मुख्य सामग्रीवर वगळा

मेरा साया साथ होगा

परवा ३१ तारखेला तिथीनं माझ्या आयुष्यात घडलेल्या या सत्यघटनेला चौतीस वर्षं पूर्ण झाली... 

१९८८ सालच्या पाडव्याच्या आदल्या रात्रीची ही गोष्ट आहे. सहा आठ महिन्यापूर्वीच मी सीएची आर्टिकलशिप सुरू केली होती. कामानिमित्त बरेचवेळा बाहेरगावी जावं लागायचं. पण दुसऱ्या दिवशी पाडव्याची सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो. त्याकाळी केबल टीव्ही वगैरे काहीही नसल्यामुळे व दूरदर्शन मर्यादित वेळेतच चालत असल्यामुळे रेडिओ, त्यातही विविध भारती आणि रेडिओ श्रीलंका हे मनोरंजनाचे मुख्य साधन होते. रोज रात्री साडेअकरापर्यंत 'बेला के फूल' ऐकणे हा एक थ्रिलिंग प्रकार असायचा. बेला के फूल ऐकणारा हा सर्वसाधारणपणे दर्दी मानला जायचा. मी मात्र कुणी दर्दी मानावं यासाठी नाही तर खरोखर जुन्या गाण्यांच्या प्रेमापायी बेला के फूल पर्यंतचे सर्व कार्यक्रम ऐकत असे. 

त्यादिवशी दुसऱ्या दिवशीच्या पाडव्याची तयारी करायला आईला मदत करून माझ्या खोलीत गेलो. एका बाजूला विविध भारती चालू होतं व दुसऱ्या बाजूला काहीतरी वाचत पडलो होतो. बेला के फूलचं शेवटचं गाणं लागायच्या बेतात होतं. रेडिओवर अनाउन्समेंट चालू होती, आईए सुनतें है आज का आखरी गाना लता मंगेशकर की आवाज में, फिल्म का नाम है मेरा साया.... 

अचानक डोक्यापासच्या टेबलावरचा फोन वाजला. रात्री अपरात्री आम्हा दोघा भावांना मित्रांचे फोन येतात म्हणून आमच्या बाबांनी एक एक्सटेंशन आमच्या खोलीतच बसवलं होतं. 

फोन वाजला. मी उचलून हॅलो म्हणलं. पण कुणीच बोलेना. दोन तीन वेळा हॅलो हॅलो म्हणून फोन ठेवणार तेव्हढ्यात फोनमधून 'मेरा साया' चित्रपटातलं 'तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा' हे गाणं ऐकू येऊ लागलं. माझ्या उशापाशी असलेल्या ट्रान्झिस्टरमधेही तेच गाणं वाजत होतं. मी थक्क झालो. कोण ऐकवतंय हे गाणं मला? समोरून दुसरा काहीच आवाज नव्हता. फक्त गाणं. मी विचार केला, बहुतेक गाणं संपल्यावर कुणीतरी बोलेल. 

सुमारे तीन, सव्वा तीन मिनिट मी ते गाणं दोन्ही बाजूनं ऐकलं. प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढत होती. गाणं संपलं. गाणं संपल्यावर वाजणारी विविध भारतीची ती खास टणन अशी घंटाही वाजली...

आणि फोन कट झाला...

आता मात्र माझी सटकली. प्रश्नच प्रश्न पडत होते. कोण असेल ते? का मला ते गाणं ऐकवलं? काय उद्देश असेल त्यामागे? माझ्यासाठीच होतं का रॉंग नंबर होता? कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळेना.

दुसऱ्या दिवशीपासून शेरलॉक होम्सच्या स्टाईलनं तपास चालू केला. त्याकाळी कॉलर आयडी वगैरे सोयी नसल्यामुळे कुणाचा फोन होता ते कळणं सोपं नव्हतं. डोळ्यासमोर काही संशयित नावं होती. त्यांच्याकडे सखोल चौकशी करून झाली. त्या संशयितांच्या इतर जवळच्या लोकांकडे चाचपणी करून झाली. पण काहीही हाती लागलं नाही. शेवटी 'ते गाणं माझ्यासाठी नव्हतंच' असं मानून केसची फाईल बंद केली. 

मात्र आजही पाडव्याच्या आदल्या दिवशी मला हा प्रसंग आठवतो...

तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा...

यादिवशी मी जिथं कुठं असेन तिथं मला हे गाणं आठवतं. 

पण कुणाचा 'साया' साथ आहे हे कोडं मात्र आजतागायत उलगडलं नाहीये... 


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत