मुख्य सामग्रीवर वगळा

तिची गाणी, त्याची गाणी - राज कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ देव, दिलीप आणि राज यांनी गाजवला. एकूणच सुवर्णयुग होते ते. गीत, संगीत, नृत्य, अभिनय, प्रत्येक बाबतीत. ह्या तिघांची, विशेषतः दिलीप आणि राज कपूर यांची गाणी, त्यातल्या अभिनयासाठी सुद्धा लक्षात राहीली आहेत, राहतील. या तिघांपैकी राज कपूर हा यशस्वी दिग्दर्शकही होता. (यातील यशस्वी हा शब्द महत्वाचा). मात्र स्वतःचे असोत किंवा दुसर्‍या दिग्दर्शकांचे असोत, राज कपूरनी अभिनयाच्या बाबतीत डावे उजवे कधीच केले नाही. अर्थातच आज त्याच्या गाण्यांविषयी बोलताना हे महत्वाचे ठरेल. कारण 'त्याच्या' गाण्यांबद्दल बोलताना काही गाणी अशीही असणार आहेत, जी त्यानी गायलेलीच नाहीयेत. Confusing? बघूया...

देव व दिलीप यांना राज कपूर सारखी परंपरा नव्हती. राजकपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे हिंदी नाटक क्षेत्रातील व नंतर हिंदी चित्रपटातील एक नामवंत कलाकार होते. जुन्या पिढीतील रसिकांना आजही त्यांचा 'सिकंदर' आणि मुघले आझम मधला 'अकबर' नक्की आठवतो. जरी वडिलांकडून वारसा मिळाला, तरी राजकपूरने स्वतःची विशिष्ट शैली विकसित केली. ह्या शैलीवर चार्ली चॅप्लिनच्या 'भटक्‍या' (tramp) चा मोठा प्रभाव होता. त्याच्या गाण्यांमधेसुद्धा हा प्रभाव दिसून येतो. भटक्याच्या भूमिकेमुळे राजच्या अभिनयात बेफिकीरपणा, अवखळपणा आणि चटका लावणारे वास्तव यांचे सुरेख मिश्रण बघायला मिळते.राजची अनेक गाणी मला आवडतात. थोडे त्याबद्दल बोलूया.

ह्या अभिनयसम्राटाची शेकडो गाणी आहेत ज्यावर भरभरून लिहीता येईल. पण श्रीखंड कितीही आवडले म्हणून तडस लागेपर्यंत खाऊ नये. म्हणून थोड्याच गाण्यांबद्दल लिहीतो आहे.

१९५९ चा कन्हैया हा तसा काही राजकपूर वा नूतन यांचा फार भारी वगैरे चित्रपट नाही. पण 'रूक जा ओ जानेवाली रूक जा', 'मुझे तुमसे कुछ भी ना चाहीये' 'याद आई आधी रातको कल रात की तौबा' ह्या तीन गाण्यांसाठी हा चित्रपट लक्षात रहातो. गावातला उडाणटप्पू, दारुडा तरूण राज त्याच्या बाटलीला उद्देशून रूक जा ओ जानेवाली रूक जा म्हणत असतो. पण मधेच नूतनचे  शॉट्स टाकून असा भास निर्माण होतो की हे गाणे तिच्यासाठीच म्हणले जातेय. नंतर मात्र परिस्थिती बिघडत जाते. राज नूतनच्या कृष्णप्रेमाचा गैरफायदा घेऊ बघतो. गाव पंचायत काळानुरुप काही विचित्र निर्णय देते. अशा स्थितीत राज म्हणतो, मुझे तुमसे कुछ भी ना चाहीये, मुझे मेरे हालपे छोड दो. ह्या गाण्यात आधीचा राज पूर्णपणे संपलेला असतो. ह्या दोन परिस्थितींमधला बदल राजने जो दाखवलाय ना, तो जरूर बघण्यासारखा आहे.

त्याआधी एक वर्ष म्हणजे १९५८ मधे राजचा परवरीश आला होता. हॉस्पिटल मधील योगायोगात, आईवडील स्वतःचे आणि एका वेश्येचे अशी दोन मुले घेऊन घरी येतात. खुद्द त्यांनाही माहीत नसते की त्यांचा कोण आणि तिचा कोण. मधल्या काळात हिंदी सिनेमाच्या प्रथेप्रमाणे राजचे लग्न माला सिन्हाशी लहानपणीच ठरवलेले असते. मोठा राज दारू पिणे, जुगार खेळणे वगैरे कार्यक्रमातून आपले मूळ रक्त कुणाचे आहे ते दाखवतो. अर्थातच तो गैरसमज असतो. बाकी जाऊ द्या. ह्या भानगडीत माला बरोबर ठरलेले लग्न मोडल्यानंतर राजच्या तोंडी 'आंसू भरी हैं, ये जीवन की राहें, कोई उनसे कहे दे, हमे भूल जाए' हे जे गाणे आहे ना त्यात राजचा अभिनय बघण्यासारखाच आहे. पुढल्या कडव्यात तो म्हणतो,
वादे भुला दें क़सम तोड़ दें वो, हालत पे अपनी हमें छोड़ दें वो
उन्हें घर मुबारक हमें अपनी आँहें, कोई उनसे कह दे ...
ह्या कडव्यानंतर सारंगी वाजवता, वाजवता राजचा जो चेहरा आहे ना, अक्षरशः पाणी येतं डोळ्यात.

'तीसरी कसम' ह्या बासू भट्टाचार्य यांच्या चित्रपटात राजने अप्रतीम अभिनय केलाय. नायिका हिराबाईला बैलगाडीतून नेताना त्याने 'दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमे समाई, काहे को दुनिया बनाई, तूने काहे को दुनिया बनाई' हे गाणे म्हणले आहे. साधी, सरळ, सोपी, सुंदर चाल असलेल्या ह्या गाण्याचे राजने सोने केले आहे. गाण्यात पुढे तो म्हणतो,

प्रीत बनाके तूने जीना सिखाया,
हंसना सिखाया, रोना सिखाया
जीवन के पथ पर मीत मिलाए
मीत मिलाके तूने सपने जगाए
सपने जगाके तूने, काहे को दे दी जुदाई
काहेको दुनिया बनाई, तूने काहेको दुनिया बनाई.... 

ह्यातील 'सपने जगाके तूने, काहे को दे दी जुदाई' ह्या ओळीला कॅमेरा वहीदावरून फिरून राजवर येतो. दोघांचाही अभिनय वर्णनापलिकडचा आहे.

केवळ नायक म्हणून गायलेल्या गाण्यातच त्याने सुरेख अभिनय केला आहे असे नाही, तर नंतर म्हातारपणी केवळ एका गाण्यापुरते दिसून सुद्धा शब्दांना दिलेला न्याय बघायचा असेल 'धरम करम' मधले 'इक दिन बिक जाएगा, माटी के मोल' हे गाणे बघा. यात पहिल्या कडव्याच्या शेवटच्या ओळी म्हणताना, वयस्क आजोबा ज्या अधिकारात हे म्हणू शकतात, तो प्रेमळ अधिकार दाखवतानाचा राजचा चेहरा बघाच. तो सांगतो...
अनहोनी पग में काँटें लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए
ये बिरहा ये दूरी, दो पल की मजबूरी, फिर कोई दिलवाला काहे को घबराये,
धारा तो बहती है, बहके रहती है, बहती धारा बन जा, फिर दुनिया से डोल

एखाद्या हताश झालेल्या नातवाला आजोबांनी समजवावे तसे वाटते, नाही का...?
जाता जाता आमच्या कट्ट्यावर लावलेला एक शोध राज खरा ठरवतो. तो असा की स्वतः दिग्दर्शित केलेल्या पेक्षा दुसर्‍यांनी केलेल्या चित्रपटात राजने जास्त चांगला अभिनय केला आहे.

अखेरीस एक गाणे जे राजसाठी होते. पण त्याच्यावर चित्रित होऊ शकले नाही. तोच का? ज्या ज्या कोणाला घेऊन हे गाणे करायचे असे राकेश रोशनने ठरवले होते, त्यातील कोणालाही घेऊन हे गाणे होऊ शकले नाही. स्वतःचे वडील, संगीतकार रोशन, यांच्या संगीतात, मुकेशने गायलेले, राजसाहेब अभिनीत गाणे करायचे असे राकेश रोशनने ठरवले होते. या ना त्या कारणाने योग आला नाही. पण योगायोग पहा. पुढे कित्येक वर्षांनी राजच्या मुलाने, ऋषी कपूरने राकेश रोशनच्या चित्रपटात गाणे गायले, जे गायले मुकेशच्या मुलाने, नितीन मुकेशने, ज्याला संगीतबद्ध केले होते रोशनच्या मुलाने, राजेश रोशनने....

चित्रपट होता 'खुदगर्ज' व गाण्याचे बोल होते....

कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगो,
रह जाती हैं दोस्ती
ज़िन्दगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम ज़िन्दगी

काय लिहू अजून....???

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून