मुख्य सामग्रीवर वगळा

दामलेमास्तर

हो...!
तोच तो मी दामलेमास्तर. 'बिगरी ते मॅट्रीक' मधला. माझ्या शिष्योत्तमानं, पुरुषोत्तमानं, ज्याच्यावर पानंच्या पानं खर्चली तो मीच. मीच तो सुलतान. मीच तो कर्दनकाळ, औरंगजेब, हरणटोळ. मीच तो पोरांना झोडून काढणारा. मीच तो पोरींना कावळे वगैरे म्हणणारा. मान्य आहे मला की कदाचित माझ्याकडून हे सगळं अति झालं असेल, पण आज थोडीशी माझीही बाजू समजून घ्या. तुम्ही म्हणाल, मास्तर आज इतक्या वर्षांनी तुम्हाला कशी काय उपरती झाली? सांगतो. परवाच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुणीतरी गमतीत का होईना मला व माझे सहकारी चितळेमास्तर यांना उद्देशून एक पोस्ट टाकली. (आम्हीही हल्ली 'वर' बसून सगळं बघतो बरं). म्हणलं त्यानिमित्तानं इतक्या वर्षांत राहून गेलेलं बोलून घ्यावं.

कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला. कोकणातल्या कुणाकडेही असत त्याप्रमाणे घरी थोडी कलमं, काजू, फणस होते. अर्ध्या खंडीची शेती होती. वडील साधे क्रमपाठी भिक्षुक होते. सहा बहीणी व तीन भाऊ धरून घरात आम्ही बारा चौदा तोंडं. खेड्यातले चार पाच यजमान व शंकराची रोजची पूजा यावर दोन वेळचं कसंबसं मिळायचं. अशा परिस्थितीत मॅट्रीक होऊन मी तालुक्याच्या प्राथमिक शाळेत शाळामास्तर म्हणून लागलो.

माझे वरिष्ठ सहकारी, चितळेमास्तर, यांच्याप्रमाणे ना मला मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेजला जायला मिळाले ना मला कुणी मॅकेनझी प्रिन्सिपॉल भेटले, की ज्यांना बघून ह्या शिक्षणाच्या 'राष्ट्रकार्यात' शिरावे. आज तुम्ही मुलं अगदी सहजपणे मोठं झाल्यावर काय करायचं ते ठरवता. पण मला आजही सांगता येणार नाही की मी मला काय व्हायचे होते. चितळेमास्तरांचे तसे तर तुम्हा मुलांचे असे. पण मी केवळ एक पोटार्थी होतो.

माझ्या घरची परिस्थितीही वडिलांसारखीच होती. पाच सहा पोरं, सतत आजारी पडणारी बायको व कमावणारा मी एकटाच. गांजून गेलो होतो हो अगदी. मिळणाऱ्या पैशात आजचं निभायचं. पण उद्याचं काय? हा प्रश्न मरेपर्यंत छळत राहीला. परिस्थितीशी झगडण्यासाठी काय काय करायचो. म्हणे दामलेमास्तर चुकून कधी आजारी पडत नसत. आजारी पडायची चैन परवडणारी नव्हती हो मला. काही झालेच तर अंगावर काढायचो पण रजा नाही घ्यायचो. वाचवलेल्या रजेचे पैसे मिळायचे ना वर्षाच्या शेवटी. तेव्हढंच फाटलेल्या संसाराला एक छोटंसं ठिगळ....

तसंच त्या हिरव्या डगल्याचं, ज्यावरून मला हरणटोळ हे नाव पडलं होतं. संसाराचा गाडा ओढताना सगळेच रंग विरून गेले होते. हाच एक तेव्हढा हिरवा राहून गेला. थोरल्याच्या मुंजीत शिवला होता, धाकट्याच्या लग्नापर्यंत वापरला.....

पुरुषोत्तमानं लिहिलंय की चौथीतल्या दुसऱ्या एका, गाणीबिणी म्हणणाऱ्या मास्तरांच्या वर्गात जायची ते सगळे आतुरतेने वाट बघत होते. पण नेमका मीच पुन्हा त्यांना चौथीच्या वर्गावर आलो. खरं सांगू? ते चौथीचे मास्तर बदलून जावेत याची मीच खूप वाट बघत होतो. कारण ते गेल्यावर मीच चौथीवर जाणार होतो ना. चौथीच्या मास्तरांना तीन आणे पगार जास्त मिळत असे हो....

बहुधा हा सगळा परिस्थितीचा राग, हे वैफल्य, ही अगतिकता मुलांवर निघत असेल. कुणाला कानावर जानवं लावून बडवलं असेल, कुणाला 'कावळे' म्हणलं असेल, कुणाला गाढव, डुक्कर, रेडा म्हणलं असेल. पण शक्य असल्यास माझी बाजूही समजून घ्या. मुळात मी इतका कडवट नव्हतो हो. असो. ज्याचं त्याचं भाग्य....

असं म्हणतात की कुठल्याही मास्तरांचं आयुष्य हे त्यांचा शेवटचा शिष्य जिवंत असेपर्यंत असतं. पण आमचा पुरुषोत्तम (आमच्या चितळेमास्तरांचा पुर्ष्या), स्वतः मराठी मनात अमर तर झालाच पण आम्हा दोघा मास्तरांनाही अमर करून गेला.

चितळेमास्तरांचं ठीक आहे हो. ते खरंच अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. पण पूर्णपणे 'विद्यार्थी-अप्रिय' मास्तर असूनसुद्धा इतकी मोठी गुरुदक्षिणा देणारा शिष्य मिळाला हेच माझे या मनुष्यजन्मातले बहुधा एकमेव भाग्य......



© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत