मुख्य सामग्रीवर वगळा

तिची गाणी, त्याची गाणी - ऋषी कपूर

ऋषी कपूर म्हणल्याक्शणी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो एक चॉकलेट हीरो. गुलजार, देखणा, हॅण्डसम, टिपिकल कपूर. रोमॅंटिक भूमिका, नाच, गाणी या पलीकडे आपण त्याला आठवू शकत नाही. पण ऋषी एक अत्यंत समर्थ अभिनेता होता. चित्रपटसृष्टी केवळ त्याच्या रोमॅंटिक इमेजचा फायदा घेत राहिली. तो तिथला भाग आहे. मात्र आपण त्याच्या गाण्यांबद्दल व अभिनयाबद्दल न बोलणे हा त्याच्यावर अन्याय होईल. वडील राज कपूर यांच्या प्रमाणेच ऋषीला सूर व शब्द यांची अचूक जाण होती. अजून एक गोष्ट त्याने त्यांच्याकडून घेतली होती, ती म्हणजे, अतिशय बोलका व क्षणात भाव बदलणारा चेहरा. आणि ह्याच दोन गोष्टींसाठी 'त्याची गाणी' सदरासाठी तो पात्र ठरतो. सत्तर व ऐंशीच्या दशकांमधली त्याची अनेक गाणी आपण आजही ऐकतो, गुणगुणतो. पण आज काही गाणी अशी आठवूया की जी एरवी आपण म्हणतोच असे नाही.

जीतेंद्र व रीना रॉय यांच्याबरोबर त्याचा 'बदलते रिश्‍ते' नावाचा एक, तसा कमी प्रसिद्ध, चित्रपट आहे. ऋषीचे व रीनाचे कॉलेज मधे प्रेम असते. पण नंतर तिचे लग्न जीतेंद्र बरोबर होते. ती त्याला विसरलेली नसते. त्यामुळे काही काळानंतर योगायोगाने तो परत भेटतो, तेव्हा पुन्हा ती त्याच्यात गुन्तत जाते. हे अयोग्य आहे हे जाणून ऋषी असा काही वागत जातो की शेवटी ती त्याचा तिरस्कार करू लागते. ऋषी निघून जातो. बाकी सर्व सोडा. हा चित्रपट बघायचा तो फक्त आणि फक्त ऋषीच्या अभिनयासाठी. चित्रपटाच्या शेवटी तो त्याच्या प्लॅन मधे 'यशस्वी' होतो खरा. पण तसे यश म्हणजे त्याचे अपयशच असते. त्या क्षणाला त्याच्या डोळ्यात जे 'मी जिंकलो, मी हरलो' असे भाव आहेत ना.... बास... फक्त त्या एका सेकंदासाठी तीन तास थांबायच...

या चित्रपटाच्या शेवटी एक गाणे आहे. शब्द, सूर व संगीत याची जाण असलेला माणूस काय पद्धतीने अभिनय पेश करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून हे गाणे घ्यावे लागेल. शब्द असे आहेत;

ना जाने कैसे पल मे बदल जाते हैं
ये दुनिया के बदलते रिश्ते
याच गाण्याचे शेवटचे कडवे जे आहे ना, त्यात ऋषीचा अभिनय बघाच.

रिश्ते कभी टूटे कहाँ जो टूट जाए वो रिश्ते नहीं
छुपि है उदासी के पीछे हँसी
दबी दर्द मे भी खुशी है कहीं
सच तो है ये बस प्यार से जीवन हमारे बदल जाते हैं
ये दुनिया के बदलते रिश्ते
वर थोडक्यात ष्टोरी सांगीतलीय ना, त्या बॅकग्राउंड वर हे शब्द व ऋषीचा अभिनय, बेजोड अभिनय, बघायलाच हवा.

'दामिनी' हा चित्रपट आपल्याला सर्वांना माहीत आहे तो मीनाक्षी शेषाद्रीच्या व सनी देओलच्या अभिनयासाठी. तारीख पे तारीख, ढाई किलो का हाथ, आदमी उठता नहीं उठ जाता है, इत्यादी डाइलॉग्स आपल्याला नक्की माहीत आहेत. शेवटच्या कोर्ट सीन मधला मीनाक्षीचा अभिनय तर लाजवाब आहे. त्यावर्षीचे फिल्मफेअर मिळता मिळता राहून गेले. आता चित्रपटाचा नक्की हिरो कोण हा मात्र मला प्रश्नच आहे. केवळ नायिकेचा नवरा म्हणून ऋषी नायक असा अर्थ काढून सनीला 'सर्वोत्तम सहायक' अभिनेत्याचे अवॉर्ड मिळाले. माझ्या मते खरा नायक सनीच आहे. त्याला सर्वोत्तम नायकाचे व ऋुषीला सर्वोत्तम सहायक अभिनयाचे अवॉर्ड मिळायला हवे होते. त्याच त्या कोर्टरूम मधल्या शेवटच्या सीनमधे तो कोर्टात येऊन सर्व गोष्टींची कबुली देतो. त्यावेळी शेवटी तो म्हणतो की (दामिनीकडे बोट दाखवून) ये दामिनी मेरी पत्नी है और मुझे नाज है के मैं इसका पती हूँ.... (इसका वर जोर देऊन). वा ऋषी वा...
या भानगडीत सर्वोत्तम अभिनेत्याचे त्या वर्षीचे अवॉर्ड 'बेटा' चित्रपटासाठी अनिल कपूरला मिळाले व सर्वोत्तम अभिनेत्रीचे त्याच चित्रपटासाठी माधुरीला.

या चित्रपटात एक गाणे आहे 'गवाह हैं चाँद तारे गवाह हैं' ह्या गाण्यात दामिनीप्रती आपले प्रेम व्यक्त करताना तो म्हणतो;
तुमको रखूंगा दिल में बसा के
मेरी धड़कन तुम हो
देखूंगा तुमको शाम ओ शहर में
मेरा दर्पन तुम हो
जी ना सकूंगा मैं होके जुदा
हे गाणे अजिबात 'लै भारी' वगैरे नाहीये. पण वरच्या ओळी गाताना ऋषीच्या डोळ्यातील प्रेम व त्यातला सच्चेपणा बघण्यासारखा आहे.

'चांदनी' मधले 'तू मुझे सुना, मैं तुझे सुनाऊ अपनी प्रेमकहानी' हे त्याचे विनोद खन्नाबरोबरचे गाणे घ्या, 'सरगम' मधले 'मुझे मत रोको, मुझे गाने दो' हे गाणे घ्या किंवा 'सागर' मधले 'सागर जैसी आँखोवाली' घ्या किंवा 'कर्ज' मधले 'एक हसीना थी' घ्या, ऋषीच्या अभिनयाला तोड नाही. अत्यंत व्यावसायिक वृत्तीने, कुठल्याही प्रकारची थेर न करता, निर्माते व दिग्दर्शक यांना त्रास न देता, १००% अभिनय करणारा ऋषी हा तिसरा. दुसरा अमिताभ. आणि पहिला अर्थातच देव आनंद.

प्रेक्षक, समीक्षक, निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, सर्वांनी वेळोवेळी ऋषीचे कौतुक केले. पण त्या कौतुकाचे अवॉर्ड मधे मात्र रूपांतर झाले नाही. पहिल्याच चित्रपटासाठी (बॉबी, १९७४) त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर डाइरेक्ट २०१७ मधे 'कपूर अँड सन्स' साठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा. मधल्या त्रेचाळीस वर्षात काहीही नाही. वडील राज कपूरना ११ फिल्मफेअर, मुलगा रणवीरला ऑलरेडी ५ फिल्मफेअर, ह्याचे मात्र हे असे. दुर्दैव नाहीतर काय? असो. ऋुषीला याबद्दल काहीच वाटले नसेल का किंवा वाटत नसेल का? जरूर वाटत असेल. शेवटी तोही माणूसच आहे की. पण याबद्दल कधीही एक शब्द त्याने व्यक्त केलेला माझ्या तरी ऐकण्यात किंवा वाचनात नाही.

रणवीरला त्याच्या पहिल्याच 'सावरिया' साठी 'बेस्ट मेल डेब्यू' चे फिल्मफेअर मिळाले. तेंव्हा ऋषीच्या डोळ्यातून आनंद आणि अभिमान ओसंडून वाहात होता.

Belive me, तो मात्र अभिनय नव्हता…..

Milind Limaye

टिप्पण्या

  1. Fully agree with you
    Arey pan itke varsha Neetu saarkhi sahacharani milaali te kuthlyahi awards peksha kititari mothi goshta aahe
    I don't think he must be having any regrets whatsoever

    One of my favorites is "Kya mausam hai...... Chal kahin duur nikal jaaye "

    उत्तर द्याहटवा
  2. कसे काय सुचते रे तुला? आणि किती वेळ लागला तुला हे लिहायला? किती ते संदर्भ... अचाट स्मरणशक्ती आहे बुवा तुझी... तुस्सी ग्रेट हो।

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जनरली प्रवासात काहीतरी सुचतं ते टिपून ठेवतो. अनेक गाणी माहीत आहेत, पण exact संदर्भ गूगलवरून घेतो. लिहायला फार वेळ लागत नाही. एकटाकी ४५-५० मिनिटात लिहून होते.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून