गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते.
मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.
पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.
तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय असतो. कधी एखादा गण्या नक्की काय करतो ते घरच्यांनाही माहीत नसतं. दुपारी जेवायला घरी येतो गं, असं सांगून बाहेर पडलेला गण्या, रात्री जेवायला तरी घरी येईल का नाही याची घरच्या माउलीला शाश्वती नसते. तशी त्यांना पाळण्यात ठेवलेली लौकिक नावंही असतात. पण यांना ओळखणारे सर्वजण यांना गण्या असंच म्हणतात. चुकून एखादा नवीन ओळख झालेला कोणीतरी यांना गणेशराव किंवा गणेशजी म्हणतो व ह्या गण्या लोकांना थोडंसं लाजल्यासारखं होतं.
सर्वत्र संचार व अगणित ओळखी हे या गण्या लोकांचं शक्तिस्थान. त्याच जोडीला कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता प्रत्येकाला मदत करायची वृत्ती. पण यामुळेच कुठल्याही ग्रुपचा गण्या हा कणा असतो. सोशल मीडिया नसतानाच्या काळात अनेक ग्रूप केवळ या गण्या लोकांमुळे एकत्र आले. शाळा कॉलेज संपवून सगळे मित्र पांगले, भेटीगाठी कमी झाल्या, पण त्यानंतरही सगळ्यांशी संपर्कात होते ते हे गण्या लोक. ह्या प्रक्रियेमधे परदेशात असलेल्या मित्राच्या आईची वेळोवेळी काळजी घेणे, कुणाच्या घरी काही आजारपण असल्यास डॉक्टर, हॉस्पिटल या सर्व पातळ्यांवर धावपळ करणे ही कामं गण्या लोक आनंदानं करतात. तसं पाहिलं तर आजही सगळेजण भले व्हॉट्स अपवर वगैरे कनेक्टेड असले तरी 'काय कसं काय' पुरतेच संपर्कात असतात. मग ह्या गण्या लोकांच्या अंगात संचारतं. कोणी एखादा मित्र परदेशातून सुट्टीसाठी येणार असतो. कुणा एखाद्या मित्राला गाठून गण्या लोक पार्टी ठरवतात. हो नाही करत बहुतेक सगळे जमतात. मित्र भेटतील हा उद्देश तर असतोच पण मुख्य कारण असतं ते म्हणजे ह्या गण्याचा प्रेमयुक्त धाक किंवा धाकयुक्त प्रेम...
ह्या सर्व गण्या लोकांना खरी 'किक' बसते ती एखाद्याला मदत हवी आहे म्हणल्यावर. असंख्य ओळखी असल्यामुळे ह्यांना कुठेही ऍक्सेस असतो. बरं कुणाला मदत करताना आपलं काही त्यात बघावं तर तेही नाही. 'क्ष'च्या ओळखीतून 'य'चा प्रचंड फायदा कसा झाला याचंच या गण्या लोकांना कौतुक...
परवाच गण्या अचानक माझ्या ऑफिसमधे प्रकट झाला. हे सर्व गण्या लोक 'नारद' गोत्राचे असतात. पौराणिक चित्रपटातले नारदमुनी जसं अचानक एक झांज वाजल्यावर नारायण, नारायण म्हणत प्रकट होतात ना तसेच हे गण्या लोक कधीही प्रकट होतात.
काय रे गण्या....?
तुला सांगतो, हे सगळं आता सोडून देणार आहे. बास झालं लोककल्याण. कितीही धावपळ करा, ह्यांना काही किंमतच नाही. मस्त घरी बसतो टेरेसवर खुर्ची टाकून, हे बोंबलत फिरणं नको नि काही नको...
त्याचा एकूण मूड बघून मी त्याला चहा प्यायला बाहेर काढतो. चहा पिऊन होईपर्यंत किरकोळ गप्पा होतात. अचानक गण्याचा फोन वाजतो.
'.....' पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलतो.
'हो, आहे की. माझ्या चांगल्या ओळखीचा आहे....' इतका वेळ 'डीम' झालेला गण्या आता पुन्हा 'फसफसायला' लागतो.
'.....'
'तू आत्ता कुठंयस'? '.....'
'थांब, पंधरा मिनिटात तिथे पोचतो. मग बोलू'
सुमारे साडेनऊ मिनिटांपूर्वी केलेली घनघोर प्रतिज्ञा विसरून, दहाव्या मिनिटाला गण्या पुन्हा मोहिमेवर निघालेलाही असतो...
© मिलिंद लिमये
आपला गण्या हा 💯 गण्या आहे.
उत्तर द्याहटवामस्त! बापु काणे आठवला
उत्तर द्याहटवाVery nicely presented Milind with due justice to such universal beings
उत्तर द्याहटवाLong time sir. Nicely written.
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाMastach lihilay..ganya dolyasamor ubha rahila
उत्तर द्याहटवा