मुख्य सामग्रीवर वगळा

शरद

शरद....
तसा माझा कुणीच नव्हता. माझ्या आजोबांच्या मित्राचा, तात्यांचा, तो मुलगा. एकुलता एक. माझ्यापेक्षा खूपच मोठा. जवळजवळ माझ्या वडलांच्या वयाचा. पण आसपासचे सगळे त्याला नुसतं शरद म्हणायचे म्हणून आम्हीपण त्याला, नावापुढे काका, मामा वगैरे न जोडता, नुसतं शरद म्हणायचो.

तात्या एलआयसी मधून मोठ्या पदावरून निवृत्त झाले होते. बऱ्यापैकी पेन्शन मिळत असावं. बायको खूप आधीच वारली होती. घरी फक्त तात्या आणि शरदच असायचे. 'घरी असायचे' हा मात्र कोड्यात टाकणारा प्रकार होता. तात्या रिटायर झाल्यामुळे घरी असायचे यात काही विशेष नव्हते. पण शरदही? आमच्या घराच्या चार घरं पलीकडेच तात्यांचं घर होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत बघावं तेंव्हा शरद ओसरीवर, पट्टेरी कापड लावलेल्या लाकडी आरामखुर्चीवर बसलेला असायचा. बरं घरी आहे म्हणून घरच्या कपड्यात बसावं ना. पण हा, सकाळी सकाळी दाढी अंघोळ करून, पूर्ण सुटात, टाय लावून, डोक्यावर हॅट घालून बसलेला असायचा. कधीही बघा, शरद असाच दिसणार. काहीही काम करताना, वाचन करताना अथवा रेडिओ वगैरे ऐकताना दिसायचा नाही. कुणाशी बोलताना दिसायचा नाही. फक्त खुर्चीवर बसून रस्त्याकडे बघत असायचा. तात्याच रोज दोन वेळचं जेवण बनवत व त्याला खायला घालत. मात्र दर शनिवारी सकाळी त्याच त्या पूर्ण सुटात सायकलवरून मारुतीला जायचा.

लहानपणी मी त्याला बघून जाम टरकायचो. सायकलवरून जाताना सर्कशीतलं अस्वल गेल्यासारखा वाटायचा. पण जेंव्हा तो अत्यंत निरुपद्रवी आहे हे कळलं तेंव्हा भीतीची जागा कुतूहलाने घेतली. आधी मला तो वेडा वाटायचा. मग वाटायचं की बहुतेक 'सटकलेला' असावा. अनेकवेळा तात्या माझ्या आजोबांकडे येऊन त्याच्याबद्दल काहीबाही सांगून रडायचे, माझ्यावर सूड उगवतोय म्हणायचे. सगळंच गूढ होतं.

वास्तविक शरद लहानपणापासून अतिशय हुशार. त्याकाळी बोर्डात आलेला मुलगा होता तो. गणिताची खूप आवड होती. गणित विषयात पीएचडी करून प्राध्यापक व्हायची त्याची इच्छा होती. पण तात्या अतिशय हेकेखोर होते. त्यांना शरदनं इंजिनियर व्हायला हवं होतं. खूप वादावादी झाली बापलेकात. तात्या शेवटी त्याला म्हणाले की तू आधी इंजिनियर हो आणि मग जे हवं ते कर. शरदनं शांतपणे इंजिनियरिंग पूर्ण केलं, अर्थातच उत्तम मार्कांनी. रिझल्ट घेऊन घरी आला. तात्यांना खूप आनंद झाला. आता काय करणारेस? तात्यांनी विचारलं. शरदनं आरामखुर्ची ओसरीवर आणली व त्यावर बसला. म्हणाला, हे करणार आहे. म्हणजे? तात्या चकीत झाले. तुम्हीच म्हणालात ना, इंजिनियर हो आणि मग काहीही कर? मी आता इथेच बसणार....

पुढली जवळजवळ बावीस वर्षं तो तसाच तिथे बसला. काहीही न करता....

एके दिवशी तात्या वारले. हा जागचा उठला नाही. शेजाऱ्यांनीच सगळं उरकलं. बरोब्बर तीन दिवसांनी त्याच खुर्चीत, तसाच सूट घालून, शरदही गेला. मागले तीन दिवस, त्याला काहीही खायला मिळालं नव्हतं.

एका सूडाच्या कहाणीचा करुण अंत झाला होता......



© Milind Limaye

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून