मुख्य सामग्रीवर वगळा

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो.

माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो. 

तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात.

काय रे...???

सर, आज आमचा लास्ट डे...

आं, संपली तीन वर्षं?

हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली...

त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडते. कारण तीन वर्षांत लकडी पुलाखालून खूप पाणी वाहिलेलं असतं. 

पहिल्या आठवड्यात बावरलेली मुलं, हळूहळू सेटल होतात. सीनिअर्सकडून, मॅनेजर्सकडून एक एक गोष्टी शिकू लागतात. दिवसचे दिवस क्लायंटकडे जात असताना त्यांच्यात्यांच्यातही घनिष्ठता निर्माण होत रहाते. पुण्याबाहेरच्या कामांना दोन दोन आठवडे एकत्र राहताना खूप काही उद्योग करतात. कधी अर्धवट कामं करून शिव्या खातात पण त्याच्या पुढच्याच वर्षी 'बेस्ट आर्टिकल ऑफ द इयर' चं बक्षीसही घेऊन जातात. पहिल्या दिवशी काय इआरपी, काय एक्सेल, काय पीपीटी काही माहीत नसतं. पण पुढल्या काळात त्याच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळवतात. सुरुवातीला दोन वाक्य धड लिहीता न येणारी पोरं तिसऱ्या वर्षात अक्खा रिपोर्ट स्वतःचा स्वतः बनवून रिव्हयूसाठी पुढ्यात ठेवतात. बहुतेक सगळेजण छुपे रुस्तम असतात. वार्षिक स्नेहसंमेलनात काय काय विविध गुणदर्शन देतात. 

या सगळ्या काळात कुणाकुणाला काही नावंही पडतात. एखादा चैतन्य चॅटी होतो तर एखादा मगर आडनावाचा मुलगा मॅगी होतो. एखाद्या दृष्टीला चक्क दुष्टी म्हणतात तर धनश्रीची धन्नो कधी झाली ते खुद्द धनश्रीलाही आठवत नाही. कधी कधी एखादा तक्रार घेऊन येतो. अशावेळी मला नाना पाटेकरच्या प्रहार मधला एक प्रसंग आठवतो. सगळ्या कमांडोजना खडतर ट्रेनिंग देत असताना एका नेपाळी कमांडोला तो 'टू बाय टू' नाव ठेवतो. शेवटच्या दिवशी हे असलं नाव ठेवल्याबद्दल तो कुरकुर करतो, तेव्हा नाना त्याला म्हणतो की, 'प्यारसे दिये हुए नाम रखें जातें है, इसे भी संभल के रखना'. मीही हेच वाक्य त्या कुरकुऱ्याला ऐकवतो. तोही हसत हसत ते नाव ठेऊन घेतो. 

निरोप घेऊन निघताना दर आठवड्याला भेटायचे वायदे होतात. काही दिवस पाळलेही जातात. पण हे फार काळ टिकणारं नाहीये हे मला माहित असतं. हळूहळू भेटीगाठी कमी होत जातात. 

एखाद दिवशी अचानक कुणी अमित प्रकट होतो. अतिशय हुशार, हरहुन्नरी पण थोडासा बेभरवशी असा हा अमित, एकेकाळी माझा लाडका आर्टिकल असतो... 

सर, लग्न करतोय...

अरे वा, कोण मुलगी?

सर, तिला भेटायला घेऊन आलोय. 

अरे, मग आत बोलाव ना... आणि आत येते सूरश्री. माझीच आर्टिकल.

अगं, सगळ्या जगात लग्न करायला हाच गाढव तुला सापडला का? 

सरांनी असं काही म्हणाल्याबद्दल दोघांनाही काही वाटत नाही. त्यांच्या लग्नात मी दोन्ही बाजूकडून मिरवतो. 

कधी अचानक फोन येतो...

सर, मी मुग्धा...

ही मुग्धा एकेकाळी अक्षरशः सख्ख्या पोरीनं बापावर गाजवावा तसा माझ्यावर अधिकार गाजवायची. आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. 

बोल मुग्धा...   

सर मुग्धा काय? मुक्ताबाई म्हणा ना. तेच ऐकायला फोन केलाय.

बरं, बोला मुक्ताबाई...

सर, तुम्हाला आठवतंय एकदा तुम्ही मला नऊ वेळा रिपोर्ट बदलायला लावला होतात? आज त्याची किंमत कळली. आमच्या हेडऑफिसला एक रिपोर्ट पाठवायचा होता. तो सेम तुम्ही करायला लावला होतात तसा केला. मला आजच तिकडून फोन आला की माझा रिपोर्ट सगळ्यात भारी झालाय म्हणून. फोनवर तिचं कौतुक करताना माझे डोळे ओले झालेले तिला दिसत नाहीत हे मात्र बरं असतं. 

मी कुठेतरी एकदा वाचलं होतं की कुठलाही गुरु किती काळ जगतो? तर त्याचा शेवटचा शिष्य जिवंत असेपर्यंत. माझे हे विद्यार्थी, माझे आर्टिकल्स, तीन वर्षांनी पक्षी उडून जातात खरे, पण मला मात्र शतायुषी करून जातात... 


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. मला वाटत की हे प्रत्येक आर्टिकलने वाचावे … सिरांच्या मनात काई चालू अस्त हे कधीच कोणी विचारत नाही … डोळ्या समोर किती प्रसंग होतात … शेवटीं टेबला पलिकडे पण एक सर हा मनुष्यच नाही का ?

    उत्तर द्याहटवा
  2. तिकडे बिनधास्त असणारा तू किती हळवा होऊ शकतोस ते ते या ब्लॉगवरून कळले. तू लिहिलेलं मी म्हटलं तर अनुभवलं नाही कारण इंजिनियरच्या आयुष्यात अशी आर्टिकलशिप नसते. पण माझ्या कन्येची आर्टिकलशिप (तीही तुझ्याकडेच) पाहिली आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर जिवंत चित्र उभं राहिलं. पुन्हा एकदा तुझ्यातील लेखकाला सलाम !

    उत्तर द्याहटवा
  3. वाचताना ते दिवस लगेच डोळ्यासमोर आले. माझी फर्स्ट असाइनमेंट एक बैलेंस शीट टैली करणे होती. तीन दिवस लागले. शेवटी एकत्रं बसून आपण टैली केली आणि त्यानंतर तुम्ही farmville ची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवलीत. सुंदर आहे blog. I still miss those days.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस