मुख्य सामग्रीवर वगळा

दामलेमास्तर

हो...!
तोच तो मी दामलेमास्तर. 'बिगरी ते मॅट्रीक' मधला. माझ्या शिष्योत्तमानं, पुरुषोत्तमानं, ज्याच्यावर पानंच्या पानं खर्चली तो मीच. मीच तो सुलतान. मीच तो कर्दनकाळ, औरंगजेब, हरणटोळ. मीच तो पोरांना झोडून काढणारा. मीच तो पोरींना कावळे वगैरे म्हणणारा. मान्य आहे मला की कदाचित माझ्याकडून हे सगळं अति झालं असेल, पण आज थोडीशी माझीही बाजू समजून घ्या. तुम्ही म्हणाल, मास्तर आज इतक्या वर्षांनी तुम्हाला कशी काय उपरती झाली? सांगतो. परवाच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुणीतरी गमतीत का होईना मला व माझे सहकारी चितळेमास्तर यांना उद्देशून एक पोस्ट टाकली. (आम्हीही हल्ली 'वर' बसून सगळं बघतो बरं). म्हणलं त्यानिमित्तानं इतक्या वर्षांत राहून गेलेलं बोलून घ्यावं.

कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला. कोकणातल्या कुणाकडेही असत त्याप्रमाणे घरी थोडी कलमं, काजू, फणस होते. अर्ध्या खंडीची शेती होती. वडील साधे क्रमपाठी भिक्षुक होते. सहा बहीणी व तीन भाऊ धरून घरात आम्ही बारा चौदा तोंडं. खेड्यातले चार पाच यजमान व शंकराची रोजची पूजा यावर दोन वेळचं कसंबसं मिळायचं. अशा परिस्थितीत मॅट्रीक होऊन मी तालुक्याच्या प्राथमिक शाळेत शाळामास्तर म्हणून लागलो.

माझे वरिष्ठ सहकारी, चितळेमास्तर, यांच्याप्रमाणे ना मला मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेजला जायला मिळाले ना मला कुणी मॅकेनझी प्रिन्सिपॉल भेटले, की ज्यांना बघून ह्या शिक्षणाच्या 'राष्ट्रकार्यात' शिरावे. आज तुम्ही मुलं अगदी सहजपणे मोठं झाल्यावर काय करायचं ते ठरवता. पण मला आजही सांगता येणार नाही की मी मला काय व्हायचे होते. चितळेमास्तरांचे तसे तर तुम्हा मुलांचे असे. पण मी केवळ एक पोटार्थी होतो.

माझ्या घरची परिस्थितीही वडिलांसारखीच होती. पाच सहा पोरं, सतत आजारी पडणारी बायको व कमावणारा मी एकटाच. गांजून गेलो होतो हो अगदी. मिळणाऱ्या पैशात आजचं निभायचं. पण उद्याचं काय? हा प्रश्न मरेपर्यंत छळत राहीला. परिस्थितीशी झगडण्यासाठी काय काय करायचो. म्हणे दामलेमास्तर चुकून कधी आजारी पडत नसत. आजारी पडायची चैन परवडणारी नव्हती हो मला. काही झालेच तर अंगावर काढायचो पण रजा नाही घ्यायचो. वाचवलेल्या रजेचे पैसे मिळायचे ना वर्षाच्या शेवटी. तेव्हढंच फाटलेल्या संसाराला एक छोटंसं ठिगळ....

तसंच त्या हिरव्या डगल्याचं, ज्यावरून मला हरणटोळ हे नाव पडलं होतं. संसाराचा गाडा ओढताना सगळेच रंग विरून गेले होते. हाच एक तेव्हढा हिरवा राहून गेला. थोरल्याच्या मुंजीत शिवला होता, धाकट्याच्या लग्नापर्यंत वापरला.....

पुरुषोत्तमानं लिहिलंय की चौथीतल्या दुसऱ्या एका, गाणीबिणी म्हणणाऱ्या मास्तरांच्या वर्गात जायची ते सगळे आतुरतेने वाट बघत होते. पण नेमका मीच पुन्हा त्यांना चौथीच्या वर्गावर आलो. खरं सांगू? ते चौथीचे मास्तर बदलून जावेत याची मीच खूप वाट बघत होतो. कारण ते गेल्यावर मीच चौथीवर जाणार होतो ना. चौथीच्या मास्तरांना तीन आणे पगार जास्त मिळत असे हो....

बहुधा हा सगळा परिस्थितीचा राग, हे वैफल्य, ही अगतिकता मुलांवर निघत असेल. कुणाला कानावर जानवं लावून बडवलं असेल, कुणाला 'कावळे' म्हणलं असेल, कुणाला गाढव, डुक्कर, रेडा म्हणलं असेल. पण शक्य असल्यास माझी बाजूही समजून घ्या. मुळात मी इतका कडवट नव्हतो हो. असो. ज्याचं त्याचं भाग्य....

असं म्हणतात की कुठल्याही मास्तरांचं आयुष्य हे त्यांचा शेवटचा शिष्य जिवंत असेपर्यंत असतं. पण आमचा पुरुषोत्तम (आमच्या चितळेमास्तरांचा पुर्ष्या), स्वतः मराठी मनात अमर तर झालाच पण आम्हा दोघा मास्तरांनाही अमर करून गेला.

चितळेमास्तरांचं ठीक आहे हो. ते खरंच अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. पण पूर्णपणे 'विद्यार्थी-अप्रिय' मास्तर असूनसुद्धा इतकी मोठी गुरुदक्षिणा देणारा शिष्य मिळाला हेच माझे या मनुष्यजन्मातले बहुधा एकमेव भाग्य......



© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून