वाचून काढणे यासारखा अत्यानंद नाही. त्यामुळे विविध विषयांवरची पुस्तके, तीही छापील, मी वाचत असतो. अशाच वाचनयात्रेत मध्यंतरी हातात पडले एक अनोखे पुस्तक. लेखकाचे नाव पहिल्यांदा ऐकले. विषय माहितीचा पण, पुस्तकाचे नाव जरा वेगळे, थोडेसे आव्हानात्मक असे. काय करावे? बघूया तरी काय लिहिलंय, असा विचार करून मी पुस्तक हातात घेतले. गेले सुमारे पंधरा दिवस मी वेळ मिळेल तसा पुस्तक वाचत गेलो. जसजसा पुढे जात होतो तसतसा 'भंजाळत' गेलो. पुस्तक वाचून संपल्यावर तर जी काय माझी या विषयाबद्दलची कल्पना होती, ती बदलून एक वेगळंच चित्र मनात उमटलं आहे. काय आहे हे पुस्तक? का मी गोंधळात पडलोय? तुम्हा सर्वांशी शेअर केल्याशिवाय चैन पडणार नाही. 

हे ते पुस्तक. लेखक आहेत श्री. पराग वैद्य.


शाळेत असताना 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक वाचले होते. दुसऱ्या महायुद्धाशी माझा परिचय झाला तो या पुस्तकामुळे. नंतरही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या पुस्तकाचे वाचन झाले. याविषयावरची इतरही अनेक पुस्तके वाचनात आली. चर्चिलबद्दलचे पुस्तक वाचले. स्टॅलिनबद्दलचे पुस्तक वाचले. पण वरील पुस्तक वाचताना यापूर्वी तयार झालेल्या मनातल्या सर्व संकल्पनांना छेद गेला. 

हे पुस्तक कुणा एकाचा उदोउदो करत नाही वा कुठल्याही प्रकारची निंदानालस्ती करत नाही. लेखकानी फक्त इतिहासाच्या नाण्याची दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न केला आहे व माझ्या मते तो रास्त आहे. इतिहास म्हणजे काय, तर इति + ह + आस, म्हणजे हे हे असे असे घडले. पण इतिहासाच्या ह्या व्याख्येला असलेली काळी किनार अशी की इतिहास हा नेहमी जेत्यांनी लिहिला आहे. मग भले तो 'जय नावाचा इतिहास' (पक्षी : महाभारत) असो वा इतर काही. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धाच्या जेत्यांनी जे काही आपल्याला सांगितले ते आपण प्रमाण मानून चालतो. मात्र यापुस्तकात लेखकानी इतिहासाची दुसरी बाजूही समर्पक रीतीने मांडली आहे, ती सुद्धा सप्रमाण, पुराव्यांनिशी. पुस्तकातील मांडलेले विचार हे निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत. कुठल्याही प्रकारची 'भक्ती' नाही वा 'द्वेष' नाही. एक तटस्थ व सत्य मांडायचा प्रयत्न असे मी या पुस्तकाचे वर्णन करीन. म्हणूनच मी वर म्हणलंय की पुस्तक वाचून मी गोंधळात पडलोय. गोंधळात पडायचं कारण एकच की एका बाजूला लेखकाचे विचारही पटताहेत, पण दुसऱ्या बाजूला इतकी वर्षं वाचलेल्याचं काय करायचं हाही प्रश्न आहे. पुस्तक वाचताना मला काही जर्मन मित्रांच्या घरी झालेली चर्चाही आठवली. एका मित्राचे वृद्ध काका काहीतरी सांगता सांगता थांबले, हे ही आठवले. नक्कीच त्यांना जास्त काहीतरी माहीत होतं.

हे सत्य का ते? वस्तुस्थितीचा विपर्यास केला गेलाय का मुळातच वस्तुस्थिती न सांगता दिशाभूल केलीय? काही कळेना झालंय. पुस्तकात काय लिहिले आहे ते सांगणे उचित नाही. मात्र दुसरे महायुद्ध, चर्चिल, हिटलर, पर्ल हार्बर, हिरोशिमा नागासाकी असल्या विषयात रस असणाऱ्या इच्छुकांनी अवश्य वाचावे. जरूर वाचा व तुमचे विचार मला कळवा. माझा झालेला वैचारिक गोंधळ कमी व्हायला त्याची मदत होईल. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत