मुख्य सामग्रीवर वगळा

सत्य, विपर्यास की दिशाभूल...???

मला पर्सनली ओळखणाऱ्या लोकांना माझ्या वाचनाच्या छंदाची पुरेपूर कल्पना आहे. हातात सापडेल ते पुस्तक वाचून काढणे यासारखा अत्यानंद नाही. त्यामुळे विविध विषयांवरची पुस्तके, तीही छापील, मी वाचत असतो. अशाच वाचनयात्रेत मध्यंतरी हातात पडले एक अनोखे पुस्तक. लेखकाचे नाव पहिल्यांदा ऐकले. विषय माहितीचा पण, पुस्तकाचे नाव जरा वेगळे, थोडेसे आव्हानात्मक असे. काय करावे? बघूया तरी काय लिहिलंय, असा विचार करून मी पुस्तक हातात घेतले. गेले सुमारे पंधरा दिवस मी वेळ मिळेल तसा पुस्तक वाचत गेलो. जसजसा पुढे जात होतो तसतसा 'भंजाळत' गेलो. पुस्तक वाचून संपल्यावर तर जी काय माझी या विषयाबद्दलची कल्पना होती, ती बदलून एक वेगळंच चित्र मनात उमटलं आहे. काय आहे हे पुस्तक? का मी गोंधळात पडलोय? तुम्हा सर्वांशी शेअर केल्याशिवाय चैन पडणार नाही. 

हे ते पुस्तक. लेखक आहेत श्री. पराग वैद्य.


शाळेत असताना 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक वाचले होते. दुसऱ्या महायुद्धाशी माझा परिचय झाला तो या पुस्तकामुळे. नंतरही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या पुस्तकाचे वाचन झाले. याविषयावरची इतरही अनेक पुस्तके वाचनात आली. चर्चिलबद्दलचे पुस्तक वाचले. स्टॅलिनबद्दलचे पुस्तक वाचले. पण वरील पुस्तक वाचताना यापूर्वी तयार झालेल्या मनातल्या सर्व संकल्पनांना छेद गेला. 

हे पुस्तक कुणा एकाचा उदोउदो करत नाही वा कुठल्याही प्रकारची निंदानालस्ती करत नाही. लेखकानी फक्त इतिहासाच्या नाण्याची दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न केला आहे व माझ्या मते तो रास्त आहे. इतिहास म्हणजे काय, तर इति + ह + आस, म्हणजे हे हे असे असे घडले. पण इतिहासाच्या ह्या व्याख्येला असलेली काळी किनार अशी की इतिहास हा नेहमी जेत्यांनी लिहिला आहे. मग भले तो 'जय नावाचा इतिहास' (पक्षी : महाभारत) असो वा इतर काही. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धाच्या जेत्यांनी जे काही आपल्याला सांगितले ते आपण प्रमाण मानून चालतो. मात्र यापुस्तकात लेखकानी इतिहासाची दुसरी बाजूही समर्पक रीतीने मांडली आहे, ती सुद्धा सप्रमाण, पुराव्यांनिशी. पुस्तकातील मांडलेले विचार हे निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत. कुठल्याही प्रकारची 'भक्ती' नाही वा 'द्वेष' नाही. एक तटस्थ व सत्य मांडायचा प्रयत्न असे मी या पुस्तकाचे वर्णन करीन. म्हणूनच मी वर म्हणलंय की पुस्तक वाचून मी गोंधळात पडलोय. गोंधळात पडायचं कारण एकच की एका बाजूला लेखकाचे विचारही पटताहेत, पण दुसऱ्या बाजूला इतकी वर्षं वाचलेल्याचं काय करायचं हाही प्रश्न आहे. पुस्तक वाचताना मला काही जर्मन मित्रांच्या घरी झालेली चर्चाही आठवली. एका मित्राचे वृद्ध काका काहीतरी सांगता सांगता थांबले, हे ही आठवले. नक्कीच त्यांना जास्त काहीतरी माहीत होतं.

हे सत्य का ते? वस्तुस्थितीचा विपर्यास केला गेलाय का मुळातच वस्तुस्थिती न सांगता दिशाभूल केलीय? काही कळेना झालंय. पुस्तकात काय लिहिले आहे ते सांगणे उचित नाही. मात्र दुसरे महायुद्ध, चर्चिल, हिटलर, पर्ल हार्बर, हिरोशिमा नागासाकी असल्या विषयात रस असणाऱ्या इच्छुकांनी अवश्य वाचावे. जरूर वाचा व तुमचे विचार मला कळवा. माझा झालेला वैचारिक गोंधळ कमी व्हायला त्याची मदत होईल. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...