मुख्य सामग्रीवर वगळा

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते.

मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते. 

पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो. 

तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय असतो. कधी एखादा गण्या नक्की काय करतो ते घरच्यांनाही माहीत नसतं. दुपारी जेवायला घरी येतो गं, असं सांगून बाहेर पडलेला गण्या, रात्री जेवायला तरी घरी येईल का नाही याची घरच्या माउलीला शाश्वती नसते. तशी त्यांना पाळण्यात ठेवलेली लौकिक नावंही असतात. पण यांना ओळखणारे सर्वजण यांना गण्या असंच म्हणतात. चुकून एखादा नवीन ओळख झालेला कोणीतरी यांना गणेशराव किंवा गणेशजी म्हणतो व ह्या गण्या लोकांना थोडंसं लाजल्यासारखं होतं. 

सर्वत्र संचार व अगणित ओळखी हे या गण्या लोकांचं शक्तिस्थान. त्याच जोडीला कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता प्रत्येकाला मदत करायची वृत्ती. पण यामुळेच कुठल्याही ग्रुपचा गण्या हा कणा असतो. सोशल मीडिया नसतानाच्या काळात अनेक ग्रूप केवळ या गण्या लोकांमुळे एकत्र आले. शाळा कॉलेज संपवून सगळे मित्र पांगले, भेटीगाठी कमी झाल्या, पण त्यानंतरही सगळ्यांशी संपर्कात होते ते हे गण्या लोक. ह्या प्रक्रियेमधे परदेशात असलेल्या मित्राच्या आईची वेळोवेळी काळजी घेणे, कुणाच्या घरी काही आजारपण असल्यास डॉक्टर, हॉस्पिटल या सर्व पातळ्यांवर धावपळ करणे ही कामं गण्या लोक आनंदानं करतात. तसं पाहिलं तर आजही सगळेजण भले व्हॉट्स अपवर वगैरे कनेक्टेड असले तरी 'काय कसं काय' पुरतेच संपर्कात असतात. मग ह्या गण्या लोकांच्या अंगात संचारतं. कोणी एखादा मित्र परदेशातून सुट्टीसाठी येणार असतो. कुणा एखाद्या मित्राला गाठून गण्या लोक पार्टी ठरवतात. हो नाही करत बहुतेक सगळे जमतात. मित्र भेटतील हा उद्देश तर असतोच पण मुख्य कारण असतं ते म्हणजे ह्या गण्याचा प्रेमयुक्त धाक किंवा धाकयुक्त प्रेम... 

ह्या सर्व गण्या लोकांना खरी 'किक' बसते ती एखाद्याला मदत हवी आहे म्हणल्यावर. असंख्य ओळखी असल्यामुळे ह्यांना कुठेही ऍक्सेस असतो. बरं कुणाला मदत करताना आपलं काही त्यात बघावं तर तेही नाही. 'क्ष'च्या ओळखीतून 'य'चा प्रचंड फायदा कसा झाला याचंच या गण्या लोकांना कौतुक...

परवाच गण्या अचानक माझ्या ऑफिसमधे प्रकट झाला. हे सर्व गण्या लोक 'नारद' गोत्राचे असतात. पौराणिक चित्रपटातले नारदमुनी जसं अचानक एक झांज वाजल्यावर नारायण, नारायण म्हणत प्रकट होतात ना तसेच हे गण्या लोक कधीही प्रकट होतात. 

काय रे गण्या....?

तुला सांगतो, हे सगळं आता सोडून देणार आहे. बास झालं लोककल्याण. कितीही धावपळ करा, ह्यांना काही किंमतच नाही. मस्त घरी बसतो टेरेसवर खुर्ची टाकून, हे बोंबलत फिरणं नको नि काही नको...

त्याचा एकूण मूड बघून मी त्याला चहा प्यायला बाहेर काढतो. चहा पिऊन होईपर्यंत किरकोळ गप्पा होतात. अचानक गण्याचा फोन वाजतो. 

'.....' पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलतो.

'हो, आहे की. माझ्या चांगल्या ओळखीचा आहे....' इतका वेळ 'डीम' झालेला गण्या आता पुन्हा 'फसफसायला' लागतो. 

'.....'

'तू आत्ता कुठंयस'?  '.....'

'थांब, पंधरा मिनिटात तिथे पोचतो. मग बोलू'

सुमारे साडेनऊ मिनिटांपूर्वी केलेली घनघोर प्रतिज्ञा विसरून, दहाव्या मिनिटाला गण्या पुन्हा मोहिमेवर निघालेलाही असतो...


© मिलिंद लिमये


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत