मुख्य सामग्रीवर वगळा

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते.

मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते. 

पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो. 

तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय असतो. कधी एखादा गण्या नक्की काय करतो ते घरच्यांनाही माहीत नसतं. दुपारी जेवायला घरी येतो गं, असं सांगून बाहेर पडलेला गण्या, रात्री जेवायला तरी घरी येईल का नाही याची घरच्या माउलीला शाश्वती नसते. तशी त्यांना पाळण्यात ठेवलेली लौकिक नावंही असतात. पण यांना ओळखणारे सर्वजण यांना गण्या असंच म्हणतात. चुकून एखादा नवीन ओळख झालेला कोणीतरी यांना गणेशराव किंवा गणेशजी म्हणतो व ह्या गण्या लोकांना थोडंसं लाजल्यासारखं होतं. 

सर्वत्र संचार व अगणित ओळखी हे या गण्या लोकांचं शक्तिस्थान. त्याच जोडीला कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता प्रत्येकाला मदत करायची वृत्ती. पण यामुळेच कुठल्याही ग्रुपचा गण्या हा कणा असतो. सोशल मीडिया नसतानाच्या काळात अनेक ग्रूप केवळ या गण्या लोकांमुळे एकत्र आले. शाळा कॉलेज संपवून सगळे मित्र पांगले, भेटीगाठी कमी झाल्या, पण त्यानंतरही सगळ्यांशी संपर्कात होते ते हे गण्या लोक. ह्या प्रक्रियेमधे परदेशात असलेल्या मित्राच्या आईची वेळोवेळी काळजी घेणे, कुणाच्या घरी काही आजारपण असल्यास डॉक्टर, हॉस्पिटल या सर्व पातळ्यांवर धावपळ करणे ही कामं गण्या लोक आनंदानं करतात. तसं पाहिलं तर आजही सगळेजण भले व्हॉट्स अपवर वगैरे कनेक्टेड असले तरी 'काय कसं काय' पुरतेच संपर्कात असतात. मग ह्या गण्या लोकांच्या अंगात संचारतं. कोणी एखादा मित्र परदेशातून सुट्टीसाठी येणार असतो. कुणा एखाद्या मित्राला गाठून गण्या लोक पार्टी ठरवतात. हो नाही करत बहुतेक सगळे जमतात. मित्र भेटतील हा उद्देश तर असतोच पण मुख्य कारण असतं ते म्हणजे ह्या गण्याचा प्रेमयुक्त धाक किंवा धाकयुक्त प्रेम... 

ह्या सर्व गण्या लोकांना खरी 'किक' बसते ती एखाद्याला मदत हवी आहे म्हणल्यावर. असंख्य ओळखी असल्यामुळे ह्यांना कुठेही ऍक्सेस असतो. बरं कुणाला मदत करताना आपलं काही त्यात बघावं तर तेही नाही. 'क्ष'च्या ओळखीतून 'य'चा प्रचंड फायदा कसा झाला याचंच या गण्या लोकांना कौतुक...

परवाच गण्या अचानक माझ्या ऑफिसमधे प्रकट झाला. हे सर्व गण्या लोक 'नारद' गोत्राचे असतात. पौराणिक चित्रपटातले नारदमुनी जसं अचानक एक झांज वाजल्यावर नारायण, नारायण म्हणत प्रकट होतात ना तसेच हे गण्या लोक कधीही प्रकट होतात. 

काय रे गण्या....?

तुला सांगतो, हे सगळं आता सोडून देणार आहे. बास झालं लोककल्याण. कितीही धावपळ करा, ह्यांना काही किंमतच नाही. मस्त घरी बसतो टेरेसवर खुर्ची टाकून, हे बोंबलत फिरणं नको नि काही नको...

त्याचा एकूण मूड बघून मी त्याला चहा प्यायला बाहेर काढतो. चहा पिऊन होईपर्यंत किरकोळ गप्पा होतात. अचानक गण्याचा फोन वाजतो. 

'.....' पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलतो.

'हो, आहे की. माझ्या चांगल्या ओळखीचा आहे....' इतका वेळ 'डीम' झालेला गण्या आता पुन्हा 'फसफसायला' लागतो. 

'.....'

'तू आत्ता कुठंयस'?  '.....'

'थांब, पंधरा मिनिटात तिथे पोचतो. मग बोलू'

सुमारे साडेनऊ मिनिटांपूर्वी केलेली घनघोर प्रतिज्ञा विसरून, दहाव्या मिनिटाला गण्या पुन्हा मोहिमेवर निघालेलाही असतो...


© मिलिंद लिमये


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून