मुख्य सामग्रीवर वगळा

फाउंटन पेन

ही जी एक वस्तू आहे ना तिनं मला कळायला लागल्यापासून, माझ्या मनात एक वेगळी जागा बळकावून ठेवली आहे. आधी वडीलधारी मंडळी हात लावू देत नसत म्हणून उत्सुकता निर्माण झाली. ती आपली एक मानसिकताच असते नाही का? ज्या गोष्टीला मोठी मंडळी 'हात लावलास तर थोतरीत मारीन' म्हणतात, त्या गोष्टीला कधी एकदा हात लावतो असं होऊन जातं. तर मी लहान असताना, माझे आजोबा काही काम करत असताना तिथे लुडबूड करत असे. त्यांच्या टेबलवरच्या इतर कुठल्याही वस्तूला, स्टेपलर म्हणा, पंच म्हणा, पेपरवेट म्हणा, हात लावल्यास ते काहीही बोलत नसत. त्यांची पेन्सिल, खोडरबर ह्या वस्तू तर मी सरळ माझ्या अभ्यासासाठी पळवायचो. त्यालाही त्यांची हरकत नसायची. पण पेनाला हात लावला की वस्सकन ओरडायचे. माझ्या लहानपणी चौथीत गेल्याशिवाय पेन मिळायचं नाही. त्यामुळे पहिली ते तिसरी, एक तर पाटी पेन्सिल नाहीतर शिसपेन्सिल, एव्हढ्यावरच भागवावं लागायचं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय आणि पेन मिळतंय असं मला झालं होतं. तिसरीचे शेवटचे दोन महिने तर सरता सरत नव्हते. 

अखेर आजोबांनी एक दिवस जाहीर केलं, उद्या तुला पेन आणायला जाऊ. रात्रभर झोपेत मला वेगवेगळी पेनं दिसत होती. सकाळपासून मी तयार होऊन बसलो होतो व चला, चला म्हणून आजोबांच्या मागे भुणभूण लावली होती. थोड्या वेळानं तेही तयार झाले व मला पुण्यातल्या प्रसिद्ध काळे पेन्स या दुकानात घेऊन गेले. तिथली पेनं बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्यात आजोबांनी, तुला आवडेल ते पेन घे, असा न मागता वर दिल्यामुळे 'घेता किती घेशील दो करानें' अशी माझी गत झाली. बराच वेळ हे घेऊ का ते घेऊ करत अखेर एक चकचकीत निळसर, मधल्या बाजूला शाई किती उरलीय ते दिसावं म्हणून पारदर्शक पट्ट्या असलेलं पेन मी पसंत केलं. त्याशिवाय एक निळ्या शाईची बाटली, ती भरायला एक ड्रॉपर अशी जवळ जवळ सात साडेसात रुपयांची जंगी खरेदी करून आम्ही घरी आलो. 

त्या निळ्या रंगाच्या पेनाकडं बघताना मला जणू आकाशाचा एक तुकडा हातात आल्यासारखं वाटायचं. ते पेन माझ्यासाठी 'जगात भारी' पेन होतं. पार्कर हे नाव नंतर कधीतरी कानावर पडलं होतं. शेफर्स, वॉटरमन वगैरेंचा आम्हाला पत्ताही नव्हता. आम्हाला मात्र आमच्या त्या जगप्रसिद्ध काळे पेनचंच फार कौतुक होतं. बरेच वेळा लिहिता लिहिता शाई उतरेना व्हायची. मग ते पेन झटकायला लागायचं. लिहिताना न उतरणारी शाई, पेन झटकल्यावर मात्र हमखास पुढे किंवा शेजारी बसलेल्याच्या अंगावर भस्सकन नक्षी उठवायची. त्यावरून मग मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर मारामाऱ्या व्हायच्या.  

दर रविवारी ते पेन पूर्ण उघडून धुण्याचा एक कार्यक्रम असायचा. पेनाच्या निबला शाईचा एक सूक्ष्म ठिपकासुद्धा दिसता कामा नसायचा. निबाला लागलेली शाई बोटानं पुसून ते बोट केसांना पुसलं जायचं. अशी शाई केसांना लावली तर म्हातारपणी केस पांढरे होत नाहीत अशी एक वदंता होती. चुकूनमाकून पेन कधी हातातुन पडलं आणि त्याचं निब मोडलं तर पायाला ठेच लागल्यासारखं वाटायचं. निब बदलायला मात्र आम्ही भाऊ महाराजाच्या बोळातल्या एका स्टेशनरीच्या दुकानात जायचो. त्या दुकानाला रुंदीच नव्हती. नुसतीच लांबी. त्यामुळे रस्त्यावर उभं राहूनच मालकाशी डील करावं लागायचं. त्या दुकानाला आम्ही 'आडवं दुकान' म्हणायचो. निब दुरुस्ती व्यतिरिक्त, पेन्सिली, खोडरबर, वह्या, छोट्या उत्तरपत्रिका, सुट्टे फुलस्केप कागद असल्या वस्तू घ्यायला आम्ही तिथे जायचो. तिथे जाताना प्रत्येक मुलगा खिशात आपलं पेन घेऊन जायचा. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या दुकानात काहीही खरेदी केलं की तो मालक पेनात फुकट शाई भरून द्यायचा. त्यामुळे एखादा मित्र आडव्या दुकानात जायला निघाला की आणखी चारजण आपापली पेनं घेऊन त्याच्याबरोबर निघायचे. तो मालकही वस्ताद होता. जो कुणी खरेदी करेल त्यालाच फुकट शाई द्यायचा. आम्ही त्यावरही उपाय शोधला होता. मित्र जर पेन्सिल, रबर आणि वही घेणार असेल, तर एक जण पेन्सिल मागायचा, दुसरा रबर मागायचा, तिसरा वही घ्यायचा. असं करत सगळेजण फुकट शाई पदरी पाडून घेत. 

चौथी ते आठवी अशी पाच वर्षं ते पेन मी वापरलं. नववीत गेल्यावर मात्र खूप लिहावं लागतं याकारणासाठी बॉलपेन हातात आलं. बॉलपेनमुळे अक्षर बिघडतं असा एक सार्वजनिक समज त्याकाळी होता. पण बॉलपेनने फास्ट लिहिता येतं, त्यामुळे पेपर अर्धवट रहाण्यापेक्षा अक्षर बिघडलेलं परवडलं, असा विचार करून हाती धरलेलं बॉलपेन नंतर कित्येक वर्षं हातातच राहिलं. मधल्या काळात भेट मिळालेली दोन भारीपैकी फाउंटन पेनं तशीच कपाटात पडून होती. 

अखेर एका रविवारी ती दोन्ही पेनं मी बाहेर काढली. कोरी करकरीत होती तरी सुट्टी करून पाण्यात बुडवून ठेवली. तेव्हढ्यात मधे पटकन जवळच्या दुकानातून काळी आणि निळी शाई व ड्रॉपर घेऊन आलो. 'काळे पेन्स' व 'आडव्या दुकानाची' फार प्रकर्षानं आठवण झाली. घरी येऊन बघतो तर काय दोन्ही पेनांना अंगचाच ड्रॉपर होता. असं काही नवलाचं असतं हे लहानपणी ऐकून माहिती होतं. ते नवल अचानक माझ्या हातात आलं होतं. अत्यंत काळजीपूर्वक मी दोन्ही पेनात शाई भरली व वापरायला लागलो. 

काळाच्या ओघात माझं ते पहिलं पेन कुठेतरी हरवलं. 'आडवं दुकान'ही गेलं. काळ्यांचं दुकानही इतिहासजमा व्हायच्या मार्गावर आहे. पण आजही पेनात शाई भरताना, शाईचा तो विशिष्ट वास मला बालपणीच्या त्या दिवसांची सफर घडवून आणतो. 


© मिलिंद लिमये 

टिप्पण्या

  1. आजसुद्धा काहीजण आवर्जून फाऊंटन पेन वापरतात. त्याचा रुबाब आजही काही और भासतो. गेले काही दिवस माझ्या मनात अश्या कालौघात लुप्त झालेल्या गोष्टींवर ब्लॉग लिहायचे घोळत होते. पब्लिक फोनचा लोखंडी डबा, STD / ISD बूथ, जत्रेतील पिटपिट, पैशाच्या नाण्याच्या आकारातील एक्सट्रा स्ट्रॉन्गच्या गोळ्या....आणि अश्या कितीतरी गो
    ष्टी. तुझा लेख वाचून असा ब्लॉग लिहायला अजून स्फूर्ती मिळाली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Great stories taking you down memory lane....tula kadhi kaay suchel/aathavel nem naahi pan title vaachunach pudhachi utsukata vaadhate and you never disappoint us...cheers bro!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत