मुख्य सामग्रीवर वगळा

किती वानू यांसी...

मागल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर अनेक क्लिप्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. आपणही अशा अनेक पाहिल्या असतील. पण ज्या दोन क्लिप्सनी मला अनेक दिवस निःशब्द केलं त्या आज तुमच्याशी शेअर करतोय. प्रत्येक वेळी ह्या क्लिप्स पाहिल्यावर 'किती वानू यांसी', किती वाखाणणी करू यांची, हा एकच विचार मनात घोळत रहातो. 

एक आहे महामारीच्या उद्रेकात पंढरीला जाता येणार नाही असं सांगणाऱ्या पोलिसालाच पांडुरंग मानून, त्याच्या पाया पडून माघारी निघणारा वारकरी. अनेक दिवस मैलोनमैल चालून आल्यानंतर, फक्त कळसाचे दर्शन घेऊन, 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता', असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारकऱ्याची श्रद्धा काय असते ते कळणं, वाटतं तितकं सोपं नाहीये. इथे तर कळसही दिसणं शक्य नाही म्हणताना सहजपणे त्या पोलिसातच पांडुरंग बघणारा हा वारकरी.


दुसरी आहे एक कोणी म्हातारी. भिकारीण म्हणावं का तिला? पण क्लिप पाहिल्यानंतर तिला भिकारीण म्हणता येईल? दोन चार दिवस पोटाला अन्न नाही. कुणीतरी एक अनामिक स्वयंसेवक पाण्याची बाटली व अन्नाचं पॅकेट देतो तर, पदराची गाठ सोडवून म्हातारी एक नोट पुढे करते. का? काय नक्की असेल तिच्या मनात? अनेक लोक शिजवलेलं अन्न फुकट घेऊ नये अशी भावना मनाशी ठेऊन असतात. ह्या म्हातारीचीही तीच भावना असेल? आणि समजा असली तरी  मिळतंय आत्ता तर घेऊन ठेऊ, पदरचे पैसे उद्या उपयोगी पडतील, असं एकदाही तिला वाटू नये? क्षणाचाही विचार न करता ती स्वतःजवळची शेवटची नोट सहजपणे देऊ करते?


काय म्हणू याला? 

श्रद्धा? संस्कार? आपली संस्कृती? कशातून येते ही पराकोटीची भावना?

माझी आजी म्हणायची तेच कदाचित खरं... 

जग चालतं ते फक्त या लोकांमुळे... 


(दोन्ही क्लिप्सचे श्रेय त्यांच्या निर्मात्यांचे, ज्यांची नावं दुर्दैवाने मला माहीत नाहीत.) 

Ⓒ मिलिंद लिमये

 

टिप्पण्या

  1. हेम्न: संलक्षते ह्यग्नौ
    विशुद्धी: श्यामिकाSपिवा ||

    सोन्याचा कस अग्निमधेच लागतो. कठीण समयी सोन झळाळून निघत. दोन्ही घटना हे सार्थ ठरवत आहेत.

    त्यांचे भाव समजुन घ्यायला आपल्याला त्यांच्या भूमिकेतच जायला पाहिजे. 🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा
  3. Kharokhar....ashaa lokaanmule jag chaalta aani ashaanmulech ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा
  4. Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा
  5. Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा
  6. जग चालते ते अशा माणसांमुळे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत