मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज

एकदाचे ते परप्रांतीय मजूर आपापल्या मूळ गावी रवाना झाले. 
बरेच जण पोचलेसुद्धा म्हणे.... (टाळ्या)
भारतीय रेल्वेने फारच छान व्यवस्था केली म्हणतात....(प्रचंड टाळ्या)
लौकरच लाॅकडाऊन संपून उद्योगधंदे चालू होतील व अर्थचक्राचा गाडा हळूहळू मार्गी लागेल....(टाळ्यांचा तुफानी कडकडाट)
अमक्यातमक्याचा विजय असो...
झालं टाळ्या वाजवून? संपलं घोषणा देऊन?
आता सांगा, ह्या चालू होणाऱ्या उद्योगधंद्यांमधे काम करायला कामगार कुठून आणणार आहात? का पुन्हा एकदा भारतीय रेल्वे अशीच छान व्यवस्था करून त्यांना परत आणणार? आणि जरी समजा तशी व्यवस्था केलीच तरी गेल्या चाळीस दिवसात झालेली आबाळ, अवहेलना व मनस्ताप लक्षात घेता किती जण परत येतील? बहुतेकांचा सूर ‘गड्या अपुला गाव बरा’ असाच असू शकेल.
एवढा सगळा द्राविडी प्राणायाम व पैशाचा जाळ करण्यापेक्षा त्या पैशातून आहे त्या जागी या कामगारांची नीट व्यवस्था लावली असती तर सगळे तिथेच राहीले असते. उद्या सुरू होताना सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले असते.
सर्व पातळ्यांवरचे सत्ताधारी व नोकरशहांच्या हे लक्षात आले नसेल? का सामान्य माणसाला समजण्यापलिकडचे काही ‘भानगड’कारण आहे?
मति गुंग झाली आहे....
-----------
दोन दिवसांपूर्वी मी फेसबुकवर ही पोस्ट टाकली. त्यानंतर अनेक प्रतिक्रियांचा भडीमार झाला. सार्वजनिक सूर असा होता की या कोरोनाच्या निमित्ताने सगळ्या 'एम्प्लॉयमेंट्स' ज्या परप्रांतीयांनी काबीज केल्या होत्या, त्या आता मराठी मुलांसोबत 'एक्सचेंज' होतील. आनंद आहे असे झाले तर. मलाही मनापासून असेच व्हावेसे वाटते. मी स्वतः एक व्यावसायिक आहे. माझे स्वतःचे कर्मचारी निवडताना जरी 'पात्रता' हा मुख्य निकष असला तरी मराठी माणसाला प्राधान्य नक्कीच देतो. पण तरीही मराठी मुलांना ह्या संधीचं सोनं करता येईल का ही शंका मनात आहेच. अनेक मित्रांनी विविध निमित्ताने, विविध ठिकाणी लिहिलंय की त्यांच्या अनुभवानुसार मराठी मुलांना कष्ट नको असतात. सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर मी माझे दोन, प्रातिनिधिक असे, अनुभव इथे सांगू इच्छितो.

प्रसंग पहिला :
माझ्या आईवडिलांकडे घरकामासाठी एक बाई येतात. गेली पस्तीस वर्षं त्या आमच्याकडे काम करत आहेत. सुरुवातीला यायला लागल्या तेव्हा त्यांचं लग्नही झालं नव्हतं. दोनेक वर्षांनी लग्न झाला. नवरा कुशल गवंडी आहे. निर्व्यसनी नसला तरी व्यसनाधीनही नाहीये. दोन मुलं झाली. टुकीचा संसार आहे. नवराबायको दोघंही अंगठाछाप, पण मुलांना चांगलं शिक्षण दिलं. थोरला बी. कॉम. झाला. त्याला माझ्याकडे घेऊन आल्या. 'दादा, याला जरा कुठेतरी कामाला लावा की'. मार्क्स तसे सामधामच होते. माझ्या एका क्लायंटला स्टोअर्समधे काम करायला एक मुलगा हवाच होता. त्याच्याकडे ह्याला लावून दिला. चौथ्या दिवशी क्लायंटचा फोन आला की हा नोकरी सोडून गेला. माझ्या आईनं कारण विचारता त्या बाई म्हणाल्या, 'अहो ताई, कुठं भलत्या ठिकाणी नोकरी लावली दादांनी? जायाला कंपनीची बस नाही. ऑफिसमधे बसवलं तिथे गार करायचं मिशिन (AC) नाही. पोरगं म्हणलं एव्हढं शिकून झाल्यावर असल्या ठिकाणी काम नाय जमनार...'

सध्या तो मुलगा नाक्यावर भंकस करत उभा असतो. काहीही कामधंदा करत नाही. आईबापानं मध्यंतरी लग्न करून दिलं. बायको कुठल्यातरी तयार कपड्यांच्या कारखान्यात कामाला आहे. तिच्या जिवावर हा रिकामपणी गावभर फिरतोय. 

इकडे मात्र कंपनीच्या गेटसमोर एक मद्रासी अण्णांचं कँटीन आहे. त्या अण्णानं गावाकडनं एक पोरगा आणला व आमच्या क्लायंटकडे त्याच जागेवर लावून दिला. आज तो पोरगा दिवसभर कंपनीत काम करतो. त्या अण्णाच्या कँटीनमधेच खातोपितो. रात्री तिथेच रहातो. माझा क्लायंट सांगत होता की जवळजवळ रोज हा मुलगा ओव्हरटाईम करतो व दर महिन्याला स्वतःचा खर्च वजा जाऊन सुमारे पंचवीस हजार रुपये गावाकडं पाठवतो. 

प्रसंग दुसरा :
माझा एक मित्र खूप मोठा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे. हजार पंधराशे ट्रकचा ताफा आहे. शहराच्या बाहेर हायवेला त्याचं मोठं गॅरेज आहे. तिथे जवळच एक ढाबा आहे, जिथे ह्याचे ड्रायव्हर, मेकॅनिक लोक जेवायला, चहापाणी करायला जातात. त्याच ढाब्यावर आजूबाजूच्या छोट्या वर्कशॉप्स मधली लोकं पण येतात. तिथेच येत असत तीन तरुण इंजिनीयर्स. वय असेल साधारण चोवीस पंचवीस. त्यातले दोघे मराठी होते व एक शेजारच्या कर्नाटकातल्या खेड्यातनं आला होता. तिघंही जण मराठवाड्यातल्या कुठल्यातरी एका फालतू कॉलेजमधून इंजिनीअर झाले होते. त्यामुळं नशीब काढायला इकडे आले होते. एका वर्कशॉपमधे तुटपुंज्या पगारावर काम करत होते. त्यांनी ह्याच्या ड्रायव्हर्सच्या गप्पा ऐकल्या. त्यांचं उत्पन्न ऐकून ते थक्क झाले. तुम्हालाही माहीत नसेल कदाचित की लांब पल्ल्याचे ट्रक ड्रायव्हर्स महिन्याला ऐशी हजार ते एक लाख रुपये सहज कमावतात.

तिघेही जण माझ्या मित्राकडे नोकरी मागायला आले. शिकले सवरलेले पाहून मित्रानंही त्यांना गॅरेजमधे नोकरी दिली. आधीच्यापेक्षा दुप्पट पगारही दिला. काही दिवसांनी तो कानडी मुलगा स्वतःहून ट्रकचं लायसन्स घेऊन आला व म्हणाला की त्याला ट्रक चालवायचाय. कारण विचारता तो म्हणाला इंजिनीअर म्हणून चाळीस हजार मिळवण्यापेक्षा ड्रायव्हर म्हणून एक लाख रुपये मिळवायला आवडेल. मित्रानं उत्सुकतेनं दुसऱ्या दोघा मराठी मुलांनाही विचारलं. ते म्हणाले आम्ही इंजिनीअर आहोत. ड्रायव्हरकीचं फालतू काम नाही करणार. कानडी पोरानं मात्र इंजिनीअर असूनही आनंदानं ट्रक चालवायला घेतला. 

आज दोन वर्षांनी तो कानडी मुलगा, सुमारे पाचशे ट्रकचा 'फ्लीट इनचार्ज' झाला आहे. त्याचे कष्ट व काम करायची जिगर पाहूनच माझ्या मित्रानं त्याला ट्रकवरून काढून, 'फ्लीट'वर टाकला. महिन्याला साधारण दोन ते अडीच लाख कमावतो. इकडे त्याच ठिकाणी त्याचे दोन मित्र दोन वर्षात चाळीस वरून पन्नास हजारावर पोचले आहेत.  

सूज्ञास अधिक सांगणे न लगे...

©मिलिंद लिमये 

टिप्पण्या

  1. Point to ponder.....pan ponder karnaar kon? That is also a point to ponder....isn't it?

    उत्तर द्याहटवा
  2. Awsomm... खरी परिस्थिती आहे... आवड्या...

    उत्तर द्याहटवा
  3. आपल्या राजकारणी आणि अधिकारी वर्गाकडे छापील कामाशिवाय अश्या अभूतपूर्व अडचणी आल्यावर काय करायचे याची क्षमता आहे का अशी शंका येते.

    दुसरा मुद्दा मराठी माणसाच्या फसव्या प्रतिष्ठेचा. दुर्दैव आहे. माझ्या सोसायटी मधील वॉचमन दिवसभर नुसता बडून असतो, यूट्यूब पाहतो, पण पालापाचोळा बाजूला सार म्हटलं तर आवडत नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. माझा मस्कत चा अनुभव असाच आहे. महाराष्ट्र मधील मुले पहिल्या पासून मला हे पाहिजे ते पाहिजे असे म्हणत बसतात. काम मात्र हे नाही करणार ते नाही करणार. मस्त लेख. आवडला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून