मुख्य सामग्रीवर वगळा

बाहुली

आज बऱ्याच दिवसांनी बाहेरच्या लॉबीत काहीतरी गडबड ऐकू आली. गेले काही दिवस सगळेच जण घरात बंदिस्त होऊन पडल्यामुळे आल्यागेल्याची काही खबर नव्हती. मी दार उघडून पाहीलं तर शेजारची छोटी व तिची आई यांची काहीतरी झकापकी चालू होती. जरा खोलात शिरल्यावर असं कळलं की छोटीची एक आवडती बाहुली तिची आई कचऱ्यात टाकायला निघाली होती. आईच्या मते बाहुलीची अगदी लक्तरं झाली आहेत व त्यामुळे ती फेकून द्यायच्या लायकीची झाली आहे तर छोटीच्या मते कशीही असली तरी ती माझी 'सोनी' आहे, त्यामुळे लक्तरं ऑर अदरवाईज, ती फेकायचा प्रश्नच येत नाही. अखेर छोटीच्या आईने माघार घेतली व विजयी मुद्रेने त्या सोनीचे पापे घेत छोटी घरात पळाली.

तसं पाहिलं तर बाहुली हा काही माझ्या फारसा  जिव्हाळ्याचा विषय नाही. माझ्या लहानपणी आजूबाजूला खूप पोरंच होती. पोरी फारशा नव्हत्या. त्यामुळे भातुकली, बाहुलाबाहुलीचं लग्न असल्या खेळात जायची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. भरपूर मैदानी खेळ, दंगा, नस्ते उद्योग हे असले कार्यक्षेत्र असल्यामुळे रक्तचंदनाच्या बाहुलीशी मात्र फार चांगला परिचय होता. पाय मुरगळला किंवा कुठे मुका मार लागला की ही बाहुली उगाळून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावला जायचा. मागल्या बाजूनी पूर्ण चपटी असलेली ही बाहुली एरवी जात्याच्या खुंट्याला किंवा एखाद्या मेढीला आधार द्यायला पाचर म्हणूनही वापरली जायची.

गावातल्या एका मुख्य रस्त्यावर आमचे एक नातेवाईक रहात. त्यांच्या घराशेजारी एक जनरल स्टोअर होतं. तिथे खेळणी पण असायची. कधी कधी रबरी बॉल आणायला तिथे गेलं की प्लॅस्टिकच्या बाहुल्या ठेवलेल्या बघायला मिळत. त्यातल्या ज्या जरा भारीपैकी असायच्या त्यांचे डोळे उघडमीट वगैरे करायचे. आमच्या लहानपणी बार्बीचं फारसं प्रस्थ नव्हतं. आपल्या देशात ते जरा नंतरच आलं. काय पण एक एक तऱ्हा. वेगवेगळे कपडे काय, हेअरस्टाईल काय, बूट चपला काय. ऐकावं ते नवलच. दिसायलाही ही बार्बी फारच बरी होती. माझ्या लहानपणी मात्र बहुतेक मुली घरी बनवलेल्या कापडी बाहुल्या घेऊन फिरत. त्या सगळ्या बाहुल्या, 'झपाटलेला' नावाच्या पिक्चरमधल्या 'तात्या विंचू'च्या बाहुल्यासारख्या दिसत.

दोन प्रकारच्या बाहुल्या मात्र फारच आगळ्यावेगळ्या. एक म्हणजे कितीही आडवंतिडवं पाडली तरी सरळ उभी राहणारी निंग्यो नावाची जपानी बाहुली. परिस्थितीनं कितीही आडवं पाडो, पुन्हा जिद्दीनं सरळ उभं रहायला शिकवणारी ही बाहुली मला फार भावते. दुसरी म्हणजे एकीच्या पोटात दुसरी, दुसरीच्या पोटात तिसरी अशी सात सात किंवा नऊ नऊ बाहुल्या एकात एक असणारी मात्र्योष्का नावाची रशियन बाहुली. एकसारख्या दिसणाऱ्या ह्या बाहुल्या एकमेकींच्या पोटात इतक्या चपखल कशा बसतात ह्याचं मला आजही खूप कुतूहल आहे. काही काही माणसं बाहेरनं खूप मोठी दिसतात किंवा वाटतात, पण आतमधे मात्र अगदी क्षुद्र व सामान्य असतात, असंही काही सांगण्याचा विचार, ही बाहुली बनवण्यामागे असू शकतो.

बाहुल्या म्हणल्यावर रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांची आठवण होतेच. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या अर्धवटराव व आवडाबाई ह्या बाहुल्यांनी धमाल उडवली होती. त्यांचाच एक अत्यंत आगाऊ असा बोलका ससोबा पण होता. तो पुढे लिज्जत पापडाच्या जाहिरातीतही चमकला होता.

मला स्वतःला का कोण जाणे, ह्या बोलक्या बाहुल्या किंवा ती दोरीनं नाचवायची कळसूत्री पपेट्स अजिबात आवडत नाहीत. पण आजच बघाना आपलं सगळ्यांचं काय झालंय. कोण आहे तो? कोणी तुमच्यामाझ्यासारखा माणूस आहे का तो वर बसलेला? एका क्षुद्र, डोळ्यांना दिसूही न शकणाऱ्या विषाणूच्या मदतीनं त्यानं संपूर्ण जग नाचवायला घेतलंय. जगातला प्रत्येक देश, प्रत्येक नागरीक, त्यांचं आयुष्य, त्यांची भविष्य, त्यांची स्वप्नं, सगळं सगळं एका अदृश्य दोरीला बांधलं गेलंय. का तो असं सगळ्यांना नाचवतोय? किती नाचवणार आहे? कसं नाचवणार आहे? कुणालाही कशाचाच, कसलाच अंदाज नाहीये. आणि तरीही प्रत्येक बाहुली म्हणत्येय की हे नाचवणं जरा संपू दे, मग मी यंव करीन अन मी त्यंव करीन.

विचार करून करून डोकं जड झालं होतं. विषय बदलावा म्हणून टीव्ही लावला. तिथेही योगायोग असा की राजेश खन्नाचा 'आनंद' लागला होता व संपतच आला होता. नुकताच डॉ. बॅनर्जी (अमिताभ) आत आला होता व रडत रडत, 'बाते करो मुझसे' म्हणत होता. आणि सुरु झाला तो फेमस संवाद....

बाबू मोशाSSSSSय....

बाबू मोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहांपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता.... हा हा हा.... हा हा हा हा हा हा....  

संवादांची टेप संपली. रिकामी रीळ गरगर फिरू लागली. चित्रपटही संपला....

मनातल्या विचारांची रीळ मात्र तशीच गरगरतच राहिली...


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून