त्याचं नाव कबांगा.
नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की तो कुठला. काळाकभिन्न, उंचापुरा पण शिडशिडीत, जन्मल्या जन्मल्या म्हशीनं पाय दिल्यासारखं चपटं नाक, जाडजूड ओठ, कुठल्याही टूथपेस्ट किंवा टूथपावडरच्या जाहीरातीत शोभतील असे पांढरेशुभ्र दात, जीन्स व टी शर्ट घातलेला हा साधारण तिशीचा इसम त्याच्या देशातल्या एका कंपनीच्या गेस्ट हाऊसचा सर्व काही होता. सर्व काही म्हणजे स्वयंपाकी तोच, भांडी घासणारा तोच, कपडे धुऊन इस्त्री करणारा तोच, झाडणार पुसणार तोच, वॉचमनही तोच आणि माळीही तोच. ही सगळी कामं करून मागल्या बाजूला एका खोपटवजा खोलीत तो एकटा रहायचा. सदैव हसतमुख. कधीही कंटाळलेला किंवा वैतागलेला दिसायचा नाही. काम करताना सतत काहीतरी गुणगुणत असायचा. ऱ्हिदमचा खूप चांगला अंदाज होता. एकदा मी लॅपटॉपवर 'झिंगाट' मधलं गाणं लावलं होतं त्यावर सुरेख नाचला. नंतर चार दिवस रोज तेच गाणं.
हे सगळं घडलं, मी एकदा त्याच्या देशात, त्याच्या कंपनीत काही कामासाठी गेलो होतो तेव्हा. भल्या मोठ्या गेस्ट हाऊसमधे मी एकटाच होतो. त्यामुळे मला वेळ असेल तेंव्हा आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. कबांगा बऱ्यापैकी शिकलेला होता. त्याच्या देशात एका पातळीपर्यंत शिक्षण फुकट पण कंपल्सरी आहे. तिथपर्यंत तो शिकला होता. त्याला भारत माहीत होता. वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक प्रश्न तो मला विचारत असे. त्याच्या देशातल्या एकूण परिस्थितीमुळं थोडंफार शिकूनसुद्धा त्याला चांगली नोकरी नव्हती. पोटासाठी अखेर त्याने हे काम पत्करले होते.
गप्पा मारताना एकदा त्यानं सांगितलं की त्याला आठ मुलं आहेत. बायको कुठल्यातरी आजारपणात आधीच वारली होती. कबांगाला पगार तसा जेमतेमच होता. मी वैतागून त्याला विचारलं, "अरे, इतकी मुलं कशाला जन्माला घातलीस?" शांतपणे तो म्हणाला, "मोठी होईपर्यंत पाच सहा मरतीलच की." मी सुन्न झालो. हा बाप आहे का खाटीक? मी विषय वाढवला नाही.
एकदा कंपनीच्या लोकांनी शनिवार रविवार जोडून पिकनिकचा बेत आखला. कबांगाला हे समजताच तो हळूच माझ्यापाशी आला.
"सर, मी पण शनिवार रविवार सुट्टी घेऊ का?"
"का रे? कशासाठी?"
थोडक्यात सांगायचं तर पंचवीस तीस किलोमीटरवरील दुसऱ्या एका गावातल्या मिशनरी शाळेत त्याची मुलं शिकत होती. शिक्षण फुकट, जेवण फुकट, रहायला फुकट. त्याबदल्यात चर्चमधली कामं करायची. हा वेळ मिळेल तेंव्हा त्यांना जाऊन भेटत असे. शनिवारी सकाळी चालत निघायचा ते सरत्या दुपारी पोचायचा. रात्री तिथेच कुठेतरी झोपायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना घेऊन गावात फिरायचा, त्यांना खाऊ घालायचा. दुपारी परत फिरायचा व रात्री उशिरा पुन्हा गेस्ट हाऊसवर हजर व्हायचा. ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला.
शुक्रवारी रात्री जेवण झाल्यावर मी त्याला थोडे पैसे दिले व बसनं जायला सांगितलं. तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे काहीतरी खुडबुड आवाजाने मला जाग आली. जेमतेम साडेपाच झाले होते. पहातो तर कबांगा महाशय निघायच्या तयारीत.
"का रे? इतक्या लौकर? बस तर ७ वाजता आहे ना?"
"हो सर. पण मी चालतच जातो. आज तुम्ही दिलेल्या पैशातून मी बसनी जाईन, पण दरवेळी कोण देणार आहे मला पैसे? उगाच नाही त्या सवयी लागायला नकोत. त्यापेक्षा तुम्ही दिलेल्या पैशातून पोरांबरोबर जास्त मजा करीन, त्यांना खूप खायला प्यायला घालीन."
स्वतःच्या कष्टांपेक्षा आज पोरांचे जास्त लाड करता येणार याचाच त्याला आनंद झाला होता. 'मोठी होईपर्यंत पाच सहा मरतीलच की' हा विचारही आता त्याच्या डोक्यात नव्हता. अवाक होऊन मी त्याच्याकडे पहात राहिलो. माझ्या प्रतिक्रियेची वाट न बघता, मला बाय करून तो चालायलाही लागला.
जगात कुठेही जा, शेवटी बाप तो बापच.....
© मिलिंद लिमये
गप्पा मारताना एकदा त्यानं सांगितलं की त्याला आठ मुलं आहेत. बायको कुठल्यातरी आजारपणात आधीच वारली होती. कबांगाला पगार तसा जेमतेमच होता. मी वैतागून त्याला विचारलं, "अरे, इतकी मुलं कशाला जन्माला घातलीस?" शांतपणे तो म्हणाला, "मोठी होईपर्यंत पाच सहा मरतीलच की." मी सुन्न झालो. हा बाप आहे का खाटीक? मी विषय वाढवला नाही.
एकदा कंपनीच्या लोकांनी शनिवार रविवार जोडून पिकनिकचा बेत आखला. कबांगाला हे समजताच तो हळूच माझ्यापाशी आला.
"सर, मी पण शनिवार रविवार सुट्टी घेऊ का?"
"का रे? कशासाठी?"
थोडक्यात सांगायचं तर पंचवीस तीस किलोमीटरवरील दुसऱ्या एका गावातल्या मिशनरी शाळेत त्याची मुलं शिकत होती. शिक्षण फुकट, जेवण फुकट, रहायला फुकट. त्याबदल्यात चर्चमधली कामं करायची. हा वेळ मिळेल तेंव्हा त्यांना जाऊन भेटत असे. शनिवारी सकाळी चालत निघायचा ते सरत्या दुपारी पोचायचा. रात्री तिथेच कुठेतरी झोपायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना घेऊन गावात फिरायचा, त्यांना खाऊ घालायचा. दुपारी परत फिरायचा व रात्री उशिरा पुन्हा गेस्ट हाऊसवर हजर व्हायचा. ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला.
शुक्रवारी रात्री जेवण झाल्यावर मी त्याला थोडे पैसे दिले व बसनं जायला सांगितलं. तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे काहीतरी खुडबुड आवाजाने मला जाग आली. जेमतेम साडेपाच झाले होते. पहातो तर कबांगा महाशय निघायच्या तयारीत.
"का रे? इतक्या लौकर? बस तर ७ वाजता आहे ना?"
"हो सर. पण मी चालतच जातो. आज तुम्ही दिलेल्या पैशातून मी बसनी जाईन, पण दरवेळी कोण देणार आहे मला पैसे? उगाच नाही त्या सवयी लागायला नकोत. त्यापेक्षा तुम्ही दिलेल्या पैशातून पोरांबरोबर जास्त मजा करीन, त्यांना खूप खायला प्यायला घालीन."
स्वतःच्या कष्टांपेक्षा आज पोरांचे जास्त लाड करता येणार याचाच त्याला आनंद झाला होता. 'मोठी होईपर्यंत पाच सहा मरतीलच की' हा विचारही आता त्याच्या डोक्यात नव्हता. अवाक होऊन मी त्याच्याकडे पहात राहिलो. माझ्या प्रतिक्रियेची वाट न बघता, मला बाय करून तो चालायलाही लागला.
जगात कुठेही जा, शेवटी बाप तो बापच.....
© मिलिंद लिमये
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा