मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - ट्रेलर

वस्तुतः मी चित्रपटप्रेमी नाही. फावल्या वेळात चित्रपट बघण्यापेक्षा काहीतरी वाचायला मला जास्त आवडतं. म्हणजे असं नाही की मी पिक्चर्स पहातच नाही. कॉलेजला असताना लेक्चर बुडवून थोड्याफार मॅटिनी 'टाकल्या' आहेत. पण थोड्याच. फार नाहीत. मी आयुष्यातले सगळ्यात जास्त पिक्चर्स पाहीले असतील ते माझ्या सीएच्या आर्टिकलशिपच्या तीन वर्षांच्या काळात. 

मी ज्या फर्ममधे काम करत होतो तिथे बरेचवेळा, बरेच दिवस, बाहेरगावी कामासाठी जावे लागायचे. त्याकाळी आजच्यासारखे सत्राशेसाठ चॅनेल्स, ओटीटी, वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ज्या गावी जायचो तिथे असलेल्या टॉकीजमधे असेल तो पिक्चर बघणे, एव्हढा एकच मनोरंजनाचा मार्ग उपलब्ध असायचा. मग त्यापायी आम्ही अनेक अत्रंगी उद्योगही केले. एका गावात मोजून सात टॉकीज होत्या. आम्ही प्रत्येक टॉकीजला एक वार बहाल केला. त्या वारी त्या टॉकीजला जो कुठला पिक्चर असेल तो बघायचा असा नियम. अनेकवेळा मागच्याच आठवड्यातला पिक्चर बदललेला नसायचा. तरीही तोच पिक्चर बघायचा. नियम म्हणजे नियम. दुसऱ्या एका गावात एकच टॉकीज होती. तिथे 'त्रिदेव' लागला होता. त्या गावात कामही दोन तीन दिवसाचं होतं. मी व माझ्या सहकारी मित्रानं, तीन दिवस रोज त्रिदेव पाहिला. एका गावात फिरती तंबू टॉकीज आली होती. तिथे दहा वेळा रीळ तुटत तुटत, एक डाव भुताचा पाहिला होता.

काही वेळा, एखाद्या मित्राच्या अंगात सैतान शिरायचा व तो काहीही करायचा. एकदा नाशिकला 'दो गज जमीन के नीचे' बघायला गेलो. हा पिक्चर खरं तर एक बरा भयपट आहे. आम्ही सगळ्यांनी तो आधी पाहीला होता. आता दुसऱ्यांदा जरी बघत असलो तरी गप बघावा की नाही. पण एकाच्या अंगात सैतान आला. त्यानं 'आता बघ हं, त्या पेटीतून हात बाहेर येईल बरं का', किंवा 'त्या गाडीच्या मागच्या सीटवर मुडदा आहे', वगैरे कॉमेंटरी सुरू केली. मग बाकीचेही चेवले व सगळं पुढचं सांगू लागले. आजूबाजूचे लोक जाम वैतागले होते. आमचे तीन तास मजेत गेले. थोडक्यात वाचलो असंही म्हणता येईल कारण अजून थोडावेळ गेला असता तर मारामाऱ्या झाल्या असत्या. 

नमनाला एव्हढं घडाभर तेल जाळायचं कारण असं की या सगळ्या प्रकारात काही व्यक्तिरेखा मला फार भावल्या. त्यामागे ती व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या कलाकाराचा जेव्हढा हात आहे, तेव्हढाच ती व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या लेखकाचा व त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचाही आहे. गेल्या दोन लॉकडाऊनमधे अनेक चित्रपट पुन्हा पाहीले म्हणा, पाहावे लागले म्हणा, पण अनेक आवडलेल्या व्यक्तिरेखा पुन्हा भेटल्या, काही नव्यानं कळल्या. 

पुढल्या काही दिवसात अशा काही आवडलेल्या व्यक्तिरेखांबद्दल लिहीणार आहे, असं म्हणतोय. 

पिक्चरसंबंधीच लिहितोय तर त्याच परिभाषेत बोलायचं म्हणून हा 

ट्रेलर... 


Ⓒ मिलिंद लिमये




 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत