मुख्य सामग्रीवर वगळा

जरा विसावू या वळणावर....

अनेक महिने गाजत असलेला, आपल्या प्रशालेचा सुवर्णमहोत्सव परवा रविवारी पार पडला. नेटकं संयोजन, शिस्तबद्ध स्वयंसेवक व प्रसंगानुरूप कार्यक्रम असा हा सोहळा होता. आपल्याला त्याचं फारसं नवल वाटलं नाही. कारण तो प्रबोधिनीचा कार्यक्रम होता. तो तसाच असणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत होतं. तशी आपल्याला सवयच होती. मात्र यापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम खूप काही दाखवून गेला.

गेले अनेक महिने, त्यातही गेले काही दिवस, आपले वर्गमित्र, महामहिम, वयोवृद्ध, पितामह योगेश देशपांडे यांनी मुरारबाजी व बाजी प्रभू या दोन्ही देशपांड्यांच्या ताकतीने व हिरीरीने या कार्यक्रमाचा प्रचार चालवला होता. योग्या, अरे आता बास, आम्ही येणार आहोत असं अनेकवेळा सांगूनही पितामह ऐकायला तयार नव्हते. पण या भानगडीत कार्यक्रमाबाबतची उत्सुकता मात्र जाम ताणली गेली.

पहिल्या झटक्यातच सर्व शिक्षकजनांबरोबरचा संवादाचा कार्यक्रम मनाला हळवं करून गेला. ज्या गुरुजनांना अखंड त्रास दिला, ते सर्व पाठीवरून हात फिरवून, किती रे मोठे झालात सगळे, असं म्हणत होते ना त्यावेळी डोळ्यातलं पाणी लपवायला फार प्रयत्न करावे लागले. दीपाताई, मुक्तीताई, नीलाताई, फडकेबाई, कुंदाताई, पूरकर सर, सगळ्यांच्या नजरेतून आपल्याबद्दलचा अभिमान ओसंडत होता. आपण सगळेजण आता पूर्णपणे वेल कनेक्टेड आहोत. (आपल्या वर्गापुरतं बोलायचं तर सोशल मीडिया पेक्षाही जास्त श्रेय आपला जगमित्र गणेशला जातं). पण मागच्या पुढच्या बॅचमधलेही अनेक मित्र अनेक वर्षांनंतर भेटले. कुठल्या कुठल्या आठवणी निघाल्या. येऊ न शकलेल्या मित्रांची आवर्जून चौकशी झाली. गेल्या चाळीस वर्षात हरवलेल्या आठवले सर, जोगळेकर सर, उपाध्ये सर, कोठावळे सर, नेने बाई, सोनटक्के बाई यांची तर आठवण निघालीच, पण कारण नसताना मनाला चटका लावून कायमच्या निघून गेलेल्या हसतमुख प्रसाद सबनीस, जन्मजात खेळाडू असलेला इंद्रजीत गोसावी, थोडासा शांत पण हरहुन्नरी विनायक तोफखाने या मित्रांचीही आठवण डोळे ओले करून गेली. 

जवळजवळ प्रत्येकानं 'गणेशोत्सव' ह्या उपक्रमाची आठवण काढलीच. अगदी व्यासपीठावरून डॉ धनंजय केळकरांनीसुद्धा. मी, संजय रिसबूड, मयुरेश सोहोनी, मनोज देवळेकर, विक्रम जोगळेकर, संजीव गलांडे, भूषण बापट हे आम्ही सगळे सरस्वती दलवाले. वेगवेगळ्या मिरवणुकीच्या, विशेषतः प्रबोधिनीच्या गणेशविसर्जन मिरवणुकीच्या आठवणी निघाल्या. मी आणि संजय रिसबूड, दरवर्षी प्रशालेच्या मिरवणुकीच्या शेवटी ढोल फोडायचोच. त्यामागच्या अनेक कारणांपैकी काही 'कारणं' कार्यक्रमाला उपस्थितही होती.

आठवणींच्या गोतावळ्यात क.प्र. ची आठवण होणं स्वाभाविक होतं. 'ती सध्या काय करते' इथपासून 'ती आज आलीय का' असे अनेक प्रश्न मनात येत होते. 'ती' दिसल्यावर शेक्सपिअरचे शब्द उसने घेतले जात होते की 'हाच का तो चेहरा ज्याने बुडविली शेकडो जहाजे व घडवून आणले ट्रॉयचे युद्ध'. इतक्या वर्षांनंतरही ती एक थोडीशी दरी मनात होती.

शाळेत असताना तर क.प्र. म्हणजे 'अब्रह्मण्यम' कॅटेगरीच होती. आपल्या लेखी वास्तूला तिसऱ्यानंतर एकदम पाचवाच मजला होता. एकदा मी मधल्या सुट्टीत ग्रंथालयात इंद्रजाल कॉमिक्स वाचत होतो. तेव्ह्ढ्यात सुट्टी संपल्याची घंटा झाली. दोनच पानं राहीली होती, ती वाचून दुसरी घंटा व्हायच्या आत वर्गात जाण्यासाठी मी सुसाट पळत सुटलो. आणि एका 'कन्यकेला' धडकलो. तिचं दप्तर पडलं, डबा पडला. वस्तुतः मी थांबून तिला मदत करायला हवी होती. बरा एखादा 'मेरे मेहबूब' टाईप्स प्रसंग घडला असता. पण एकंदरीतच माझी शालेय कीर्ती लक्षात घेता कोणाच्या हातात सापडणं मला परवडणारं नव्हतं. आता एखाद्या शिक्षकांच्या हातात सापडलो असतो तर फार तर एखादी टप्पल खाऊन सुटका झाली असती. पण एखाद्या 'स्वयंघोषित' कार्यकर्त्याच्या हातात सापडलो असतो तर काही खैर नव्हती. 

इथे कुणाला प्रश्न पडू शकतो की 'स्वयंघोषित कार्यकर्ता' म्हणजे काय. प्रबोधिनीत 'सरकारमान्य' (पक्षी : अप्पामान्य) व 'स्वयंघोषित' असे कार्यकर्त्यांचे दोन प्रकार होते. सरकारमान्य कार्यकर्ते उदा. विसूभाऊ, सुभाषराव, गिरीशराव, अनंतराव, हे खरोखर डिवोटेड कार्यकर्ते होते. वादच नाही. पण इतर काही जाम भुरटे होते. आपल्यापेक्षा फक्त वयानं मोठे असल्यामुळे त्यांना कार्यकर्ते असल्याचा 'फील' यायचा. हे लोक उगाच दादागिरी करायचे. एखादं 'दीन दुबळं' पोर पकडून, त्याच्या खांद्यावर हात टाकून हे लोक एखाद्या मोक्याच्या जागेवर उभे असायचे. कधी कुणावर उगाचच ओरड, कुणाला कारण नसताना टप्पल मार असले ह्यांचे उद्योग चालायचे. पण त्याचा उद्देश वेगळाच, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, असा असायचा. आपण सरळ रांगेतून चाललोय, तर हे 'स्वयंघोषित' अचानक ओरडायचे, 'मिलिंद, लक्ष कुठाय?' अशावेळी मी लगेच इकडेतिकडे बघायचो. हमखास एखादी 'कार्यकर्ती' दिसायचीच. अच्छा, म्हणजे नाव जरी माझं घेतलं असलं तरी पुढला प्रश्न माझ्यासाठी नसायचाच तर...!!! 

मी नावं घेत नाही कारण तुमच्या डोळ्यासमोर ऑलरेडी अनेक नावं आली असतीलच. ह्या असल्या एखाद्या 'स्वयंघोषित' कार्यकर्त्याच्या हातात सापडलो असतो तर माझं काय झालं असतं त्याची कल्पना तुम्ही नक्कीच करू शकाल. त्यामुळे त्या कन्यकेला मदत करण्याऐवजी पौराणिक चित्रपटातल्या नारदमुनींपेक्षाही दुप्पट वेगाने मी तिथून अंतर्धान पावलो. चुकूनमाकून हा लेख 'तिच्या' हाती पडलाच तर तिला नक्की कळेल की 'तो मीच'.

पण प्रत्यक्षात खूप सुखद धक्का बसला. अनेक मैत्रिणी स्वतःहून ओळख देत पुढे आल्या. काही बॅचेसचे WA ग्रुप्स ही तयार झाले. चौथ्या मजल्यावरचे अनेक चंद्र आज जमिनीवर उतरून दुसऱ्या मजल्यावरच्या चकोरांबरोबर संवाद साधत होते. 'ए, तू गणपतीत ढोल वाजवायचास ना रे' एव्हढ्या एका वाक्यानं इतकी वर्षं फोडलेल्या अनेक ढोलांचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. ती दरी आता संपत चालली होती, संपलीच होती. पण कसं काय? काय कारण असेल?

खरं बघाल ना तर आपण आता सर्वार्थानं मोठे झालोत. नुसते वयानंच नाही तर मानानं, कीर्तीनं, अनुभवानं, जबाबदारीनंही मोठे झालो आहोत. आता वेळ आहे एखाद्या विस्तारलेल्या नदीच्या पात्रासारखी, सर्व नव्या नात्यांना, ओळखींना योग्य तो सन्मान देत, सामावून घेत पुढे जाण्याची. नदीचं हे असं पात्र मग दोन्ही तीरांना समृद्ध करतच पुढे जातं.

काहीसा हरवलेलाच मी घरी पोचलो. गाडीत रेडिओ चालूच होता. इतका वेळ माझं त्या गाण्यांकडे लक्षही नव्हतं. पण गाडी पार्क करून निघताना लक्षात आलं...

अनुराधा पौडवाल गात होत्या...

भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर, या वळणावर....

खरंच. ह्या सुवर्ण महोत्सवी वळणावर जरा विसावूया, मागे वळून पाहूया व एकमेकांना समृद्ध करत पुन्हा पुढे निघूया....

© मिलिंद लिमये

(हा लेख माझ्या 'ज्ञा.प्र.प्र.' व 'ज्ञा.प्र.क.प्र.' मधील मित्रमैत्रिणींना समर्पित आहे)




टिप्पण्या

  1. मिलिंद - अजून एक सुरेख ब्लॉग. प्रशालेतील सगळ्यांचा हळवा कोपरा नेमकेपणाने उघडलास.....शाळेत हिम्मत नव्हती पण आज ती भीतीही नाही...आणि हुरहुरही....

    उत्तर द्याहटवा
  2. मिलींदा फार छान लिहिले आहेस. असाच लिहित रहा कारणं काहीही असोत!!

    उत्तर द्याहटवा
  3. Very true Dada. Aata tuuch sarwat motha amchyat ani amhi saglech tujyat amchhya babanna bagtoh....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत