मुख्य सामग्रीवर वगळा

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो...

हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली.... 

- बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना)

- अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल)

- सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव)

- त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा देव)

- आनंदला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर त्याचं गांभीर्य माहीत असल्याने, मोठया आशेने, कापऱ्या आवाजात 'फर्स्ट स्टेज ही है ना' असं विचारणारी मेट्रन, मिसेस डि'सा (ललिता पवार)

-  मुरारीलालच्या प्रॅन्कला कैसे हो जयचंद म्हणत प्रत्युत्तर देणारा व इतनी जल्दी एग्झिट लेने नहीं दूंगा म्हणत खोलीच्या बाहेर बाकड्यावर कोसळून पडणारा इसाभाई सुरतवाला (जॉनी वॉकर)

- आप साक्षात भीमसेन हो म्हणल्यावर सुखी रहो पुत्र घटोत्कच असा आशीर्वाद देणारा पैलवान (दारासिंग)

- आई असावी तर फक्त अशी, असं वाटायला लावणारी रेणूची आई (दुर्गा खोटे)

- विशिष्ट शैलीत, डॉक्टर, इस बार एक नई कॉम्प्लिकेशन शुरु हो गयी है म्हणणारा चंद्रनाथ (असित सेन)

- रेणूच्या मुखातून मध टपकवत 'ना जिया लागे ना' म्हणणाऱ्या लताबाई

- जिंदगी कैसी ही पहेली हाये विचारणारे मन्ना दा 

- कधी मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने, तर कधी कहीं दूर जब दिन ढल जाये म्हणणारे मुकेश 

- ही सर्व गाणी अप्रतिम चालीत बांधणारे संगीतकार सलिल चौधरी 

आणि ही सगळी हिरे माणकं या 'आनंद' नावाच्या रत्नहारात गुंफणारे निर्माता, दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी....

यांच्यापैकी कोणीही आज आपल्यात नाही.... 

आहेत ते फक्त 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं' हे शेवटचं, जीवघेणं वाक्य लिहिणारे गीतकार व पटकथा लेखक गुलजार व पडद्यावर आपल्या डायरीत हे वाक्य लिहून खाली खस्सकन रेघ मारणारा डॉ भास्कर बॅनर्जी उर्फ बाबू मोशाय, अमिताभ बच्चन...  



© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. खूप दिवसांनी लिहिले आहेस. नेहेमीप्रमाणे वाहती लेखन शैली. विषयाची उत्तम निवड आणि त्यावरील मनावर उमटणारे तरंग - दोन्हीची भट्टी मस्त जमते - त्यावेळेसही जमली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मला नेहमीचं आवडतं तुझं लिखाण... लिहीत जा रे 😍

    उत्तर द्याहटवा
  3. बाप रे, सुरवातीला लिखाण कुठल्या दिशेने जाणार हे कळत नाही. पण शेवट वाचल्यावर एकदम काटा आला अंगावर. Different perspective!

    उत्तर द्याहटवा
  4. Very true - Life has to be grand ! Nicely written Sir

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...