मुख्य सामग्रीवर वगळा

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो. 

पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून रंगांधळा झाल्याचा फील यायचा. निळं ऊन काय, सोनेरी पारवा काय, राजवरखी कावळा काय. बाय द वे हा राजवरखी का काय जो रंग आहे ना तो रंगांधळा नसूनही मला माहीत नाहीये. तर अशा ह्या परिस्थितीमुळे कवितेशी (म्हणजे कविता ह्या साहित्यप्रकाराशी) माझा काहीही संबंध नव्हता. 

ही अशी स्थिती गेली तीस पस्तीस वर्षं अबाधित असताना, एक दिवस अचानक फेसबुकवर एक पोस्ट दिसली. माझ्या फेसबुकवरच्या स्नेही अमिता पेठे पैठणकर यांची ती पोस्ट होती. त्यांनी लिहिलं होतं,

दुकान इच्छांचे मी आवरले होते, आनंदाची सापडली लिमलेट मला... 

अरे वा, हल्लीचे कवी असंही लिहू शकतात तर? मला झालेला आनंद त्यांना कळवला. त्यातून असं कळलं की अशा अनेक कवी, कवयित्रींचा गझलशाळा नावाचा ग्रुप आहे. हे सर्व लोक गझल ह्या काव्यप्रकाराचा नीट अभ्यास करतात, चर्चा करतात व काहीतरी लेजिटिमेट लिहितात. अशा पंचेचाळीस गझलकारांच्या प्रत्येकी दोन याप्रमाणे नव्वद गझलांचा हा संग्रह म्हणजे 'गझलशाळा'. 

डोंगरपायथ्याच्या एखाद्या छोट्याशा खेडेगावातनं एखाद्या गडाकडे वाटचाल करताना कधीतरी अतिशय शिस्तबद्ध कवायत दिसते, कधी अटीतटीचा खोखोचा सामना दिसतो, कधी सुरेल आवाजात गायलेली कविता कानावर पडते आणि थोडी वाट वाकडी करून त्या शाळेत डोकवायचा मोह आवरत नाही. माझंही असंच झालं आणि मी ह्या 'गझलशाळेत' डोकावलो. 

अमिताताईंनी स्वहस्ताक्षरात त्यांच्याच एका गझलेतली ओळ लिहून एक प्रत मला पाठवलीय. शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी खूप छान, अर्थपूर्ण गझल लिहिल्या आहेत. नव्वदचं आहेत, पण माझ्या अजून सगळ्या वाचून झाल्या नाहीयेत. काहीवेळा अर्थ समजून घ्यायला वेळ लागतोय, पण तो माझा दोष. त्यामुळे पूर्ण वाचन झाल्यानंतर ह्या शाळेसंबंधी तुम्हाला सांगायचा विचार बाजूला ठेवून आधीच हे लिहून टाकलं. इथे मला आवडलेल्या ओळी वानगीदाखल टाकायचा मोह आवरत नाहीये. पण त्याचा उद्देश केवळ तुमचं कुतूहल वाढावं हा आहे. 

- हुज्जत घालत बसतो भाजीवाल्याशी, बस! लिहिताना सतावतो दुष्काळ मला (चैतन्य कुलकर्णी)

- मी तिच्या डोळ्यात बुडलो वाहवत गेलो, राहिले मग यायचे परतून काठावर (नेतराम इंगळकर)

- त्या फुलाचा स्वभाव फुलण्याचा, मात्र होते निमित्त चैत्राचे (समीर जिरांकलगीकर)

ज्यांना कुणाला गझल करायला, वाचायला आवडतात, त्यांना चाली लावायला आवडतात, त्यांनी अवश्य ह्या गझलशाळेत डोकवावं. एखादी 'लिमलेट' निश्चितच सापडेल.

गझलशाळेच्या सर्व सदस्यांचं मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूपसाऱ्या शुभेच्छा...




© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. कसला तो तीचा लाजरे पणा
    मंद झाली सारी पुणेरी हवा
    गझल काय करणार मी वेडा
    शब्द सुचतच नाही काही नवा

    उत्तर द्याहटवा
  2. या शाळेबद्दल कुतूहल निर्माण झालय. बालपणीची काय आणि ही गझलांची काय - दोन्ही शाळांमध्ये साम्य - दोघीही आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतात. लेख छान जमलाय.... आता तुझ्याकडून ब्लॉग इतक्याच ताकदीची गझल कधी वाचायला मिळते याची उत्सुकता आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत