आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. त्यातली काही हुशार असतात, काही ढ असतात, काही कर्तबगार असतात, काही कुचकामाची असतात, चांगली असतात, वाईट असतात आणि काय काय. पण काही माणसं अशी असतात की ती काहीच नसतात. त्यांच्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही.
अप्पा त्यातलाच. तो काहीच नव्हता. कुणालाच त्याच्याबद्दल काही वाटत नसे.....
तसं पहायला गेलं तर माझा लांबचा मामा लागायचा. इतका लांबचा की माझ्या आजीच्या भाषेत, 'एसटीनं दोन तास लागतील', इतका लांबचा. वाडवडीलांची सावकारी होती. त्यामुळे घरचं गडगंज होतं. चार पाच भाऊ होते. तीन चार बहिणी होत्या. अप्पा असातसा मधलाच. एवढ्या मोठ्या पसाऱ्यात अप्पा शाळेत गेला का, काही शिकला का, असा कुणालाच प्रश्न पडला नाही. अप्पा नुसता बसून असे. अगदीच काही काम सांगितलं तर करायचा, पण इतर वेळी निवांत बसून असायचा. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
कुठल्याही रंगाचा, जुन्या पद्धतीचा लॉंग शर्ट, घोळदार पायजमा, डोक्यावर चेपून बसवलेली गांधी टोपी, चार दिवसांचे वाढलेले दाढीचे खुंट, बसून खाल्ल्यामुळे किंवा खाऊन बसल्यामुळे सुटलेलं तोंद असा त्याचा अवतार होता. एव्हढा सावकाराचा मुलगा, अशा अवतारात रहात असे, पण कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
कधी कुणाचं दळण टाक किंवा आणून दे, कधी भाजी आणून दे, कधी एसटीची तिकिटं काढून आण, कधी एखाद्या पोराला शाळेत सोड, कधी कुणाला तरी निरोप सांगून ये असली किडूकमिडूक कामं तो करायचा. पण मुख्य व आवडतं काम म्हणजे कुणीही काही कारणानं जेवायला बोलावलं की पोटाला तडस लागेपर्यंत जेवणं. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
बहुतेक वेळा नगरपालिकेच्या पायऱ्यांवर, मुरलीधराच्या देवळात, कुणाच्या तरी घराबाहेरच्या कट्ट्यावर, एक पाय वर घेऊन नुसता बसलेला असायचा. आपण जन्माला येऊन नक्की काय केलं हा प्रश्नही त्याला बहुधा पडत नसावा. जाणाऱ्या येणाऱ्या कुणी चुकून कधी 'काय अप्पा?' असं विचारलंच तर 'होSSS' असा प्रतिसाद द्यायचा. बाकी एक शब्द नाही. तो बोलला काय नि नाही बोलला काय, कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
सावकारांनी अप्पाचं लग्नही करून दिलं होतं. त्याची बायकोही डोक्यानं जरा कमीच होती. अप्पाचे इतर भाऊ अप्पाचा सगळा खर्च चालवीत. पण तरीही, दोन वरकड पैशांकरता व गावभरच्या कुचाळक्या करायला, त्याची बायको चार घरी पोळ्या करायला जाई. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
अप्पाला एक मुलगीही होती. ती मात्र खरोखर हुशार होती. अप्पाचा तिच्यावर खूप जीव होता. दहावी पास झाल्यावर अप्पाचा एक भाऊ तिला पुढील शिक्षणासाठी शहरात घेऊन गेला. मुलगी शहरात गेल्यावर मात्र अप्पा खूप उदास झाला. पूर्वी आम्ही भेटल्यावर जरा तरी चार शब्द बोलणारा अप्पा, अजिबात बोलेनासा झाला. दिवस ढकलणं यापलीकडे आता त्याला काही उद्योग नव्हता. त्याला ओळखणारी बहुतेक कुटुंबे आता शहरात स्थायिक झाली होती. त्यामुळे हक्कानं त्याला कामं सांगणारं, सणावाराला जेवायला बोलावणारं, गावात फारसं कुणी उरलं नव्हतं. आकाशाकडे बघत बसून असायचा.
एके दिवशी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर एक रेघोटीसुद्धा न उठवता, अप्पा मरून गेला.
कुणालाच त्याचं काही वाटलं नाही....
© chamanchidi.blogspot.com
अप्पा त्यातलाच. तो काहीच नव्हता. कुणालाच त्याच्याबद्दल काही वाटत नसे.....
तसं पहायला गेलं तर माझा लांबचा मामा लागायचा. इतका लांबचा की माझ्या आजीच्या भाषेत, 'एसटीनं दोन तास लागतील', इतका लांबचा. वाडवडीलांची सावकारी होती. त्यामुळे घरचं गडगंज होतं. चार पाच भाऊ होते. तीन चार बहिणी होत्या. अप्पा असातसा मधलाच. एवढ्या मोठ्या पसाऱ्यात अप्पा शाळेत गेला का, काही शिकला का, असा कुणालाच प्रश्न पडला नाही. अप्पा नुसता बसून असे. अगदीच काही काम सांगितलं तर करायचा, पण इतर वेळी निवांत बसून असायचा. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
कुठल्याही रंगाचा, जुन्या पद्धतीचा लॉंग शर्ट, घोळदार पायजमा, डोक्यावर चेपून बसवलेली गांधी टोपी, चार दिवसांचे वाढलेले दाढीचे खुंट, बसून खाल्ल्यामुळे किंवा खाऊन बसल्यामुळे सुटलेलं तोंद असा त्याचा अवतार होता. एव्हढा सावकाराचा मुलगा, अशा अवतारात रहात असे, पण कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
कधी कुणाचं दळण टाक किंवा आणून दे, कधी भाजी आणून दे, कधी एसटीची तिकिटं काढून आण, कधी एखाद्या पोराला शाळेत सोड, कधी कुणाला तरी निरोप सांगून ये असली किडूकमिडूक कामं तो करायचा. पण मुख्य व आवडतं काम म्हणजे कुणीही काही कारणानं जेवायला बोलावलं की पोटाला तडस लागेपर्यंत जेवणं. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
बहुतेक वेळा नगरपालिकेच्या पायऱ्यांवर, मुरलीधराच्या देवळात, कुणाच्या तरी घराबाहेरच्या कट्ट्यावर, एक पाय वर घेऊन नुसता बसलेला असायचा. आपण जन्माला येऊन नक्की काय केलं हा प्रश्नही त्याला बहुधा पडत नसावा. जाणाऱ्या येणाऱ्या कुणी चुकून कधी 'काय अप्पा?' असं विचारलंच तर 'होSSS' असा प्रतिसाद द्यायचा. बाकी एक शब्द नाही. तो बोलला काय नि नाही बोलला काय, कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
सावकारांनी अप्पाचं लग्नही करून दिलं होतं. त्याची बायकोही डोक्यानं जरा कमीच होती. अप्पाचे इतर भाऊ अप्पाचा सगळा खर्च चालवीत. पण तरीही, दोन वरकड पैशांकरता व गावभरच्या कुचाळक्या करायला, त्याची बायको चार घरी पोळ्या करायला जाई. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....
अप्पाला एक मुलगीही होती. ती मात्र खरोखर हुशार होती. अप्पाचा तिच्यावर खूप जीव होता. दहावी पास झाल्यावर अप्पाचा एक भाऊ तिला पुढील शिक्षणासाठी शहरात घेऊन गेला. मुलगी शहरात गेल्यावर मात्र अप्पा खूप उदास झाला. पूर्वी आम्ही भेटल्यावर जरा तरी चार शब्द बोलणारा अप्पा, अजिबात बोलेनासा झाला. दिवस ढकलणं यापलीकडे आता त्याला काही उद्योग नव्हता. त्याला ओळखणारी बहुतेक कुटुंबे आता शहरात स्थायिक झाली होती. त्यामुळे हक्कानं त्याला कामं सांगणारं, सणावाराला जेवायला बोलावणारं, गावात फारसं कुणी उरलं नव्हतं. आकाशाकडे बघत बसून असायचा.
एके दिवशी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर एक रेघोटीसुद्धा न उठवता, अप्पा मरून गेला.
कुणालाच त्याचं काही वाटलं नाही....
© chamanchidi.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा