मुख्य सामग्रीवर वगळा

पेटीवाला

पुणे शहरातील एका अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा नाक्यावर वर्षानुवर्षं आमचा कट्टा होता. अत्यंत प्रसिद्ध अशा पेठेतल्या एका महत्वाच्या रस्त्याला तिरपी टांग मारून एक पुणेरी बोळ जात असे. बरोब्बर त्याच स्ट्रॅटेजिक पॉइंटला एका बाजूला खास पुणेरी हॉटेल, जिथे अतिशय छान कॉफी मिळत असे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत चविष्ट असा कांदा उत्तप्पा खिलवणारे उडप्याचे हॉटेल होते. पलीकडेच एक गायन क्लास होता. त्याच्या पायऱ्या हा आमचा कट्टा.

इतर कुठल्याही कट्ट्याप्रमाणे वाच्य व अर्वाच्य गप्पा हा आमच्याही कट्ट्याचा मुख्य उद्योग असला तरी जुनी हिंदी गाणी, अभिनेते व अभिनेत्री, क्रिकेट व क्रिकेटपटू हेही विषय आम्हाला वर्ज्य नव्हते. विशेषतः जुनी हिंदी गाणी जर सुरू झाली तर आम्हाला भंकस करायलाही आठवण राहायची नाही.

या सगळ्याव्यतिरिक्त रस्त्यावरून येणारी जाणारी लोकं हा ही एक मनोरंजनाचा व निरीक्षणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. क्वचित एखादेवेळी कट्ट्यावर एकटा जरी कोणी असेल तरी इतरजण येईपर्यंत नुसती लोकं बघण्यातही खूप वेळ जात असे.

हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, सायकलवाले, नुकतीच लग्न झालेली जोडपी, म्हातारी जोडपी, आईच्या हाताला धरून जाणारं पोर, शाळा सुटल्यावर जाणाऱ्या पोरांच्या व पोरींच्या टोळ्या, कुठलं तरी देवदर्शन करून सुनांच्या कागाळ्या करत निघालेल्या म्हाताऱ्या,  एखादा हातवारे करत जाणारा वेडा, अंगावर चाबूक मारून घेणारे पोतराज, नंदीबैलवाले, एकतारी वाजवत भजन म्हणणारा वारकरी, मधेच एखादा पोलीस आणि अर्थातच जवळच्या कॉलेज मधली प्रेक्षणीय स्थळं. यादी संपायची नाही.

असंच एकदा आम्ही काहीतरी गहन चर्चा करत होतो. अचानक पेटीचे सुरेल स्वर कानावर पडले. इतके सुरेल की आमची गहन चर्चा एकदम बंद पडली व आम्ही कोण पेटी वाजवतंय त्याचा अंदाज घेऊ लागलो. एक नक्की होतं की ही पेटी शेजारच्या गायनक्लासात वाजत नव्हती. थोड्याच वेळात ती पेटी व त्यामागचा वाजवणारा कलाकार आम्हाला दिसले. आमच्याच बाजूला येत होते. थोडं पुढं आल्यावर तो दिसला. वरच्या यादीत त्याचं नाव आलं नाही कारण आमच्या त्या कट्ट्यावर पहिल्यांदाच तो दिसत होता.

मध्यम उंची, काळसर रंगाची पॅण्ट, कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला फुलशर्ट, भरमसाट वाढलेले व विस्कटलेले केस, उन्हापावसानं व परिस्थितीनं रापलेला, काळवंडलेला चेहरा असा एक माणूस एक जुनाट पण चांगल्या आवाजाची पेटी गळ्यात अडकवून वाजवत येत होता. तो भीक मागत नव्हता. आपल्याच तंद्रीत वाजवत चालला होता. पण येणारेजाणारे त्याच्या पेटीवर नाणी टाकत होते. त्याच्याकडे बघताना झटक्यात आमच्या लक्षात आली ती त्याची लांबसडक बोटं आणि वाजवताना एकचित्त झाल्याने कपाळावर पडलेली एक ओझरती आठी. एका सच्च्या व तरबेज कलाकाराची ती लक्षणं होती. पण तो कोण असावा किंवा होता याचा काहीही अंदाज त्याच्याकडे बघून येत नव्हता.

ज्या सुरांमुळे आम्ही त्याच्याकडे ओढले गेलो होतो, ते गाणं होतं १९६६ च्या 'दादी माँ' चित्रपटातलं मन्ना डे व महेंद्र कपूर यांनी गायलेलं 'उसको नहीं देखा हमने कभी' हे गाणं. गाण्यातल्या छोट्याछोट्या जागासुद्धा तो त्या पेटीवर अगदी सहज घेत होता. विशेषतः त्यातली ती 'ए माँSSS' अशी जी तान आहे, ती तर फार सुरेख वाजवत होता. आमच्यापाशी पोचेपर्यंत त्याचं हे गाणं वाजवून संपलं. पुढचं गाणं वाजवायला लागणार तितक्यात आम्ही त्याला आमच्यापाशी बोलावलं. एक रुपया दिला व पुन्हा तेच गाणं वाजवायला सांगितलं. एक अक्षरही न बोलता त्यानं सुरुवात केली. पुन्हा एक रुपया, पुन्हा तेच गाणं. मोजून नऊ वेळा आम्ही त्याला तेच गाणं वाजवायला लावलं. आम्ही खूष...

पण तो मात्र कुठलीही भावना न दाखवता, एक नवीन गाणं वाजवत पुढे निघाला. तेव्हढ्यात आमच्यातल्या एकानं आवाज टाकला, "ओ भाईसाब, ऐसेही रोज आया करो. आप गाना बजाओ, हम पैसे देंगे."

इतका वेळ कुठल्याही भावना व्यक्त न करणाऱ्या त्यानं आता मात्र मागे वळून पाहिलं, फक्त क्षणभर हसला व पुढे निघून गेला....

आजतागायत आम्हाला कोणालाही तो परत दिसला नाहीये....

टिप्पण्या

  1. मोजक्या शब्दात समर्पक वर्णन.....हुर हूर लावणारे.....असे किती तर आपल्याला भेटतात आणि " एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट" याप्रमाणे पुन्हा कधी भेटत नाहीत. अवचितपणे त्यांची आठवण येते जणू खपली निघावी तशी....म्हणून वरील ब्लॉग आवडला

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून