मुख्य सामग्रीवर वगळा

मोठं होण्याची गोष्ट

लहानपणी या ना त्या कारणानं आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. साधारणपणे जी कुठली गोष्ट, 'नाही, तू अजून लहान आहेस' किंवा 'लहान आहेस ना? म्हणून असं करायचं नसतं" ही कारणं देऊन करू दिली जात नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कधी एकदा मोठं होतोय असं होऊन जातं. कुणाला वाटत असतं की कधी एकदा मोठा होतोय आणि बाबांची बाईक चालवतोय. कुणाला मोठं होऊन एकट्यानं अक्खी पाणीपुरी खायची असते तर कुणाला हात न धरता खोल पाण्यात पोहायची इच्छा असते. कुणाचं काय तर कुणाचं काय... 

मी केजीत गेलो ना तेव्हा मला कधी एकदा पहिलीत जातोय असं झालं होतं. त्याचं मुख्य व एकमेव कारण असं होतं की पहिलीत गेल्यानंतर शर्टाच्या खिशाला रुमाल लावावा लागत नसे. त्यामुळे मी पहिलीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. 

पहिलीत गेल्यावर असं लक्षात आलं की चौथीतल्या मुलांना गॅदरींगच्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्टेजवर बसायला मिळतं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय असं मला झालं होतं. अखेर मी चौथीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची हौस तर फिटली पण आता वेध लागले हायस्कुलात जायचे. काही झालं तरी हायस्कुल ते हायस्कुलच ना. त्यामुळे पाचवीत गेल्यावर मला खूप मोठ्ठा झाल्यासारखं वाटलं. पण तो चार्म फार टिकला नाही. मी ज्या शाळेत होतो ना ती शाळा गावातल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील पथकासाठी प्रसिद्ध होती. पण आठवीत गेल्याशिवाय त्या पथकात घेत नसत. त्यामुळे कधी एकदा आठवीत जातोय असं झालं होतं. एकदाचा मी आठवीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

आठवीत गेल्यावर दहावी. दहावीत जायचं थ्रिल तर फारच होतं. आमच्यावेळी दहावीत गेल्यावर घड्याळ व फुलपॅण्ट मिळायची. त्यामुळे दहावीत ह्या गोष्टी मिळाल्यावर तर फारच मोठं झाल्यासारखं वाटलं. दहावीत गेल्यावर अकरावी, मोठं कॉलेज अशी पुढली पुढली आकर्षणं येत गेली व प्रत्येक टप्प्यावर मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

ग्रॅज्युएशननंतर सीए झालो, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. स्वतःचं ऑफिस घेतलं. कामाला चार पाच मुलं, टेबलावर फोन, मागे पुढे झुलणारी चाकाची खुर्ची, दोन पाच कॉम्प्युटर्स. काही दिवसांनी चारचाकी घेतली. पुढे लग्न झालं, मुलगा झाला. व्यवसायही वाढत राहिला. मोठी गाडी, मोठं वातानुकुलीत ऑफिस, लॅपटॉप्स, खूप कर्मचारी, परदेश दौरे, आणखी काही दिवसांनी स्वतःचं मोठं, स्वतंत्र घर. प्रत्येक टप्प्यावर मी मोठा होत राहिलो. 

पण एक जागा अशी होती की जिथे माझं लहानपण संपलं नव्हतं. मोठं होण्याच्या प्रत्येक लहान मोठ्या टप्प्याचं तिथे व्यक्त, अव्यक्त कौतुक होत राहिलं. कधी दुरून, कधी जवळून. ती जागा सर्वार्थानं माझ्यापेक्षा मोठी होती, कायमच राहणार होती. कारण ती 'बाप' जागा होती. त्या जागी मी कायमच छोटुस्सा राहणार होतो. खरं तर 'कायमच राहणार' असं मला वाटायचं. तो माझा गैरसमज होता.

बरोब्बर एक वर्षापूर्वी बाबा गेले... 

मला कायमचं मोठ्ठ करून... 

पुन्हा कधीच लहान होऊ न देण्याकरता.... 





© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. Kya baat hai
    Baap aakhir baap hota hai

    Nevertheless we can continue to live like kids because....

    Saglyaancha toh baap sadaiva sarvatra asnaarach aahe

    उत्तर द्याहटवा
  2. एक वर्ष उलटले सुद्धा. त्यावेळी लिहिलेला लेख सुद्धा मनाला चटका लावुन गेला होता. दिवसागणिक तू मोठा होत गेलास पण आता लहान होणे मागे राहिले. हा चटका कायमचा 😔😔

    उत्तर द्याहटवा
  3. फार छान लिहिलं आहेस मिलिंद. मनाचा ठाव घेणारं!

    उत्तर द्याहटवा
  4. फारच सुरेख. अतिशय वेधक चित्रंण. खरं तर अजून एक जागा आहे. परमेश्वर. ज्याच्या देवळात जायचं असेल तर वाकुनच जावे लागते. तूम्ही कितिही मोठे व्हा. त्याच्या पुढे लहानच.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...