मुख्य सामग्रीवर वगळा

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी

 सदानंदची आणि माझी गेल्या जवळजवळ पन्नास वर्षांची मैत्री आहे. प्राथमिक शाळेत आम्ही दोघं एका वर्गात होतो. आमची घरंही अगदी जवळ होती. त्यामुळे नंतर शाळा बदलल्या तरी संपर्क टिकून होता. पुढे १९८७ साली आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. त्याकाळी आजच्यासारखी माध्यमं नसल्यामुळे सहज संपर्क होत नसे. तसाच आमचाही संपर्क तुटला. अधूनमधून त्याच्याबद्दल काही कळत असायचं. तो आयसीडब्ल्यूए करत होता हेही माहीत होतं. अचानक एक दिवस कळलं की सदानंद आयपीएस होऊन महाराष्ट्र पोलिसात रुजू झाला आहे. आनंदही झाला तसंच आश्चर्यही वाटलं. काही केल्या 'ए, घाल रे त्याला टायरमधे' असं म्हणणारा सदानंद डोळ्यापुढे येईना. केव्हातरी संधी मिळाली की बघू असं म्हणून मी ती संधी मिळायची वाट बघत राहिलो. 

दिवस उलटत होते. सदानंदची भेट काही होत नव्हती. अचानक २६/११ ची दुःखद घटना घडली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मारले गेले असून सदानंद दाते गंभीर जखमी झाले आहेत ही बातमी पाहून धक्काच बसला. आता मात्र ह्याला गाठायचंच असं ठरवलं. पण कुठे? योगायोगाने माझ्या नवीन काळे या मित्राकडून सदानंदचा नंबर मिळाला. जरा धाकधूक करतच त्याला फोन लावला. मी कोण सांगितल्यावर ज्या स्वरात तो 'अरे बोल' म्हणाला त्या स्वराने मधल्या वीस बावीस वर्षांची गॅप क्षणात भरून गेली. 

आता मात्र आमच्या भेटी होत असतात. समाजमाध्यमांद्वारे आम्ही संपर्कातही असतो. पण हा वर्दीतला असूनही माणूसच राहिला आहे. पुलंनी त्यांच्या अपूर्वाई या पुस्तकात एक प्रसंग लिहिलाय. ते सॅम्युएल जॉन्सन या इंग्लिश कवीचं घर बघायला गेले होते. तिथे एक खूपच साधा सोफा होता. त्यासंबंधी विचारल्यावर त्यांना असं कळलं की जॉन्सनच्या बायकोनं तो त्याला भेट दिला होता. इतका साधा आणि मोठा सोफा भेट म्हणून दिला? घर दाखवणाऱ्या बाई म्हणाल्या, हो कारण जॉन्सनही खूप साधा आणि खूप मोठा होता. आमचा हा वर्दीतला मित्रही खूप साधा आणि खूप मोठा आहे. एखादे वेळी आम्हा मित्रांबरोबर 'वाडेश्वर'मधे इडली खाताना दिसला तर बिलकुल आश्चर्य वाटू देऊ नका. 

याचं प्रत्यंतर मागल्याच आठवड्यात प्रकाशित झालेल्या त्याच्या 'वर्दीतल्या माणसाच्या नोंदी' हे पुस्तक वाचताना येतं. सर्वसाधारणपणे मोठ्या पदावरील अधिकारी किंवा इतर सेलेब्रिटी अनुभवकथन वा आत्मचरित्र लिहितात त्यात एक प्रकारचा अभिनिवेश आढळतो. काही घटना, विशेषतः लहानपणीच्या किंवा कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना ह्या विशेष रंगवल्या जातात. सदानंदच्या लेखनात मात्र हा अभिनिवेश कुठेही आढळणार नाही. साध्या सरळ 'हे हे असं असं घडलं' असं सांगणारं हे पुस्तक आहे. पण एक निश्चित. भाषा साधी सरळ सोपी असली तरी त्या मागचा विचार आणि आशय खूप मोठा आहे. रिबेरोसाहेबांनी प्रस्तावनेत म्हणलंच आहे की या नोंदी पोलीस खात्यातल्या प्रत्येक तरुण उमेदवाराने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वाचायलाच हव्यात. मी तर म्हणतो की फक्त पोलीस खात्यातल्याच का? प्रत्येक तरुण उमेदवाराने व कुठल्याही क्षेत्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ह्या नोंदी वाचायला हव्यात. 

मी तर वाचल्याच, तुम्हीही अवश्य वाचा....




© मिलिंद लिमये 








टिप्पण्या

  1. अजून लिही... मला वाचताना नवे विषय सुचतात... 🤭🤭मस्त लिहिलंयस नेहमी प्रमाणे 👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा
  2. Will definitely buy the book and read it. Your recommendation has a different value.
    Had read "Me YC Boltoy" by ex comm Y C Pawar of Varadarajan Mudaliar case. This too must be interesting.

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर लिखाण. पुस्तक नक्की वाचेन.

    उत्तर द्याहटवा
  4. छान लिहिलं आहेस. वर्षांच्या हिशेबात मोजलं तर माझी सदानंदची ओळख तुझ्या ओळखीच्या निम्म्या वयाची आहे. पण मला समजलेला सदानंद आणि तू केलेले वर्णन तंतोतंत जुळते. साधेपणा आणि मोठेपणा त्याच्या रोमारोमात भिनले आहेत. म्हणूनच तो आज या उंचीवर पोहोचला आहे. त्याच पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून