मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - रघू

एका निवृत्त पोस्टमास्टरचं घर...

घरात स्वतः पोस्टमास्तरसाहेब शिवनाथजी, पत्नी निवर्तलेली, तीन मुलं, दोघांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं, तिसरा अजून अविवाहीत, शिवाय चौथा मुलगा व सून अपघातात गेल्यामुळे आश्रयाला आलेली त्याची अनाथ मुलगी असा सगळा कौटुंबिक लबेदा. प्रत्येकाच्या वागण्याची वेगळीच तऱ्हा. त्यातून मग भावाभावांचे वाद, जावाजावांची भांडणं हे ओघानंच चालू असतं. मास्तरसाहेब एक नंबरचे कंजूष, पण पलंगाच्या खाली एका पेटीत डबोलं राखून असलेले. शिवाय घरही त्यांच्याच नावावर. केवळ याच कारणामुळे सगळे भाऊ भांडत तंडत का होईना तिथेच रहात असतात. मात्र या भांडणांमुळे व विचित्र तऱ्हांपायी घरात एकही नोकर टिकत नसतो. सगळे अगदी वैतागून गेलेले असतात. 

अशा वेळी अचानक एक दिवस कुठून तरी रघू प्रकट होतो. स्वतःहून चालत आलेला हा बावर्ची घरातल्यांना जणू देवदूत प्रकट झाल्यासारखा वाटतो. आल्या आल्या रघू घराचा ताबा घेतो. यापूर्वी कुठे कुठे काम केलं ते सांगताना कुणाही थोरामोठ्यांची नावं सांगतो. संगीत, नृत्य, विविध भाषा, इतिहास, भूगोल यासगळ्याबरोबरीनं अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करणारा हा बावर्ची सगळ्यांच्या गळ्यातला ताईत न बनला तरच नवल. एका बाजूला सुरणाचे कबाब करून खायला घालताना, दुसरीकडे गाणं काय, नाच काय, अशा करामती दाखवतो. 

शाळेत मास्तर असलेल्या काशिनाथला साहित्याची आवड आहे म्हणताना तो त्याला 'इट इझ व्हेरी सिम्पल टु बी हॅपी बट व्हेरी डिफिकल्ट टु बी सिम्पल...' असं एक खरोखर विचारात पाडणारं वचन ऐकवतो. घरातल्या प्रत्येकाला तो 'अपना काम तो सभी करतें हैं, मगर दूसरोंका काम करने से जो खुशी मिलती है उसका जवाब नहीं' असं सांगून दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यास प्रवृत्त करतो. 'बडी बडी खुशियां पाने के चक्कर में हम कई सारी छोटी छोटी खुशियां गवा देते हैं' असं सांगत तो घरातल्या सगळ्यांना अखेर एकत्र आणतो. त्यांच्या दिनचर्येत, वागण्याबोलण्यात, विचारात आमूलाग्र बदल घडवून आणतो. 

पण या सगळ्या अष्टपैलू गुणांच्या जोडीला त्याच्या भोवती निर्माण होत असतं एक संशयाचं वलय. त्याला कारणीभूत असतं ते चित्रपटाच्या सुरुवातीला टीचर्स रूममधे वाचल्या गेलेल्या बातम्या आणि येता जाता रघूचं शिवनाथजींच्या पेटीकडे हेतूपूर्वक नजरेनं बघणं. पुढे अर्थातच या सगळ्या वागण्याचा उलगडा होतो व शेवटही गोड होतो. 

रघूची ही व्यक्तिरेखा आहे १९७५ साली आलेल्या हृषीकेश मुखर्जींच्या 'बावर्ची' या चित्रपटातली. राजेश खन्नाच्या ऐन भरातल्या काळातला हा चित्रपट. या चित्रपटाचा नायक निःसंशय राजेश खन्ना. पण त्याला रूढ अर्थानं नायिका नाही. तरुणींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या ह्या अभिनेत्यानं अशी ही थोडीशी हट के प्रकारची भूमिका त्यानं स्वीकारली याचं एकमेव कारण म्हणजे हृषीकेश मुखर्जीचं सशक्त कथानक. आणि निश्चितच त्यानं या भूमिकेचं व कथानकाचं चीज केलंय. 

रघूच्या संशयास्पद वागण्याचं निराकरण चित्रपट पहिल्यांदा बघितला तेव्हाच झालं होतं. तरीही केवळ या रघूच्या व्यक्तिरेखेसाठी मी हा चित्रपट अनेकदा पाहतो. अतिशय अष्टपैलू अशी ही व्यक्तिरेखा त्याच्या वागण्याबोलण्यातनं अनेक छोटे छोटे पण महत्वाचे संदेश देऊन जाते. 

खाकी हाफ, हाफ कसली? जवळ जवळ थ्रीफोर्थ चडडी, बाह्या दुमडलेला खाकी शर्ट, डोक्यावर उंच दिवालाची गांधी टोपी, पाठीवर एक खाकीच सॅक व हातात स्वयंपाकाच्या अवजारांची पेटी अशा वेशात सगळीकडे आनंद वाटायच्या मिशनवर निघालेल्या या रघूची ही व्यक्तिरेखा मला मनापासून भावली. 


Ⓒ मिलिंद लिमये 

टिप्पण्या

  1. हलक्याफुलक्या घटनातून सहज उपदेश करायच्या चित्रपटांच्या साखळीतील उत्तम कडी असणारा हा चित्रपट. ऋषिकेश मुखर्जी म्हणूनच लोकप्रिय होते.

    त्याचप्रमाणे वाचनीय ब्लॉगच्या साखळीतील तुझा अजुन एक ब्लॉग

    उत्तर द्याहटवा
  2. Your narration glides as smoothly as Bawarchi and makes its mark!!

    Hrishikesh Limaye or Milind Mukherjee??

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...