मुख्य सामग्रीवर वगळा

तिची गाणी / त्याची गाणी


मध्यंतरी काही काळ, मी राहातो त्या सोसायटीच्या हस्तलिखित मासिकात कट्ट्यावरच्या गप्पा नावाचे सदर लिहीत होतो. सप्टेम्बरमधे प्रकाशित झालेल्या अंकापासून मी कट्ट्यावर बसून गप्पा झोडायचे थांबवले. पण काळाचा महिमा बघा. ज्या गप्पा मारण्याबद्दल, एके काळी मी ज्येष्ठ मंडळींची बोलणी खाल्ली, त्याच आता मारायच्या थांबवल्याबद्दल खाल्ली. अर्थात यात सर्वांचा जिव्हाळा प्रेमच दिसून येते. अनेकांनी भेटून पुन्हा काहीतरी लिहायचा आग्रह केला. केवळ या एका कारणासाठी पुन्हा लिहायचे ठरवले.


सोसायटीतील किंवा फेसबुकवरील किंवा इतर वर्तुळातील, अष्टपैलू मंडळींच्या तुलनेत मी कोणीच नाही. मूळ पिंड टवाळखोरीचा असल्याकारणाने आजूबाजूची प्रत्येक गोष्ट, व्यक्ती आणि परीस्थिती यांना हसण्यावारी नेण्यात आजपर्यंत वेळ घालवला आहे. त्यामुळे साहित्य, संगीत कला याबाबतीत अगदीच 'विहीन' नसलो तरी 'हीन' नक्कीच आहे. अशा परीस्थितीत पुन्हा लिहायचे तरी काय असा एक यक्षप्रश्न उभा राहिला. मधल्या काळात ब्लॉगवर लिहीण्याचा मूड सुद्धा थोडा वेगळा होता. अनेक दिवस मनात घोळत असलेली व्यक्तिचित्रे लिहून पूर्ण केली. त्याचेही तुम्ही सर्वांनी कौतुक केलेत. पण येऊन जाऊन प्रभुत्व असलेला विषय एकच. हिंदी चित्रपट संगीत. त्याच त्याच गप्पा मारायला हरकत नव्हती. पण वाचणार्याचा तरी किती अंत बघायचा.


नेमके याच वेळी, एरवी गप्पा झोडण्याबद्दल टोचून आणि टाकून बोलायला आघाडीवर असणारी माझी बायको मदतीला आली….

गाणी आणि अभिनय यावर एकत्र काही लिहू शकशील का...? एरवी काय होते की अभिनयाबद्दल बोलताना फक्त संवादच लक्षात घेतोस. आणि गाणी म्हणालं की गायक, संगीतकार आणि फारतर गीतकार यावर बोलतोस……..”

गुड आइडिया... अनेक अभिनेते अभिनेत्री असे आहेत की जे केवळ संवादच नव्हे तर गीते ही उत्कृष्ट पद्धतीने अभिनीत करतात, केली आहेत.... “
“……….”

ठीक आहे... एक काम कर. एका वेळेला कुणा एकाच्याच अभिनय गाण्यांबद्दल लिही...”

ह्या संवादाने मला पुन्हा एकदा विषय मिळाला. विचार करू लागल्यानंतर एक अडचण लक्षात आली. अभिनय गाणी असे एकत्र लिहायचे म्हणल्यावर काही सुंदर गाणी आपोआप बाद झाली. कारण त्यातील कलाकार (?). उदा. बैजू बावरा. गाणी कितीही चांगली असली तरी त्या भारतभूषणचे काय करू? तसेच तो विश्वजीत, तो जॉय मुखर्जी, ती सायराबानू, ती आशा पारेख आणि कितीतरी. बरं ही नावं टाळताना एक धोक्याची जागा म्हणजे ह्या लोकांचेही फॅन्स असू शकतात. एकदा एका प्रवासात मला एक आजोबा भेटले. मी हेडफोन लावून गाणी ऐकत होतो. जरा मला पण द्या की ऐकायला असे म्हणून माझ्याकडून मागून घेतला. नेमके बैजूबावरा मधले गाणे चालू होते. आजोबा खूष. मला वाटले रफीचा आवाज ऐकून खूष झाले त्यात नवल ते काय. अचानक बोलायला लागले, "लोकांनीना भारतभूषण वर फार अन्याय केलाय. तुम्ही समजता तितका काही तो वाईट कलाकार नाहीये....." बरंच काय काय बोलले. इतका मोठा मानसिक धक्का मला त्यापूर्वी व त्यानंतर कधीही बसला नाहीये. ते सगळं ऐकताना माझा चेहरा बहुधा भारतभूषण इतकाच बापुडवाणा झाला असणार हे नक्की.

पण अनेक कलाकार असेही आहेत की ज्यांच्याबद्दल लिहायला हवेच. राज कपूर, वहीदा रहमान, नूतन, दिलीपकुमार, अमिताभ. एक एक गाणी अमर करून ठेवली आहेत. आणखीन एक गोष्ट लक्षात आली की हे सगळे करताना माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेवून हे काम करावे लागणार आहे. कदाचित अतिप्रिय देव आनंदलाही बाजूला ठेवावं लागणार असं दिसतंय. ठीक आहे. काय हरकत आहे? ठेवू बाजूला ह्यावेळी...

पुढील काही दिवसात काही सुरेख गाण्यांमधे दिग्गज कलाकारांनी कसा अभिनय केला आहे त्यामुळे ती गाणी एका वेगळ्या उंचीवर कशी नेली आहेत, त्याबद्दल बोलूया. एक आहे की वेळ आणि जागा यांचा विचार करता या कलाकारांच्या सर्व गाण्यांचा परामर्श घेणे शक्य नाही. त्यामुळे दोन चार गाणीच धरून बोलावे लागेल, तरी माफी असावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत