मुख्य सामग्रीवर वगळा

वेव्हलेंग्थ

 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एखादा माणूस असा भेटतो की ज्याला आपण आधी कधी पाहिलेलंही नसतं. पण काही वेळातच वर्षानुवर्षांची ओळख असल्यागत धागे जुळतात. सोप्या मराठीत सांगायचं तर 'वेव्हलेंग्थ' जुळते. त्या दोघांची वेव्हलेंग्थ अशीच जुळली.

दोघांपैकी जो मोठा होता त्याला तीन मुली होत्या. त्यापैकी थोरल्या दोघींची लग्न होऊन त्यांना पोरंही झाली होती. तिसरं शेंडेफळ जरा लाडोबा होतं. तिचंही लग्नाचं वय झालं होतं. बापानं आजवर जवळजवळ पंचवीस स्थळं आणली होती. पण हिला एक काही पसंत पडत नव्हतं. कोणी चम्याच आहे, तर कोणी राक्षस आहे. कोणाची आईच माकडीणीसारखी दिसतेय, तर कोणाचा बापच जाडभिंग्या आहे, असली कारणं सांगून नकारघंटा ठाणठाण वाजत होती. पण आपल्या ह्या अप्सरेगत शेंडेफळासाठी तो चपला झिजवत होता. अचानक एकेदिवशी शेंडेफळानंच त्याचा प्रॉब्लेम सोडवला. ऑफिसमधून येताना एकाला घेऊन आली व ह्याच्याशी मी लग्न करतेय म्हणून ओळख करून दिली. एकूण बरा वाटलं तो त्याला. पण शेवटी बापाचं काळीज होतं ते, काळजी तर वाटलीच.

काळजी वाटणंही स्वाभाविक होतं. खूप कष्टातून तो पुढं आला होता. पाच बहिणींचा एकटा भाऊ होता तो. परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता आलं नव्हतं. पण अंगभूत गुणांच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवली. जिद्दीने स्वतःचा बंगला बांधला. त्यासाठी नवराबायकोनी अमाप कष्टही केले होते. हमालीचा एक रुपया वाचवायला सायकलवरून सिमेंटची पोती आणली होती. खूप मेहेनतीनं बंगल्याभोवती बाग फुलवली होती. छंद पण व घरच्या भाज्यांमुळे पैशाची बचत पण. ह्या सर्व कष्टांचं फळ दोन चांगल्या जावयांच्या रूपानं मिळालं होतं. प्रश्न आता तिसऱ्याचाच होता.

साखरपुडा तर झाला पण काही कारणानं लग्न थोडं उशिरा होतं. मधल्या काळात हा तिसरा जवळजवळ रोज घरी येत असे. आणि ह्याच काळात दोघांची वेव्हलेंग्थ जुळली. मोठा तसा बोलका नव्हता, पण छोटा पक्का बोलघेवडा. हळूहळू छोट्यानं मोठ्याला बोलतं केलं. कुठल्या कुठल्या गप्पा मारायचे दोघं. मोठ्याला खायला बनवायला आवडायचं आणि छोटा पक्का खवय्या. मग मोठा कधी शिरा बनवायचा. पिठलं तर जाम भारी बनवायचा. दोघांनाही कार मधून भटकायला आवडायचं. त्यातही दोघांचा आवडीचा छंद म्हणजे गाडीला आडवं आलेल्याला वेचक शिव्या घालणे. छोट्याच्या शिव्यांच्या संपत्तीवर मोठा जाम खूष असायचा. मोठाही काही कमी नव्हता. लोकांना चपखल नावं ठेवण्यात त्याचा हात कुणीही धरला नसता. कुणाला माठ्या म्हण, त्याच्या बायकोला अंबा म्हण, दुसऱ्या एका जोडप्याला दादा कोंडके, उषा चव्हाण म्हण, असले धंदे चालायचे. त्याची बायको कधी कधी त्याच्यावर चिडायची तर लाल लाल होईस्तवर हसायचा. खरं सांगायचं तर ह्या असल्या गोष्टी करायला तल्लख विनोदबुद्धी लागते जी त्याच्याकडे भरपूर होती. दोघांची अजून एक कॉमन आवड म्हणजे बॉक्सिंग. टीव्हीवर बॉक्सिंगची मॅच असली की हाण, मार असे दोघांचे आरडेओरडे चालायचे.

तिसरीच्या लग्नानंतर मात्र तो खूप उदास झाला. हार्टचाही त्रास सुरु झाला. तिच्या मुलावर त्याचा फार जीव होता. 'माझा कृष्ण आहे' म्हणायचा. थोरल्या चिडायच्या. हिचा तेव्हढा कृष्ण, आमचा तो पेंद्या. यावर तो फक्त हसायचा. पुढे हळूहळू तब्येत खालावली व अखेर एक दिवस तो गेला.

छोट्यानं त्याचा एक मस्त मित्र गमावला होता.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून