मला पर्सनली ओळखणाऱ्या लोकांना माझ्या वाचनाच्या छंदाची पुरेपूर कल्पना आहे. हातात सापडेल ते पुस्तक वाचून काढणे यासारखा अत्यानंद नाही. त्यामुळे विविध विषयांवरची पुस्तके, तीही छापील, मी वाचत असतो. अशाच वाचनयात्रेत मध्यंतरी हातात पडले एक अनोखे पुस्तक. लेखकाचे नाव पहिल्यांदा ऐकले. विषय माहितीचा पण, पुस्तकाचे नाव जरा वेगळे, थोडेसे आव्हानात्मक असे. काय करावे? बघूया तरी काय लिहिलंय, असा विचार करून मी पुस्तक हातात घेतले. गेले सुमारे पंधरा दिवस मी वेळ मिळेल तसा पुस्तक वाचत गेलो. जसजसा पुढे जात होतो तसतसा 'भंजाळत' गेलो. पुस्तक वाचून संपल्यावर तर जी काय माझी या विषयाबद्दलची कल्पना होती, ती बदलून एक वेगळंच चित्र मनात उमटलं आहे. काय आहे हे पुस्तक? का मी गोंधळात पडलोय? तुम्हा सर्वांशी शेअर केल्याशिवाय चैन पडणार नाही.
हे ते पुस्तक. लेखक आहेत श्री. पराग वैद्य.
शाळेत असताना 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक वाचले होते. दुसऱ्या महायुद्धाशी माझा परिचय झाला तो या पुस्तकामुळे. नंतरही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या पुस्तकाचे वाचन झाले. याविषयावरची इतरही अनेक पुस्तके वाचनात आली. चर्चिलबद्दलचे पुस्तक वाचले. स्टॅलिनबद्दलचे पुस्तक वाचले. पण वरील पुस्तक वाचताना यापूर्वी तयार झालेल्या मनातल्या सर्व संकल्पनांना छेद गेला.
हे पुस्तक कुणा एकाचा उदोउदो करत नाही वा कुठल्याही प्रकारची निंदानालस्ती करत नाही. लेखकानी फक्त इतिहासाच्या नाण्याची दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न केला आहे व माझ्या मते तो रास्त आहे. इतिहास म्हणजे काय, तर इति + ह + आस, म्हणजे हे हे असे असे घडले. पण इतिहासाच्या ह्या व्याख्येला असलेली काळी किनार अशी की इतिहास हा नेहमी जेत्यांनी लिहिला आहे. मग भले तो 'जय नावाचा इतिहास' (पक्षी : महाभारत) असो वा इतर काही. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धाच्या जेत्यांनी जे काही आपल्याला सांगितले ते आपण प्रमाण मानून चालतो. मात्र यापुस्तकात लेखकानी इतिहासाची दुसरी बाजूही समर्पक रीतीने मांडली आहे, ती सुद्धा सप्रमाण, पुराव्यांनिशी. पुस्तकातील मांडलेले विचार हे निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत. कुठल्याही प्रकारची 'भक्ती' नाही वा 'द्वेष' नाही. एक तटस्थ व सत्य मांडायचा प्रयत्न असे मी या पुस्तकाचे वर्णन करीन. म्हणूनच मी वर म्हणलंय की पुस्तक वाचून मी गोंधळात पडलोय. गोंधळात पडायचं कारण एकच की एका बाजूला लेखकाचे विचारही पटताहेत, पण दुसऱ्या बाजूला इतकी वर्षं वाचलेल्याचं काय करायचं हाही प्रश्न आहे. पुस्तक वाचताना मला काही जर्मन मित्रांच्या घरी झालेली चर्चाही आठवली. एका मित्राचे वृद्ध काका काहीतरी सांगता सांगता थांबले, हे ही आठवले. नक्कीच त्यांना जास्त काहीतरी माहीत होतं.
हे सत्य का ते? वस्तुस्थितीचा विपर्यास केला गेलाय का मुळातच वस्तुस्थिती न सांगता दिशाभूल केलीय? काही कळेना झालंय. पुस्तकात काय लिहिले आहे ते सांगणे उचित नाही. मात्र दुसरे महायुद्ध, चर्चिल, हिटलर, पर्ल हार्बर, हिरोशिमा नागासाकी असल्या विषयात रस असणाऱ्या इच्छुकांनी अवश्य वाचावे. जरूर वाचा व तुमचे विचार मला कळवा. माझा झालेला वैचारिक गोंधळ कमी व्हायला त्याची मदत होईल.
हे सत्य का ते? वस्तुस्थितीचा विपर्यास केला गेलाय का मुळातच वस्तुस्थिती न सांगता दिशाभूल केलीय? काही कळेना झालंय. पुस्तकात काय लिहिले आहे ते सांगणे उचित नाही. मात्र दुसरे महायुद्ध, चर्चिल, हिटलर, पर्ल हार्बर, हिरोशिमा नागासाकी असल्या विषयात रस असणाऱ्या इच्छुकांनी अवश्य वाचावे. जरूर वाचा व तुमचे विचार मला कळवा. माझा झालेला वैचारिक गोंधळ कमी व्हायला त्याची मदत होईल.
उत्तर द्याहटवाPustakacha naav display hoat naahiye. But must be interesting from what you say