मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज

एकदाचे ते परप्रांतीय मजूर आपापल्या मूळ गावी रवाना झाले. 
बरेच जण पोचलेसुद्धा म्हणे.... (टाळ्या)
भारतीय रेल्वेने फारच छान व्यवस्था केली म्हणतात....(प्रचंड टाळ्या)
लौकरच लाॅकडाऊन संपून उद्योगधंदे चालू होतील व अर्थचक्राचा गाडा हळूहळू मार्गी लागेल....(टाळ्यांचा तुफानी कडकडाट)
अमक्यातमक्याचा विजय असो...
झालं टाळ्या वाजवून? संपलं घोषणा देऊन?
आता सांगा, ह्या चालू होणाऱ्या उद्योगधंद्यांमधे काम करायला कामगार कुठून आणणार आहात? का पुन्हा एकदा भारतीय रेल्वे अशीच छान व्यवस्था करून त्यांना परत आणणार? आणि जरी समजा तशी व्यवस्था केलीच तरी गेल्या चाळीस दिवसात झालेली आबाळ, अवहेलना व मनस्ताप लक्षात घेता किती जण परत येतील? बहुतेकांचा सूर ‘गड्या अपुला गाव बरा’ असाच असू शकेल.
एवढा सगळा द्राविडी प्राणायाम व पैशाचा जाळ करण्यापेक्षा त्या पैशातून आहे त्या जागी या कामगारांची नीट व्यवस्था लावली असती तर सगळे तिथेच राहीले असते. उद्या सुरू होताना सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले असते.
सर्व पातळ्यांवरचे सत्ताधारी व नोकरशहांच्या हे लक्षात आले नसेल? का सामान्य माणसाला समजण्यापलिकडचे काही ‘भानगड’कारण आहे?
मति गुंग झाली आहे....
-----------
दोन दिवसांपूर्वी मी फेसबुकवर ही पोस्ट टाकली. त्यानंतर अनेक प्रतिक्रियांचा भडीमार झाला. सार्वजनिक सूर असा होता की या कोरोनाच्या निमित्ताने सगळ्या 'एम्प्लॉयमेंट्स' ज्या परप्रांतीयांनी काबीज केल्या होत्या, त्या आता मराठी मुलांसोबत 'एक्सचेंज' होतील. आनंद आहे असे झाले तर. मलाही मनापासून असेच व्हावेसे वाटते. मी स्वतः एक व्यावसायिक आहे. माझे स्वतःचे कर्मचारी निवडताना जरी 'पात्रता' हा मुख्य निकष असला तरी मराठी माणसाला प्राधान्य नक्कीच देतो. पण तरीही मराठी मुलांना ह्या संधीचं सोनं करता येईल का ही शंका मनात आहेच. अनेक मित्रांनी विविध निमित्ताने, विविध ठिकाणी लिहिलंय की त्यांच्या अनुभवानुसार मराठी मुलांना कष्ट नको असतात. सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर मी माझे दोन, प्रातिनिधिक असे, अनुभव इथे सांगू इच्छितो.

प्रसंग पहिला :
माझ्या आईवडिलांकडे घरकामासाठी एक बाई येतात. गेली पस्तीस वर्षं त्या आमच्याकडे काम करत आहेत. सुरुवातीला यायला लागल्या तेव्हा त्यांचं लग्नही झालं नव्हतं. दोनेक वर्षांनी लग्न झाला. नवरा कुशल गवंडी आहे. निर्व्यसनी नसला तरी व्यसनाधीनही नाहीये. दोन मुलं झाली. टुकीचा संसार आहे. नवराबायको दोघंही अंगठाछाप, पण मुलांना चांगलं शिक्षण दिलं. थोरला बी. कॉम. झाला. त्याला माझ्याकडे घेऊन आल्या. 'दादा, याला जरा कुठेतरी कामाला लावा की'. मार्क्स तसे सामधामच होते. माझ्या एका क्लायंटला स्टोअर्समधे काम करायला एक मुलगा हवाच होता. त्याच्याकडे ह्याला लावून दिला. चौथ्या दिवशी क्लायंटचा फोन आला की हा नोकरी सोडून गेला. माझ्या आईनं कारण विचारता त्या बाई म्हणाल्या, 'अहो ताई, कुठं भलत्या ठिकाणी नोकरी लावली दादांनी? जायाला कंपनीची बस नाही. ऑफिसमधे बसवलं तिथे गार करायचं मिशिन (AC) नाही. पोरगं म्हणलं एव्हढं शिकून झाल्यावर असल्या ठिकाणी काम नाय जमनार...'

सध्या तो मुलगा नाक्यावर भंकस करत उभा असतो. काहीही कामधंदा करत नाही. आईबापानं मध्यंतरी लग्न करून दिलं. बायको कुठल्यातरी तयार कपड्यांच्या कारखान्यात कामाला आहे. तिच्या जिवावर हा रिकामपणी गावभर फिरतोय. 

इकडे मात्र कंपनीच्या गेटसमोर एक मद्रासी अण्णांचं कँटीन आहे. त्या अण्णानं गावाकडनं एक पोरगा आणला व आमच्या क्लायंटकडे त्याच जागेवर लावून दिला. आज तो पोरगा दिवसभर कंपनीत काम करतो. त्या अण्णाच्या कँटीनमधेच खातोपितो. रात्री तिथेच रहातो. माझा क्लायंट सांगत होता की जवळजवळ रोज हा मुलगा ओव्हरटाईम करतो व दर महिन्याला स्वतःचा खर्च वजा जाऊन सुमारे पंचवीस हजार रुपये गावाकडं पाठवतो. 

प्रसंग दुसरा :
माझा एक मित्र खूप मोठा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे. हजार पंधराशे ट्रकचा ताफा आहे. शहराच्या बाहेर हायवेला त्याचं मोठं गॅरेज आहे. तिथे जवळच एक ढाबा आहे, जिथे ह्याचे ड्रायव्हर, मेकॅनिक लोक जेवायला, चहापाणी करायला जातात. त्याच ढाब्यावर आजूबाजूच्या छोट्या वर्कशॉप्स मधली लोकं पण येतात. तिथेच येत असत तीन तरुण इंजिनीयर्स. वय असेल साधारण चोवीस पंचवीस. त्यातले दोघे मराठी होते व एक शेजारच्या कर्नाटकातल्या खेड्यातनं आला होता. तिघंही जण मराठवाड्यातल्या कुठल्यातरी एका फालतू कॉलेजमधून इंजिनीअर झाले होते. त्यामुळं नशीब काढायला इकडे आले होते. एका वर्कशॉपमधे तुटपुंज्या पगारावर काम करत होते. त्यांनी ह्याच्या ड्रायव्हर्सच्या गप्पा ऐकल्या. त्यांचं उत्पन्न ऐकून ते थक्क झाले. तुम्हालाही माहीत नसेल कदाचित की लांब पल्ल्याचे ट्रक ड्रायव्हर्स महिन्याला ऐशी हजार ते एक लाख रुपये सहज कमावतात.

तिघेही जण माझ्या मित्राकडे नोकरी मागायला आले. शिकले सवरलेले पाहून मित्रानंही त्यांना गॅरेजमधे नोकरी दिली. आधीच्यापेक्षा दुप्पट पगारही दिला. काही दिवसांनी तो कानडी मुलगा स्वतःहून ट्रकचं लायसन्स घेऊन आला व म्हणाला की त्याला ट्रक चालवायचाय. कारण विचारता तो म्हणाला इंजिनीअर म्हणून चाळीस हजार मिळवण्यापेक्षा ड्रायव्हर म्हणून एक लाख रुपये मिळवायला आवडेल. मित्रानं उत्सुकतेनं दुसऱ्या दोघा मराठी मुलांनाही विचारलं. ते म्हणाले आम्ही इंजिनीअर आहोत. ड्रायव्हरकीचं फालतू काम नाही करणार. कानडी पोरानं मात्र इंजिनीअर असूनही आनंदानं ट्रक चालवायला घेतला. 

आज दोन वर्षांनी तो कानडी मुलगा, सुमारे पाचशे ट्रकचा 'फ्लीट इनचार्ज' झाला आहे. त्याचे कष्ट व काम करायची जिगर पाहूनच माझ्या मित्रानं त्याला ट्रकवरून काढून, 'फ्लीट'वर टाकला. महिन्याला साधारण दोन ते अडीच लाख कमावतो. इकडे त्याच ठिकाणी त्याचे दोन मित्र दोन वर्षात चाळीस वरून पन्नास हजारावर पोचले आहेत.  

सूज्ञास अधिक सांगणे न लगे...

©मिलिंद लिमये 

टिप्पण्या

  1. Point to ponder.....pan ponder karnaar kon? That is also a point to ponder....isn't it?

    उत्तर द्याहटवा
  2. Awsomm... खरी परिस्थिती आहे... आवड्या...

    उत्तर द्याहटवा
  3. आपल्या राजकारणी आणि अधिकारी वर्गाकडे छापील कामाशिवाय अश्या अभूतपूर्व अडचणी आल्यावर काय करायचे याची क्षमता आहे का अशी शंका येते.

    दुसरा मुद्दा मराठी माणसाच्या फसव्या प्रतिष्ठेचा. दुर्दैव आहे. माझ्या सोसायटी मधील वॉचमन दिवसभर नुसता बडून असतो, यूट्यूब पाहतो, पण पालापाचोळा बाजूला सार म्हटलं तर आवडत नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. माझा मस्कत चा अनुभव असाच आहे. महाराष्ट्र मधील मुले पहिल्या पासून मला हे पाहिजे ते पाहिजे असे म्हणत बसतात. काम मात्र हे नाही करणार ते नाही करणार. मस्त लेख. आवडला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत