मुख्य सामग्रीवर वगळा

मालिशवाले मामा

खूप लांबचा प्रवास करून आज घरी आलोय. अंग अगदी आंबून गेलंय. ताजंतवानं होण्यासाठी मसाज करून घ्यावा ह्या विचाराने जवळच्याच एका महागड्या स्पामधे निघालो आहे. मात्र मालिशवाल्या मामांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीये व त्यांच्या आठवणीनं डोळेही ओलावलेत.....

माझी आणि मामांची ओळख तशी अचानकच झाली. अकरावी का बारावीत असताना एकदा खेळताना जोरात पडलो. त्या वयात तसं पडणं झडणं काही नवीन नव्हतं. पण ह्यावेळी जरा जोरातच पडलो. थोड्यावेळाने उठून पुन्हा खेळायला लागलो खरा, पण पाठच दुखायला लागली. घरी आलो व आईला सांगितलं. तिनं आपलं पाठीला तेल लाव, शेकून काढ, असले उपाय केले. पेनकिलरही दिली. पण पाठदुखी काही थांबेना.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे निघालो होतो, तेव्हढ्यात आजोबांचे एक मित्र आले. 

"डॉक्टरकडे रे कशाला चाललायंस? त्या मामाकडे जा आणि त्याला सांग काय ते. मस्त मालिश करून देईल की दहा मिनिटात उड्या मारत घरी येशील. जा, त्या मारुतीच्या पलीकडच्या वाड्यात रहातो तो. आणि माझं नाव सांग बरं का..." 

थोडा विचार करून मीही डॉक्टरांकडे जाण्याऐवजी कोण त्या मामांकडे जायला निघालो. तिथे पोचलो तर एक म्हातारेसे गृहस्थ आधीच एका पैलवानाचे जोरजोरात अंगमर्दन करत होते. तो प्रकार बघूनच तिथून पळ काढायच्या विचारात होतो, तितक्यात त्या गृहस्थांनी मला एका बाकड्यावर बसायची खूण केली. आता नाईलाज होता.

बसल्या बसल्या मी म्हातारबाबांचं निरीक्षण करू लागलो. सुमारे साठीच्या पुढचे असावेत. रांगडा सावळा रंग. उंचीपुरी, भक्कम शरीरयष्टी. तरुण वयात पैलवानकी केली असावी, हे सांगणारे चपटे झालेले कान, पांढऱ्याशुभ्र गलमिश्या, अंगात पांढरट पिवळट अशी बंडी व तसल्याच रंगाचं गुढग्यापर्यंत वर घट्ट बांधलेलं धोतर असा त्यांचा अवतार होता. कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात बाजी पासलकर किंवा शेलारमामा म्हणून सहज खपून गेले असते. एक शब्दही न बोलता ते त्या पैलवानरावांना रगडत होते. थोड्या वेळानं पैलवानरावांचं काम झालं व माझा नंबर लागला. 

खुणेनंच त्यांनी मला काय झालंय म्हणून विचारलं. मी सांगितलं. पुन्हा खुणेनंच आडवं व्हायला सांगितलं. च्यायला, म्हातारा मुका आहे की काय? हा विचार मनात येईपर्यंत बाहेर जाऊन, तंबाखूची जोरदार पिंक टाकून आले व गडगडत्या आवाजात म्हणाले, " बाळा, तुज्या पायाला मार लागलाय बहुतेक, पाठीला न्हाई. तुज्या चालन्यावरूनच वळकाया येतंय " असं म्हणून त्यांनी माझा उजवा पाय हळूहळू, हलक्या हातानं चोळायला सुरुवात केली. एका विशिष्ट जागी दाब देताच मी कळवळलो, पण मामांनी समाधानानं मान हलवली. नंतर सुमारे अर्धा तास त्यांनी त्या दुखऱ्या भागाला मसाज केला व "पळ आता" असा आदेश दिला. उठून बसलो तर काय? पाठदुखी गायब. आयला, हे तर लै भारी काम झालं होतं.

त्यानंतर मी बऱ्यापैकी रेग्युलरली मामांकडे जायला लागलो. कधी खरंच मालिशची गरज असायची तर कधी उगाचंच रगडून घ्यायची तलफ यायची. मामा खूपच अबोल होते. अगदीच गरज असल्याशिवाय बोलत नसत. घरी एकटेच असायचे. कुणीही त्यांच्याकडे आलंगेलं मी पाहिलं नव्हतं. एकदा काही कारणानं थोडंसं बोलले. त्यांच्या बोलायच्या धाटणीवरून सहजच मी विचारलं, "मामा, तुम्ही कोल्हापूरचे आहात का?" हे विचारताच मालिश करता करता त्यांचं अंग ताठरलं. न बोलता ते मला रगडत राहिले. मीही विषय वाढवला नाही. पैसे देऊन मी निघणार इतक्यात म्हणाले, टाइम असंल तर बस जरा...

तरुण वयात मामा खरोखरच नावाजलेले पैलवान होते. अनेक कुस्त्या त्यांनी मारल्या होत्या. खूप मानसन्मान, बक्षिसं मिळवली होती. गावात शेतीवाडी, गुरंढोरं होती. तरुण वय आणि पैलवानकीची मस्ती, या भरात कुणाशी तरी एक विचित्र पैज लावली. काय तर जो कुणी कुस्तीत हरेल त्यानं अर्धी मिशी छाटून व लुगडं नेसून गावातून चक्कर मारायची. दुर्दैवानं मामा ती पैज हरले. गावातले लोक पैज पूर्ण करायच्या तयारीला लागले, तेव्हढ्यात संधी साधून मामांनी धूम ठोकली. रानावनातून, काट्याकुट्यातून, तोंड चुकवत पळत राहिले व अखेर पुण्याला जे पोचले, ते परत कधीही गावी न जाण्यासाठीच. व्यापारी पेठेत हमाली करू लागले. रात्री बाकीच्या थकल्या भागल्या हमालांना मालिश करता करता तोच पोटापाण्याचा व्यवसाय बनून गेला.

"फालतू मस्ती अशी नडली. आता पोट जाळण्यासाठी हा मालिशचा व्यवसाय करतूय. लै वेळा जीव द्यायाचा विचार आला. पन धीर नाय झाला. तुमच्यासारख्या लोकांनी आसरा दिला. मालिशसाठी माझं नाव काढत्यात, त्योच आता आधार. आजवर कुणाला बी ह्ये सांगितलं नाय. पन आज तुज्यापाशी सांगावं वाटलं. लै दिवसाचं साचल्यालं भाईर पडलं. आता ह्येच माझं जगणं, ह्येच माझं नशीब. माज्या माघारी कदी माज्या मालिशची आठवन आली आनी माज्यासाटी डोळं ओलावलं तुमचं, तर त्येच माझं येकलं बक्षिस आसंल....."

एव्हढं बोलून मामा गप्प झाले व लांब शून्यात कुठेतरी हरवून गेले. मीही काहीसा हरवून गेलेलासा घरी आलो. मनात एकच विचार घोळत होता. तो एक अश्वत्थामा स्वतःच्या जखमेसाठी लोकांकडे तेल मागत फिरला, हा एक अश्वत्थामा स्वतःची जखम लपवत, लोकांना तेल मालिश करत जगतोय.

काही दिवसांनी कळलं की मामा गेले.....
.
.
खूप लांबचा प्रवास करून आज घरी आलोय. अंग अगदी आंबून गेलंय. ताजंतवानं होण्यासाठी मसाज करून घ्यावा ह्या विचाराने जवळच्याच एका महागड्या स्पामधे निघालो आहे. मात्र मालिशवाल्या मामांची सारखी आठवण येतेय.

त्यांच्या आठवणीनं डोळेही ओलावलेत.....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत