मुख्य सामग्रीवर वगळा

कॅलिडोस्कोप

माझ्या आसपास वयाच्या लोकांना विचारलं तर बहुतेक सगळे जण मान्य करतील की लहानपणी मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत कधी ना कधी त्यांनी कॅलिडोस्कोप बनवला आहे. मी तर अनेक वेळा बनवलाय. दुपारच्या उन्हाच्या वेळेला, जेव्हा घरातली मोठी माणसं बाहेर खेळायला जाऊ देत नसत, तेव्हा करायच्या अनेक टाईमपास पैकी हा एक. आरशाच्या तीन पट्ट्या, दोन गोल काचा, एक दुधी काच, पुठ्ठा, मार्बल पेपर, दोरा, डिंक, बांगड्यांचे तुकडे, मणी असे सगळे साहित्य जमवून आम्ही हा कॅलिडोस्कोप बनवायला घ्यायचो. आळीत अनेक जण हा बनवायचे. त्यातून मग कुणाचा कॅलिडोस्कोप जास्त भारी, वेगवेगळे आकृतीबंध दाखवतो, त्याची चढाओढ लागे. संपूर्ण सुट्टीभर मग हा कॅलिडोस्कोप आमच्या दिमतीला असायचा.

परवा काहीतरी शोधत असताना अचानक एक कॅलिडोस्कोप सापडला. कधी बनवला होता ते काही आठवेना पण इतक्या वर्षानंतर सुद्धा सुस्थितीत होता. मी उजेडाकडे रोखून कॅलिडोस्कोप फिरवायला सुरुवात केली. काय वेगवेगळे पॅटर्न दिसत होते, वा....  काही सुरेख होते, काही नव्हते. काही अगदी साधे होते, तर काही खूपच गुंतागुंतीचे. काही वेळा वाटलं की जरा अजून थोडं वेगळं असतं तर जास्त छान दिसलं असतं. काही वेळा वाटलं की हा एक तुकडा इथे पडला नसता तर बरं झालं असतं. त्यातून आणखी एक गंमत म्हणजे आत्ताच्या पेक्षा आधीचा पॅटर्न छान होता म्हणून उलटं फिरवलं तरी पुन्हा तो पॅटर्न मिळत नाही.

आयुष्य म्हणजे तरी काय आहे बघा ना. एक कॅलिडोस्कोप. बाकी काही नाही. एक हलकासा धक्का, एक छोटंसं वळण आणि सगळा पॅटर्नच बदलून जातो. त्यातले काही आपल्याला हवेसे वाटतात तर काही नकोसे. पण कॅलिडोस्कोप आपल्या हातात कुठे असतो? आपली इच्छा असो नसो, 'तो' वर बसलेला, कॅलिडोस्कोप फिरवतच राहातो, पॅटर्न निर्माण करतच राहतो. एखादा पॅटर्न कितीही आवडला तरी ना आपण तो उलटा फिरवू शकत, ना तो पॅटर्न परत दिसेल याची शाश्वती. आपल्या हाती राहतं फक्त ते पॅटर्न बघणं, त्या पॅटर्नचा भाग होऊन राहणं.

कितीतरी वेळ मी तो कॅलिडोस्कोप हातात घेऊन बसून होतो. मनात विचारांचा एक वेगळाच कॅलिडोस्कोप फिरत होता. अंधार पडला. हिनं येऊन दिवा लावला.

"काय रे, अंधारात का बसलायस.... ?"

"कॅलिडोस्कोप बघतोय......."

"अंधारात?" हिला काहीच कळेना.

काय सांगू आता हिला?

लहानपणाचा टाईमपास, आज एक वेगळाच पॅटर्न दाखवून गेला होता. 

टिप्पण्या

  1. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर क्या ब्लॉगमध्ये भूतकाळातील कॅलिडोस्कोप पाहायला गेलो. पण तेच डिझाईन परत कसे येणार.....पण नवीन डिझाईन सुद्धा सुरेख उमटले आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...