एका निवृत्त पोस्टमास्टरचं घर...
घरात स्वतः पोस्टमास्तरसाहेब शिवनाथजी, पत्नी निवर्तलेली, तीन मुलं, दोघांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं, तिसरा अजून अविवाहीत, शिवाय चौथा मुलगा व सून अपघातात गेल्यामुळे आश्रयाला आलेली त्याची अनाथ मुलगी असा सगळा कौटुंबिक लबेदा. प्रत्येकाच्या वागण्याची वेगळीच तऱ्हा. त्यातून मग भावाभावांचे वाद, जावाजावांची भांडणं हे ओघानंच चालू असतं. मास्तरसाहेब एक नंबरचे कंजूष, पण पलंगाच्या खाली एका पेटीत डबोलं राखून असलेले. शिवाय घरही त्यांच्याच नावावर. केवळ याच कारणामुळे सगळे भाऊ भांडत तंडत का होईना तिथेच रहात असतात. मात्र या भांडणांमुळे व विचित्र तऱ्हांपायी घरात एकही नोकर टिकत नसतो. सगळे अगदी वैतागून गेलेले असतात.
अशा वेळी अचानक एक दिवस कुठून तरी रघू प्रकट होतो. स्वतःहून चालत आलेला हा बावर्ची घरातल्यांना जणू देवदूत प्रकट झाल्यासारखा वाटतो. आल्या आल्या रघू घराचा ताबा घेतो. यापूर्वी कुठे कुठे काम केलं ते सांगताना कुणाही थोरामोठ्यांची नावं सांगतो. संगीत, नृत्य, विविध भाषा, इतिहास, भूगोल यासगळ्याबरोबरीनं अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करणारा हा बावर्ची सगळ्यांच्या गळ्यातला ताईत न बनला तरच नवल. एका बाजूला सुरणाचे कबाब करून खायला घालताना, दुसरीकडे गाणं काय, नाच काय, अशा करामती दाखवतो.
शाळेत मास्तर असलेल्या काशिनाथला साहित्याची आवड आहे म्हणताना तो त्याला 'इट इझ व्हेरी सिम्पल टु बी हॅपी बट व्हेरी डिफिकल्ट टु बी सिम्पल...' असं एक खरोखर विचारात पाडणारं वचन ऐकवतो. घरातल्या प्रत्येकाला तो 'अपना काम तो सभी करतें हैं, मगर दूसरोंका काम करने से जो खुशी मिलती है उसका जवाब नहीं' असं सांगून दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यास प्रवृत्त करतो. 'बडी बडी खुशियां पाने के चक्कर में हम कई सारी छोटी छोटी खुशियां गवा देते हैं' असं सांगत तो घरातल्या सगळ्यांना अखेर एकत्र आणतो. त्यांच्या दिनचर्येत, वागण्याबोलण्यात, विचारात आमूलाग्र बदल घडवून आणतो.
पण या सगळ्या अष्टपैलू गुणांच्या जोडीला त्याच्या भोवती निर्माण होत असतं एक संशयाचं वलय. त्याला कारणीभूत असतं ते चित्रपटाच्या सुरुवातीला टीचर्स रूममधे वाचल्या गेलेल्या बातम्या आणि येता जाता रघूचं शिवनाथजींच्या पेटीकडे हेतूपूर्वक नजरेनं बघणं. पुढे अर्थातच या सगळ्या वागण्याचा उलगडा होतो व शेवटही गोड होतो.
रघूची ही व्यक्तिरेखा आहे १९७५ साली आलेल्या हृषीकेश मुखर्जींच्या 'बावर्ची' या चित्रपटातली. राजेश खन्नाच्या ऐन भरातल्या काळातला हा चित्रपट. या चित्रपटाचा नायक निःसंशय राजेश खन्ना. पण त्याला रूढ अर्थानं नायिका नाही. तरुणींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या ह्या अभिनेत्यानं अशी ही थोडीशी हट के प्रकारची भूमिका त्यानं स्वीकारली याचं एकमेव कारण म्हणजे हृषीकेश मुखर्जीचं सशक्त कथानक. आणि निश्चितच त्यानं या भूमिकेचं व कथानकाचं चीज केलंय.
रघूच्या संशयास्पद वागण्याचं निराकरण चित्रपट पहिल्यांदा बघितला तेव्हाच झालं होतं. तरीही केवळ या रघूच्या व्यक्तिरेखेसाठी मी हा चित्रपट अनेकदा पाहतो. अतिशय अष्टपैलू अशी ही व्यक्तिरेखा त्याच्या वागण्याबोलण्यातनं अनेक छोटे छोटे पण महत्वाचे संदेश देऊन जाते.
👌👌👌
उत्तर द्याहटवा🙏🏼
हटवाहलक्याफुलक्या घटनातून सहज उपदेश करायच्या चित्रपटांच्या साखळीतील उत्तम कडी असणारा हा चित्रपट. ऋषिकेश मुखर्जी म्हणूनच लोकप्रिय होते.
उत्तर द्याहटवात्याचप्रमाणे वाचनीय ब्लॉगच्या साखळीतील तुझा अजुन एक ब्लॉग
धन्यवाद सुहास
हटवाYour narration glides as smoothly as Bawarchi and makes its mark!!
उत्तर द्याहटवाHrishikesh Limaye or Milind Mukherjee??
Ha Ha Ha....
हटवाThanks Shripad
मस्त
उत्तर द्याहटवाThanks :)
हटवा