मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - तो व ती

ती मुंबईहून पुण्याला आलेली असते. खास पुणेरी रस्ते व बोळ, कसलाही पत्ता न लागू देता पत्ता सांगायची पुणेरी पद्धत, यामुळे आधीच वैतागलेली ती, त्याला भेटते. त्यानंतर तिची गाठ पडते ती खास पुणेरी लोकांशी व पाट्यांशी. या सगळ्याचा पूर्ण वीट येऊनसुद्धा काम पूर्ण करण्यासाठी ती थोडावेळ पुण्यातच थांबायचं ठरवते. आता तिची पुन्हा गाठ पडते त्याच्याशी. 

थोड्याश्या अपरिहार्य परिस्थितीत ती त्याची कंपनी मान्य करते आणि सुरू होतो मुंबई विरुद्ध पुणे असा एक नेहमीचा व आवडीचा वाद. कळत नकळत आपणही त्या वादाचा एक भाग होऊन जातो. पुणे मुंबई वरून सुरू झालेला वाद हळूहळू व्यक्तिगत विषयांकडे वळतो. 

तिचा एक ब्रेकअप झालाय तसाच त्याचाही झालाय. दोघंही आपापल्या एक्स बद्दल सांगत असताना तिची अतिशय व्यवहारी, वर्तमानात जगायची, झालं गेलं मागे सोडून पुढे जाण्याची खास मुंबई पद्धतीची व्यक्तिरेखा आपल्यासमोर येते. तर दुसऱ्या बाजूला तो बराचसा स्वप्नाळू, पुणेरी परंपरावादी, वरकरणी खुशालचेंडू, थोडासा आतल्या गाठीचा पण कविमनाचाही.

पुणे शहरातून फिरताना व नंतर सिंहगडावर फिरताना त्या दोघांचा उंदीरमांजरासारखा एकमेकांना खेळवण्याचा खेळ सध्याची लग्नपद्धती, मुलामुलींचा लग्नसंस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन, एकत्र कुटुंबपद्धती इत्यादि विषयांवर हलकंफुलकं भाष्य करत जातो. 

एका प्रसंगात तो तिला म्हणतो की ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण नात्यांना उलगडूच देत नाही. सगळं काही, अगदी आपल्या पार्टनरसकट सगळ्यांना आपण गृहित धरतो. वाद उद्भवतात ते त्यामुळेच. नाती तुटतात तीही त्यामुळेच.  

चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटात आपल्याला कळतं की ती ज्याच्यासाठी पुण्याला आलेली असते तो तोच आहे आणि मुख्य म्हणजे ती कोण आहे हे त्याला माहीत असतं पण तिला त्याचा सुतराम पत्ता नसतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर योगायोगाने सुरू झालेला हा योगायोग व मुलगी बघण्याचा एक वेगळा प्रयोग दोन तास केवळ मनोरंजनच करत नाही तर लग्न व त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न यावर एक छान भाष्य करून जातो. 

स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहताना जोडीदाराच्या विचारांचाही आदर करायचा धडा देणारी ही दोघं, तो व ती, मला फारच भावले. 


Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या


  1. मराठी चित्रपटांमधील एक सुंदर भट्टी जमलेला हा चित्रपट. त्याची सुंदर मीमांसा या ब्लॉगमधून केली आहे. उंदीर मांजराचा खेळ ही उपमा छान आहे. एका अर्थाने लग्नानंतर नवरा बायकोत हाच खेळ चालतो. त्याचेच लग्नापूर्वीचे एक रूप यात चितारले आहे. हलका-फुलका पण या मुद्द्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा. ब्लॉगमधून यादृष्टीने हाच सिनेमा परत पहिल्याच समाधान!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून