मुख्य सामग्रीवर वगळा

बाहुली

आज बऱ्याच दिवसांनी बाहेरच्या लॉबीत काहीतरी गडबड ऐकू आली. गेले काही दिवस सगळेच जण घरात बंदिस्त होऊन पडल्यामुळे आल्यागेल्याची काही खबर नव्हती. मी दार उघडून पाहीलं तर शेजारची छोटी व तिची आई यांची काहीतरी झकापकी चालू होती. जरा खोलात शिरल्यावर असं कळलं की छोटीची एक आवडती बाहुली तिची आई कचऱ्यात टाकायला निघाली होती. आईच्या मते बाहुलीची अगदी लक्तरं झाली आहेत व त्यामुळे ती फेकून द्यायच्या लायकीची झाली आहे तर छोटीच्या मते कशीही असली तरी ती माझी 'सोनी' आहे, त्यामुळे लक्तरं ऑर अदरवाईज, ती फेकायचा प्रश्नच येत नाही. अखेर छोटीच्या आईने माघार घेतली व विजयी मुद्रेने त्या सोनीचे पापे घेत छोटी घरात पळाली.

तसं पाहिलं तर बाहुली हा काही माझ्या फारसा  जिव्हाळ्याचा विषय नाही. माझ्या लहानपणी आजूबाजूला खूप पोरंच होती. पोरी फारशा नव्हत्या. त्यामुळे भातुकली, बाहुलाबाहुलीचं लग्न असल्या खेळात जायची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. भरपूर मैदानी खेळ, दंगा, नस्ते उद्योग हे असले कार्यक्षेत्र असल्यामुळे रक्तचंदनाच्या बाहुलीशी मात्र फार चांगला परिचय होता. पाय मुरगळला किंवा कुठे मुका मार लागला की ही बाहुली उगाळून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावला जायचा. मागल्या बाजूनी पूर्ण चपटी असलेली ही बाहुली एरवी जात्याच्या खुंट्याला किंवा एखाद्या मेढीला आधार द्यायला पाचर म्हणूनही वापरली जायची.

गावातल्या एका मुख्य रस्त्यावर आमचे एक नातेवाईक रहात. त्यांच्या घराशेजारी एक जनरल स्टोअर होतं. तिथे खेळणी पण असायची. कधी कधी रबरी बॉल आणायला तिथे गेलं की प्लॅस्टिकच्या बाहुल्या ठेवलेल्या बघायला मिळत. त्यातल्या ज्या जरा भारीपैकी असायच्या त्यांचे डोळे उघडमीट वगैरे करायचे. आमच्या लहानपणी बार्बीचं फारसं प्रस्थ नव्हतं. आपल्या देशात ते जरा नंतरच आलं. काय पण एक एक तऱ्हा. वेगवेगळे कपडे काय, हेअरस्टाईल काय, बूट चपला काय. ऐकावं ते नवलच. दिसायलाही ही बार्बी फारच बरी होती. माझ्या लहानपणी मात्र बहुतेक मुली घरी बनवलेल्या कापडी बाहुल्या घेऊन फिरत. त्या सगळ्या बाहुल्या, 'झपाटलेला' नावाच्या पिक्चरमधल्या 'तात्या विंचू'च्या बाहुल्यासारख्या दिसत.

दोन प्रकारच्या बाहुल्या मात्र फारच आगळ्यावेगळ्या. एक म्हणजे कितीही आडवंतिडवं पाडली तरी सरळ उभी राहणारी निंग्यो नावाची जपानी बाहुली. परिस्थितीनं कितीही आडवं पाडो, पुन्हा जिद्दीनं सरळ उभं रहायला शिकवणारी ही बाहुली मला फार भावते. दुसरी म्हणजे एकीच्या पोटात दुसरी, दुसरीच्या पोटात तिसरी अशी सात सात किंवा नऊ नऊ बाहुल्या एकात एक असणारी मात्र्योष्का नावाची रशियन बाहुली. एकसारख्या दिसणाऱ्या ह्या बाहुल्या एकमेकींच्या पोटात इतक्या चपखल कशा बसतात ह्याचं मला आजही खूप कुतूहल आहे. काही काही माणसं बाहेरनं खूप मोठी दिसतात किंवा वाटतात, पण आतमधे मात्र अगदी क्षुद्र व सामान्य असतात, असंही काही सांगण्याचा विचार, ही बाहुली बनवण्यामागे असू शकतो.

बाहुल्या म्हणल्यावर रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांची आठवण होतेच. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या अर्धवटराव व आवडाबाई ह्या बाहुल्यांनी धमाल उडवली होती. त्यांचाच एक अत्यंत आगाऊ असा बोलका ससोबा पण होता. तो पुढे लिज्जत पापडाच्या जाहिरातीतही चमकला होता.

मला स्वतःला का कोण जाणे, ह्या बोलक्या बाहुल्या किंवा ती दोरीनं नाचवायची कळसूत्री पपेट्स अजिबात आवडत नाहीत. पण आजच बघाना आपलं सगळ्यांचं काय झालंय. कोण आहे तो? कोणी तुमच्यामाझ्यासारखा माणूस आहे का तो वर बसलेला? एका क्षुद्र, डोळ्यांना दिसूही न शकणाऱ्या विषाणूच्या मदतीनं त्यानं संपूर्ण जग नाचवायला घेतलंय. जगातला प्रत्येक देश, प्रत्येक नागरीक, त्यांचं आयुष्य, त्यांची भविष्य, त्यांची स्वप्नं, सगळं सगळं एका अदृश्य दोरीला बांधलं गेलंय. का तो असं सगळ्यांना नाचवतोय? किती नाचवणार आहे? कसं नाचवणार आहे? कुणालाही कशाचाच, कसलाच अंदाज नाहीये. आणि तरीही प्रत्येक बाहुली म्हणत्येय की हे नाचवणं जरा संपू दे, मग मी यंव करीन अन मी त्यंव करीन.

विचार करून करून डोकं जड झालं होतं. विषय बदलावा म्हणून टीव्ही लावला. तिथेही योगायोग असा की राजेश खन्नाचा 'आनंद' लागला होता व संपतच आला होता. नुकताच डॉ. बॅनर्जी (अमिताभ) आत आला होता व रडत रडत, 'बाते करो मुझसे' म्हणत होता. आणि सुरु झाला तो फेमस संवाद....

बाबू मोशाSSSSSय....

बाबू मोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहांपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता.... हा हा हा.... हा हा हा हा हा हा....  

संवादांची टेप संपली. रिकामी रीळ गरगर फिरू लागली. चित्रपटही संपला....

मनातल्या विचारांची रीळ मात्र तशीच गरगरतच राहिली...


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत