मुख्य सामग्रीवर वगळा

मैत्र

हे जे एक शहर आहे ना, ते इतर शहरांपेक्षा खूपच वेगळं आहे. सायकलींचं शहर, दुचाकींचं शहर, शहाण्या माणसांचं व विद्वानांचं शहर, पेन्शनरांचं शहर अशा विविध विशेषणांनी हे शहर जगप्रसिद्ध आहे. शहरात व उपनगरात पेन्शनरांचे अनेक ग्रूप्स आहेत. जगातल्या प्रत्येक घटनेवर मत व्यक्त करणे व जगातल्या प्रत्येकाला सल्ले देणे, हे या ग्रूप्सचे मुख्य व एकमेव काम असते.

अशाच एका ग्रूपमधे दोन ज्येष्ठ तरुण होते. मत व्यक्त करणे व सल्ले देणे या ग्रुप ऍक्टिव्हिटीजमधे ते हिरीरीने सहभागी होत. मनाने जरी तरुण असले तरी खरोखरचे आजोबाही झाले होते. इतर मेंबरांपेक्षा या दोघांची मैत्री अधिक घट्ट होती. खरं तर त्यांची ओळख या ग्रुपमधे आल्यानंतरच, पर्यायाने निवृत्त झाल्यानंतरच, झाली होती. पण प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सोडता, एकूण तब्येत ठणठणीत होती. त्यामुळे विविध ठिकाणी जाऊन, चमचमीत पदार्थ 'चेपणे' हा त्यांच्या मैत्रीतला मुख्य दुवा होता. त्यावरून कंपूतील इतर मेंबर त्यांची थट्टाही करत.

पहिले आजोबा शहरातल्याच मध्यभागातल्या एका प्रसिद्ध पेठेत लहानाचे मोठे झाले होते. शहराजवळच्या औद्योगिक भागातील एका नामवंत कंपनीमधून मोठ्या पदावरून निवृत्त होऊन आता पेठेइतक्याच प्रसिद्ध अशा एका उपनगरात रहात होते.

दुसरे आजोबा मूळ मराठवाड्यातल्या एका दुष्काळी खेड्यात वाढले होते. घरी अठरा विश्वे दारिद्रय, आई वडील शेतमजूर, खाणारी दहा तोंडं, जातीपातींच्या भानगडीतून येणारी अपरिहार्य अवहेलना अशा परिस्थितीतून पुढे आले होते. स्वकष्टातून शिकून पाटबंधारे खात्यात नोकरीला लागले. सरकारी नोकरीतील बदलीची सव्यापसव्ये सांभाळून, निवृत्तीनंतर अखेर याच उपनगरात स्थायिक झाले होते.

टेकडीवरून खाली उतरल्यानंतर एका गल्लीतील उडपी अण्णाकडे अतिशय सुरेख इडली चटणी मिळते यावर दोघांचंही एकमत होतं. आठवड्यातून दोनदा तरी ते दोघे तिथली इडली खायला जात. शेजारशेजारच्या दोन टेबलांवर बसून गप्पा मारत, ते इडलीचा आस्वाद घेत.

असेच एक दिवस दोघे तिथं गेले. इडली खाऊन झाल्यावर एक आजोबा काउंटरवर अण्णाशी गप्पा मारत होते. दुसरे हात धुवायला गेले होते. तेव्हढ्यात 'कार्यकर्त्यांचं' एक टोळकं तिथं आलं.

"काय रे म्हाताऱ्या? एव्हढं सगळीकडे सांगून, ग्वरमिंटनं कायद करून बी तू वागायचं तेच वागतोस ना?"

एकदम ओढवलेल्या प्रसंगाने आजोबा गांगरले. अण्णालाही काही कळेना. त्यातल्या मुख्य टग्यानंच पुढं बोलायला सुरुवात केली.

"बाहेर मोठ्या दोस्तीच्या गप्पा मारतोस आनी हितं मात्र बरोब्बर वेगळ्या बाकडयावर खायला बसतोस नं? तुम्हा लोकांना फटकावूनच काढायला पायजे...."

तेव्हढ्यात दुसरे आजोबा तिथे पोचले. क्षणात सगळा प्रकार त्यांच्या ध्यानात आला.

"मूर्ख माणसा.." ते गरजले. "ये जरा इकडे. बघ स्वतः इथे काय दिसतंय ते" असे म्हणून त्यांनी त्या टग्याला आत खेचले.

"ह्या दोन टेबलांमधली गॅप बघ. बघितलीस? आता आमच्या दोघांची उंची बघ. बघितलीस? मूर्ख माणसा, अरे आम्ही दोघं एका टेबलावर बसलो ना तर आमच्या लांब पायांमुळे आम्हाला नीट बसता येत नाही. म्हणून आम्ही शेजारशेजारच्या टेबलावर बसतो. याद राख जर पुन्हा अर्थाचा अनर्थ केलास आणि माझ्या मित्राला काही बोललास तर..." असं म्हणून त्या टोळक्याला बाजूला करून ते चालायला लागले.

ताठ मानेनं जाणाऱ्या त्या दोघा मित्रांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघायचं धैर्य एकाही कार्यकर्त्यापाशी उरलं नव्हतं......





© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून