मुख्य सामग्रीवर वगळा

मैत्र

हे जे एक शहर आहे ना, ते इतर शहरांपेक्षा खूपच वेगळं आहे. सायकलींचं शहर, दुचाकींचं शहर, शहाण्या माणसांचं व विद्वानांचं शहर, पेन्शनरांचं शहर अशा विविध विशेषणांनी हे शहर जगप्रसिद्ध आहे. शहरात व उपनगरात पेन्शनरांचे अनेक ग्रूप्स आहेत. जगातल्या प्रत्येक घटनेवर मत व्यक्त करणे व जगातल्या प्रत्येकाला सल्ले देणे, हे या ग्रूप्सचे मुख्य व एकमेव काम असते.

अशाच एका ग्रूपमधे दोन ज्येष्ठ तरुण होते. मत व्यक्त करणे व सल्ले देणे या ग्रुप ऍक्टिव्हिटीजमधे ते हिरीरीने सहभागी होत. मनाने जरी तरुण असले तरी खरोखरचे आजोबाही झाले होते. इतर मेंबरांपेक्षा या दोघांची मैत्री अधिक घट्ट होती. खरं तर त्यांची ओळख या ग्रुपमधे आल्यानंतरच, पर्यायाने निवृत्त झाल्यानंतरच, झाली होती. पण प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सोडता, एकूण तब्येत ठणठणीत होती. त्यामुळे विविध ठिकाणी जाऊन, चमचमीत पदार्थ 'चेपणे' हा त्यांच्या मैत्रीतला मुख्य दुवा होता. त्यावरून कंपूतील इतर मेंबर त्यांची थट्टाही करत.

पहिले आजोबा शहरातल्याच मध्यभागातल्या एका प्रसिद्ध पेठेत लहानाचे मोठे झाले होते. शहराजवळच्या औद्योगिक भागातील एका नामवंत कंपनीमधून मोठ्या पदावरून निवृत्त होऊन आता पेठेइतक्याच प्रसिद्ध अशा एका उपनगरात रहात होते.

दुसरे आजोबा मूळ मराठवाड्यातल्या एका दुष्काळी खेड्यात वाढले होते. घरी अठरा विश्वे दारिद्रय, आई वडील शेतमजूर, खाणारी दहा तोंडं, जातीपातींच्या भानगडीतून येणारी अपरिहार्य अवहेलना अशा परिस्थितीतून पुढे आले होते. स्वकष्टातून शिकून पाटबंधारे खात्यात नोकरीला लागले. सरकारी नोकरीतील बदलीची सव्यापसव्ये सांभाळून, निवृत्तीनंतर अखेर याच उपनगरात स्थायिक झाले होते.

टेकडीवरून खाली उतरल्यानंतर एका गल्लीतील उडपी अण्णाकडे अतिशय सुरेख इडली चटणी मिळते यावर दोघांचंही एकमत होतं. आठवड्यातून दोनदा तरी ते दोघे तिथली इडली खायला जात. शेजारशेजारच्या दोन टेबलांवर बसून गप्पा मारत, ते इडलीचा आस्वाद घेत.

असेच एक दिवस दोघे तिथं गेले. इडली खाऊन झाल्यावर एक आजोबा काउंटरवर अण्णाशी गप्पा मारत होते. दुसरे हात धुवायला गेले होते. तेव्हढ्यात 'कार्यकर्त्यांचं' एक टोळकं तिथं आलं.

"काय रे म्हाताऱ्या? एव्हढं सगळीकडे सांगून, ग्वरमिंटनं कायद करून बी तू वागायचं तेच वागतोस ना?"

एकदम ओढवलेल्या प्रसंगाने आजोबा गांगरले. अण्णालाही काही कळेना. त्यातल्या मुख्य टग्यानंच पुढं बोलायला सुरुवात केली.

"बाहेर मोठ्या दोस्तीच्या गप्पा मारतोस आनी हितं मात्र बरोब्बर वेगळ्या बाकडयावर खायला बसतोस नं? तुम्हा लोकांना फटकावूनच काढायला पायजे...."

तेव्हढ्यात दुसरे आजोबा तिथे पोचले. क्षणात सगळा प्रकार त्यांच्या ध्यानात आला.

"मूर्ख माणसा.." ते गरजले. "ये जरा इकडे. बघ स्वतः इथे काय दिसतंय ते" असे म्हणून त्यांनी त्या टग्याला आत खेचले.

"ह्या दोन टेबलांमधली गॅप बघ. बघितलीस? आता आमच्या दोघांची उंची बघ. बघितलीस? मूर्ख माणसा, अरे आम्ही दोघं एका टेबलावर बसलो ना तर आमच्या लांब पायांमुळे आम्हाला नीट बसता येत नाही. म्हणून आम्ही शेजारशेजारच्या टेबलावर बसतो. याद राख जर पुन्हा अर्थाचा अनर्थ केलास आणि माझ्या मित्राला काही बोललास तर..." असं म्हणून त्या टोळक्याला बाजूला करून ते चालायला लागले.

ताठ मानेनं जाणाऱ्या त्या दोघा मित्रांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघायचं धैर्य एकाही कार्यकर्त्यापाशी उरलं नव्हतं......





© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत