मुख्य सामग्रीवर वगळा

कोविडेच्छा बलियसी

परीक्षा झाली ना की आम्ही सगळे मित्र नाईट आउट करणार आहोत - बरं बाबा

परीक्षा संपली की आधी ती सगळी रद्दी घालून ये - हो गं आई

बाबा, सुट्टी लागल्या लागल्या मी आधी लायसन्स काढणारे बरं का - हं

लायसन्स मिळाल्यावर मी सगळ्या गाड्या चालवणार हां - लायसन्स तर काढ आधी

मी काकाकडे राहायला जाणार आहे - बरं

ह्या सुट्टीत गोव्याला जाऊया का - चालेल

मी आणि माझा मित्र रोज सकाळी सायकल राईडला जाणार आहोत - अरे वा

ह्यावेळेस एक पेटीतरी मार्केट यार्डातून आणूयात - बघू

ह्याची परीक्षा झाली ना की मी निगडीच्या मैत्रिणीकडे जाणारे दोन दिवस राहायला. तिचा बंगला आहे ना. आम्ही पापड, कुरडया, पापड्या वगैरे करणार आहोत - दोन का तीन दिवस जा

चिरंजीवांची ह्यावर्षी बारावी होती. तसा कॉमर्सला असल्यामुळे टक्केवारी, प्रॅक्टिकल्स, सीईटी असल्या कुठल्याही गोष्टींचा ससेमिरा नव्हता. चिरंजीव अभ्यासही मनापासून करतात. मार्क्सही बरे, अगदी चारचौघात सांगण्यासारखे पाडतात. त्यामुळे बारावी असण्याचे हे करा किंवा  करू नका, अशा स्वरूपाचे बंधन फारसे नव्हते. पण तरीही बारावी असल्यामुळे लोकलज्जेस्तव का होईना आम्ही बरेच कार्यक्रम 'तुझी परीक्षा झाली की...' ह्या सदरात टाकले होते. शिवाय 'नेमेचि येतो मग तो उन्हाळा' ह्या प्रकारचेही कार्यक्रम ठरले होते.

आज जवळजवळ दीड महिना झाला...

परीक्षा संपून, सुट्ट्या लागून, उन्हाळा सुरू होऊन...

अजून लायसन्स काढायला झालंच नाहीये...

नाईट आउट कसलं करायला मिळतंय...

गोव्याला जायची तारीखच ठरत नाहीये...

मार्केट यार्ड सोडा, आंबेच खायला मिळतील की नाही कोण जाणे...

असो....

शेवटी काय? कोविडेच्छा बलियसी....


© मिलिंद लिमये 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...