मुख्य सामग्रीवर वगळा

शरद

शरद....
तसा माझा कुणीच नव्हता. माझ्या आजोबांच्या मित्राचा, तात्यांचा, तो मुलगा. एकुलता एक. माझ्यापेक्षा खूपच मोठा. जवळजवळ माझ्या वडलांच्या वयाचा. पण आसपासचे सगळे त्याला नुसतं शरद म्हणायचे म्हणून आम्हीपण त्याला, नावापुढे काका, मामा वगैरे न जोडता, नुसतं शरद म्हणायचो.

तात्या एलआयसी मधून मोठ्या पदावरून निवृत्त झाले होते. बऱ्यापैकी पेन्शन मिळत असावं. बायको खूप आधीच वारली होती. घरी फक्त तात्या आणि शरदच असायचे. 'घरी असायचे' हा मात्र कोड्यात टाकणारा प्रकार होता. तात्या रिटायर झाल्यामुळे घरी असायचे यात काही विशेष नव्हते. पण शरदही? आमच्या घराच्या चार घरं पलीकडेच तात्यांचं घर होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत बघावं तेंव्हा शरद ओसरीवर, पट्टेरी कापड लावलेल्या लाकडी आरामखुर्चीवर बसलेला असायचा. बरं घरी आहे म्हणून घरच्या कपड्यात बसावं ना. पण हा, सकाळी सकाळी दाढी अंघोळ करून, पूर्ण सुटात, टाय लावून, डोक्यावर हॅट घालून बसलेला असायचा. कधीही बघा, शरद असाच दिसणार. काहीही काम करताना, वाचन करताना अथवा रेडिओ वगैरे ऐकताना दिसायचा नाही. कुणाशी बोलताना दिसायचा नाही. फक्त खुर्चीवर बसून रस्त्याकडे बघत असायचा. तात्याच रोज दोन वेळचं जेवण बनवत व त्याला खायला घालत. मात्र दर शनिवारी सकाळी त्याच त्या पूर्ण सुटात सायकलवरून मारुतीला जायचा.

लहानपणी मी त्याला बघून जाम टरकायचो. सायकलवरून जाताना सर्कशीतलं अस्वल गेल्यासारखा वाटायचा. पण जेंव्हा तो अत्यंत निरुपद्रवी आहे हे कळलं तेंव्हा भीतीची जागा कुतूहलाने घेतली. आधी मला तो वेडा वाटायचा. मग वाटायचं की बहुतेक 'सटकलेला' असावा. अनेकवेळा तात्या माझ्या आजोबांकडे येऊन त्याच्याबद्दल काहीबाही सांगून रडायचे, माझ्यावर सूड उगवतोय म्हणायचे. सगळंच गूढ होतं.

वास्तविक शरद लहानपणापासून अतिशय हुशार. त्याकाळी बोर्डात आलेला मुलगा होता तो. गणिताची खूप आवड होती. गणित विषयात पीएचडी करून प्राध्यापक व्हायची त्याची इच्छा होती. पण तात्या अतिशय हेकेखोर होते. त्यांना शरदनं इंजिनियर व्हायला हवं होतं. खूप वादावादी झाली बापलेकात. तात्या शेवटी त्याला म्हणाले की तू आधी इंजिनियर हो आणि मग जे हवं ते कर. शरदनं शांतपणे इंजिनियरिंग पूर्ण केलं, अर्थातच उत्तम मार्कांनी. रिझल्ट घेऊन घरी आला. तात्यांना खूप आनंद झाला. आता काय करणारेस? तात्यांनी विचारलं. शरदनं आरामखुर्ची ओसरीवर आणली व त्यावर बसला. म्हणाला, हे करणार आहे. म्हणजे? तात्या चकीत झाले. तुम्हीच म्हणालात ना, इंजिनियर हो आणि मग काहीही कर? मी आता इथेच बसणार....

पुढली जवळजवळ बावीस वर्षं तो तसाच तिथे बसला. काहीही न करता....

एके दिवशी तात्या वारले. हा जागचा उठला नाही. शेजाऱ्यांनीच सगळं उरकलं. बरोब्बर तीन दिवसांनी त्याच खुर्चीत, तसाच सूट घालून, शरदही गेला. मागले तीन दिवस, त्याला काहीही खायला मिळालं नव्हतं.

एका सूडाच्या कहाणीचा करुण अंत झाला होता......



© Milind Limaye

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत