मुख्य सामग्रीवर वगळा

अस्पष्टाचा हुंकार

मनात एक द्वंद्व.

प्रस्थापितांची मक्तेदारी पटवून घ्यायची का त्याविरुद्ध उभं ठाकून विस्थापित व्हायचं. सगळं काही असह्य होतंय. काहीतरी करायला हवं.

कोणी एक पैशाच्या हव्यासापोटी आले. कोणी व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले. कोण हे टिकोजीराव? यांना हाकलायलाच पाहिजे. काहीतरी करायला हवं.

सगळं व्यवस्थित चाललं होतं. अचानक कोणीतरी कोणालातरी मारलं. का मारलं माहीत नाही. पण घरदार माझं जळालं. त्याला मारलं म्हणून माझं घरदार का जाळलं? माहीत नाही. काहीतरी करायला हवं.

दैवयोगे कुठेतरी उकिरड्यावर जन्माला आलो. आजूबाजूच्या खातेऱ्यातून बाहेरतर पडायचंय, पण काही मूठभर परत तिथेच ढकलताहेत. काहीतरी करायला हवं.

नकाशावर दाखवताही येणार नाही अशा एका जगात ते रहातात. साधा ताप आला तरी देवऋषाकडे जाऊन  जादूटोणा करतात. साध्या साध्या आजारात किडामुंगीसारखे मरतात. काहीतरी करायला हवं.

प्रतिस्पर्धी फॉर्मात आहे. जिंकायच्या ईर्ष्येने पेटला आहे. बाकीचे सहकारी खचतात की काय असं वाटतंय. काहीतरी करायला हवं.

काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं....

हा असतो अस्पष्टाचा हुंकार...

अंतरीच्या या हुंकाराला प्रतिसाद दिला शिवाजी महाराजांनी. या हुंकाराच्या नादावर चालत होते लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब. या हुंकाराचा माग घेत जंगलात पोचले डॉ. प्रकाश आमटे. याच हुंकाराची बॅट करून, अकरा साली त्यादिवशी चौथ्या नंबरवर मैदानात उतरला धोनी...

प्रवाहात वहात जाणं फारच सोपं असतं. असे अनेक प्रवाहपतित कुत्सितपणे, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्याला हसतात. प्रस्थापितांच्या पाठिंब्यानं त्याचे पाय खेचतात, बुडवू बघतात. पण एकदा ह्या हुंकाराचा अनाहत नाद मनात गुंजू लागला की असल्या गोष्टींनी काही फरक पडेनासा होतो.

हा हुंकार घेऊन येतो एक खुषीची फकीरी. असे अनेक अनामिक आहेत, ज्यांना प्रसिद्धीची हाव नाही, ज्यांना जग काय म्हणेल त्याची फिकीर नाही. काहीतरी करायला हवं म्हणताना त्यांनी काहीतरी करायला सुरुवात केली. गावातल्या मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून धडपडणारा, धुळे जिल्ह्यातला एखादा कल्पेश बागल असतो. आसाममधला एखादा पायेंग असतो जो एकहाती, चाळीस वर्षं खपून, तेराशे एकरावर झाडं लावतो. नगर जिल्ह्यातले एखादे राजाराम भापकर मास्तर सत्तावन्न वर्षं एकटे राबतात व चाळीस किलोमीटर रस्ता तयार करतात.

हा हुंकार आहे राखेखाली दबलेला अंगार. या हुंकारावर फुंकर घालून त्याचं होकारात रूपांतर होणं महत्वाचं. तरंच काही घडू शकतं, घडवता येतं.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत