मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - तो व ती

ती मुंबईहून पुण्याला आलेली असते. खास पुणेरी रस्ते व बोळ, कसलाही पत्ता न लागू देता पत्ता सांगायची पुणेरी पद्धत, यामुळे आधीच वैतागलेली ती, त्याला भेटते. त्यानंतर तिची गाठ पडते ती खास पुणेरी लोकांशी व पाट्यांशी. या सगळ्याचा पूर्ण वीट येऊनसुद्धा काम पूर्ण करण्यासाठी ती थोडावेळ पुण्यातच थांबायचं ठरवते. आता तिची पुन्हा गाठ पडते त्याच्याशी. 

थोड्याश्या अपरिहार्य परिस्थितीत ती त्याची कंपनी मान्य करते आणि सुरू होतो मुंबई विरुद्ध पुणे असा एक नेहमीचा व आवडीचा वाद. कळत नकळत आपणही त्या वादाचा एक भाग होऊन जातो. पुणे मुंबई वरून सुरू झालेला वाद हळूहळू व्यक्तिगत विषयांकडे वळतो. 

तिचा एक ब्रेकअप झालाय तसाच त्याचाही झालाय. दोघंही आपापल्या एक्स बद्दल सांगत असताना तिची अतिशय व्यवहारी, वर्तमानात जगायची, झालं गेलं मागे सोडून पुढे जाण्याची खास मुंबई पद्धतीची व्यक्तिरेखा आपल्यासमोर येते. तर दुसऱ्या बाजूला तो बराचसा स्वप्नाळू, पुणेरी परंपरावादी, वरकरणी खुशालचेंडू, थोडासा आतल्या गाठीचा पण कविमनाचाही.

पुणे शहरातून फिरताना व नंतर सिंहगडावर फिरताना त्या दोघांचा उंदीरमांजरासारखा एकमेकांना खेळवण्याचा खेळ सध्याची लग्नपद्धती, मुलामुलींचा लग्नसंस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन, एकत्र कुटुंबपद्धती इत्यादि विषयांवर हलकंफुलकं भाष्य करत जातो. 

एका प्रसंगात तो तिला म्हणतो की ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण नात्यांना उलगडूच देत नाही. सगळं काही, अगदी आपल्या पार्टनरसकट सगळ्यांना आपण गृहित धरतो. वाद उद्भवतात ते त्यामुळेच. नाती तुटतात तीही त्यामुळेच.  

चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटात आपल्याला कळतं की ती ज्याच्यासाठी पुण्याला आलेली असते तो तोच आहे आणि मुख्य म्हणजे ती कोण आहे हे त्याला माहीत असतं पण तिला त्याचा सुतराम पत्ता नसतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर योगायोगाने सुरू झालेला हा योगायोग व मुलगी बघण्याचा एक वेगळा प्रयोग दोन तास केवळ मनोरंजनच करत नाही तर लग्न व त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न यावर एक छान भाष्य करून जातो. 

स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहताना जोडीदाराच्या विचारांचाही आदर करायचा धडा देणारी ही दोघं, तो व ती, मला फारच भावले. 


Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या


  1. मराठी चित्रपटांमधील एक सुंदर भट्टी जमलेला हा चित्रपट. त्याची सुंदर मीमांसा या ब्लॉगमधून केली आहे. उंदीर मांजराचा खेळ ही उपमा छान आहे. एका अर्थाने लग्नानंतर नवरा बायकोत हाच खेळ चालतो. त्याचेच लग्नापूर्वीचे एक रूप यात चितारले आहे. हलका-फुलका पण या मुद्द्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा. ब्लॉगमधून यादृष्टीने हाच सिनेमा परत पहिल्याच समाधान!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत