मुख्य सामग्रीवर वगळा

तिची गाणी, त्याची गाणी - राज कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ देव, दिलीप आणि राज यांनी गाजवला. एकूणच सुवर्णयुग होते ते. गीत, संगीत, नृत्य, अभिनय, प्रत्येक बाबतीत. ह्या तिघांची, विशेषतः दिलीप आणि राज कपूर यांची गाणी, त्यातल्या अभिनयासाठी सुद्धा लक्षात राहीली आहेत, राहतील. या तिघांपैकी राज कपूर हा यशस्वी दिग्दर्शकही होता. (यातील यशस्वी हा शब्द महत्वाचा). मात्र स्वतःचे असोत किंवा दुसर्‍या दिग्दर्शकांचे असोत, राज कपूरनी अभिनयाच्या बाबतीत डावे उजवे कधीच केले नाही. अर्थातच आज त्याच्या गाण्यांविषयी बोलताना हे महत्वाचे ठरेल. कारण 'त्याच्या' गाण्यांबद्दल बोलताना काही गाणी अशीही असणार आहेत, जी त्यानी गायलेलीच नाहीयेत. Confusing? बघूया...

देव व दिलीप यांना राज कपूर सारखी परंपरा नव्हती. राजकपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे हिंदी नाटक क्षेत्रातील व नंतर हिंदी चित्रपटातील एक नामवंत कलाकार होते. जुन्या पिढीतील रसिकांना आजही त्यांचा 'सिकंदर' आणि मुघले आझम मधला 'अकबर' नक्की आठवतो. जरी वडिलांकडून वारसा मिळाला, तरी राजकपूरने स्वतःची विशिष्ट शैली विकसित केली. ह्या शैलीवर चार्ली चॅप्लिनच्या 'भटक्‍या' (tramp) चा मोठा प्रभाव होता. त्याच्या गाण्यांमधेसुद्धा हा प्रभाव दिसून येतो. भटक्याच्या भूमिकेमुळे राजच्या अभिनयात बेफिकीरपणा, अवखळपणा आणि चटका लावणारे वास्तव यांचे सुरेख मिश्रण बघायला मिळते.राजची अनेक गाणी मला आवडतात. थोडे त्याबद्दल बोलूया.

ह्या अभिनयसम्राटाची शेकडो गाणी आहेत ज्यावर भरभरून लिहीता येईल. पण श्रीखंड कितीही आवडले म्हणून तडस लागेपर्यंत खाऊ नये. म्हणून थोड्याच गाण्यांबद्दल लिहीतो आहे.

१९५९ चा कन्हैया हा तसा काही राजकपूर वा नूतन यांचा फार भारी वगैरे चित्रपट नाही. पण 'रूक जा ओ जानेवाली रूक जा', 'मुझे तुमसे कुछ भी ना चाहीये' 'याद आई आधी रातको कल रात की तौबा' ह्या तीन गाण्यांसाठी हा चित्रपट लक्षात रहातो. गावातला उडाणटप्पू, दारुडा तरूण राज त्याच्या बाटलीला उद्देशून रूक जा ओ जानेवाली रूक जा म्हणत असतो. पण मधेच नूतनचे  शॉट्स टाकून असा भास निर्माण होतो की हे गाणे तिच्यासाठीच म्हणले जातेय. नंतर मात्र परिस्थिती बिघडत जाते. राज नूतनच्या कृष्णप्रेमाचा गैरफायदा घेऊ बघतो. गाव पंचायत काळानुरुप काही विचित्र निर्णय देते. अशा स्थितीत राज म्हणतो, मुझे तुमसे कुछ भी ना चाहीये, मुझे मेरे हालपे छोड दो. ह्या गाण्यात आधीचा राज पूर्णपणे संपलेला असतो. ह्या दोन परिस्थितींमधला बदल राजने जो दाखवलाय ना, तो जरूर बघण्यासारखा आहे.

त्याआधी एक वर्ष म्हणजे १९५८ मधे राजचा परवरीश आला होता. हॉस्पिटल मधील योगायोगात, आईवडील स्वतःचे आणि एका वेश्येचे अशी दोन मुले घेऊन घरी येतात. खुद्द त्यांनाही माहीत नसते की त्यांचा कोण आणि तिचा कोण. मधल्या काळात हिंदी सिनेमाच्या प्रथेप्रमाणे राजचे लग्न माला सिन्हाशी लहानपणीच ठरवलेले असते. मोठा राज दारू पिणे, जुगार खेळणे वगैरे कार्यक्रमातून आपले मूळ रक्त कुणाचे आहे ते दाखवतो. अर्थातच तो गैरसमज असतो. बाकी जाऊ द्या. ह्या भानगडीत माला बरोबर ठरलेले लग्न मोडल्यानंतर राजच्या तोंडी 'आंसू भरी हैं, ये जीवन की राहें, कोई उनसे कहे दे, हमे भूल जाए' हे जे गाणे आहे ना त्यात राजचा अभिनय बघण्यासारखाच आहे. पुढल्या कडव्यात तो म्हणतो,
वादे भुला दें क़सम तोड़ दें वो, हालत पे अपनी हमें छोड़ दें वो
उन्हें घर मुबारक हमें अपनी आँहें, कोई उनसे कह दे ...
ह्या कडव्यानंतर सारंगी वाजवता, वाजवता राजचा जो चेहरा आहे ना, अक्षरशः पाणी येतं डोळ्यात.

'तीसरी कसम' ह्या बासू भट्टाचार्य यांच्या चित्रपटात राजने अप्रतीम अभिनय केलाय. नायिका हिराबाईला बैलगाडीतून नेताना त्याने 'दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमे समाई, काहे को दुनिया बनाई, तूने काहे को दुनिया बनाई' हे गाणे म्हणले आहे. साधी, सरळ, सोपी, सुंदर चाल असलेल्या ह्या गाण्याचे राजने सोने केले आहे. गाण्यात पुढे तो म्हणतो,

प्रीत बनाके तूने जीना सिखाया,
हंसना सिखाया, रोना सिखाया
जीवन के पथ पर मीत मिलाए
मीत मिलाके तूने सपने जगाए
सपने जगाके तूने, काहे को दे दी जुदाई
काहेको दुनिया बनाई, तूने काहेको दुनिया बनाई.... 

ह्यातील 'सपने जगाके तूने, काहे को दे दी जुदाई' ह्या ओळीला कॅमेरा वहीदावरून फिरून राजवर येतो. दोघांचाही अभिनय वर्णनापलिकडचा आहे.

केवळ नायक म्हणून गायलेल्या गाण्यातच त्याने सुरेख अभिनय केला आहे असे नाही, तर नंतर म्हातारपणी केवळ एका गाण्यापुरते दिसून सुद्धा शब्दांना दिलेला न्याय बघायचा असेल 'धरम करम' मधले 'इक दिन बिक जाएगा, माटी के मोल' हे गाणे बघा. यात पहिल्या कडव्याच्या शेवटच्या ओळी म्हणताना, वयस्क आजोबा ज्या अधिकारात हे म्हणू शकतात, तो प्रेमळ अधिकार दाखवतानाचा राजचा चेहरा बघाच. तो सांगतो...
अनहोनी पग में काँटें लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए
ये बिरहा ये दूरी, दो पल की मजबूरी, फिर कोई दिलवाला काहे को घबराये,
धारा तो बहती है, बहके रहती है, बहती धारा बन जा, फिर दुनिया से डोल

एखाद्या हताश झालेल्या नातवाला आजोबांनी समजवावे तसे वाटते, नाही का...?
जाता जाता आमच्या कट्ट्यावर लावलेला एक शोध राज खरा ठरवतो. तो असा की स्वतः दिग्दर्शित केलेल्या पेक्षा दुसर्‍यांनी केलेल्या चित्रपटात राजने जास्त चांगला अभिनय केला आहे.

अखेरीस एक गाणे जे राजसाठी होते. पण त्याच्यावर चित्रित होऊ शकले नाही. तोच का? ज्या ज्या कोणाला घेऊन हे गाणे करायचे असे राकेश रोशनने ठरवले होते, त्यातील कोणालाही घेऊन हे गाणे होऊ शकले नाही. स्वतःचे वडील, संगीतकार रोशन, यांच्या संगीतात, मुकेशने गायलेले, राजसाहेब अभिनीत गाणे करायचे असे राकेश रोशनने ठरवले होते. या ना त्या कारणाने योग आला नाही. पण योगायोग पहा. पुढे कित्येक वर्षांनी राजच्या मुलाने, ऋषी कपूरने राकेश रोशनच्या चित्रपटात गाणे गायले, जे गायले मुकेशच्या मुलाने, नितीन मुकेशने, ज्याला संगीतबद्ध केले होते रोशनच्या मुलाने, राजेश रोशनने....

चित्रपट होता 'खुदगर्ज' व गाण्याचे बोल होते....

कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगो,
रह जाती हैं दोस्ती
ज़िन्दगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम ज़िन्दगी

काय लिहू अजून....???

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत