मुख्य सामग्रीवर वगळा

समिधा

सकाळी फिरायला निघालो होतो. बरोबर कोणीही नव्हतं. मला अनेकवेळा ही परिस्थिती आवडते. एकटा असलो म्हणजे आजूबाजूला बघत, वेगवेगळ्या गोष्टींची मनाशी नोंद करत जाता येतं. अनेक आवाज, वाद, संवाद कानावर पडतात. एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. आता ही गुरुजी मंडळी सुद्धा खूप 'हायटेक' झाली आहेत. गाड्या वापरतात, मोबाईल वापरतात, सोशल मीडियाचा व्यवसायासाठी उत्तम उपयोग करून घेतात. पण व्यावसायिक गप्पा त्याच विषयाभोवती फिरतात. तर त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते की, 'अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं...'

बस्स एव्हढंच? ह्या पलीकडे त्या समिधांच्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही? खरं तर ह्या अशा अनेक समिधा आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत. विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं. 

पहिलीच आठवली ती उर्मिला. लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला. रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं. पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तेही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही. मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका समिधेची आहुती अशीच पडून गेली. 

मग आठवतात त्या काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी. शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन, सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही आपण ऐकलेल्या असतात. पण बाकीच्या पाच? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? अफझलखान येतोय म्हणल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हणल्यावर यांचा जीवही सैरभैर झाला नसेल? निश्चितच झाला असणार. पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच समिधा तशाच जळून गेल्या. 

बहुतेक सर्व समिधा ह्या स्त्रियाच. कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू. गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला, आनंदीबाईला, डॉक्टर करण्यासाठी स्वतः समिधा झाला. काही थोड्याफार समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या. पण बाकीच्या? टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली. या आणि अशा अनेक. 

विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या समिधेनं दार उघडलं. मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं चोवीस वर्षांचं यशस्वी करीअर सहजपणे सोडून देणाऱ्या त्या समिधेला पाहून मला एकदम भरून आलं. घरोघरी अशा समिधा रोज आहुती देत असतात. घर उभं धरत असतात, सावरत असतात. माझं घर हा काही अपवाद नव्हे. मात्र यापुढे या समिधांची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे.  

आज नव्या वर्षाच्या, नव्या दशकाच्या आव्हानांना भिडण्याची तयारी करताना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या समिधेला एक सलाम तो 'बनता है....'

© मिलिंद लिमये











टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून