मुख्य सामग्रीवर वगळा

वैमानिक आजोबा

गावातली सगळी पोरं त्यांना वैमानिक आजोबा ह्याच नावानं ओळखायची.

अगदी पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं व त्यांचं हे नाव कळालं तेंव्हा आश्चर्याशिवाय कुठलीही भावना मनात आली नाही. कुठल्यातरी कार्यानिमित्त ब्राम्हण म्हणून ते जेवायला आले होते. शिडशिडीत पण अशक्त नाही अशी देहयष्टी, गोरे पान, घारे डोळे, छातीपर्यंत वाढलेली दाढी, विस्कटलेले केस,  सुमारे पावणे सहा फूट उंची, स्वच्छ धुतलेलं धोतर व बंडी असा वेष व पायात साध्या स्लीपर्स असूनसुद्धा एखाद्या सैनिकासारखी रुबाबदार चाल, अशा गोंधळात टाकणाऱ्या अवतारात ते आले.

"अनंतराव, पोटभर जेवा हं" माझ्या आजोबांनी त्यांना आदराने पाटावर बसवलं व आग्रह केला. एकही शब्द न बोलता, ते बसले व पोटभर जेवले. हात धुतल्यावर ब्राह्मण या नात्याने समोर ठेवलेली दक्षिणा उचलली व माझ्या हातावर ठेवून सरळ चालू लागले. एकंदरीतच सगळा प्रकार कळण्याच्या पलीकडे गेला होता.

गावात कुठेही फिरताना ते दिसत. कधी बाजारात, कधी पुलावर, कधी स्टॅण्डवर, कधी एखाद्या देवळात बसलेले असत तर कधी नदीकाठच्या घाटावर दिसत. कुणाशीही एक शब्द बोलताना मी त्यांना पाहिलं नव्हतं. गावातली पोरं मात्र सकाळपासून त्यांच्या मागावर असायची. रोज सकाळी नित्यनेमाने ते विष्णूच्या देवळात जायचे. हीच वेळ होती त्यांना गाठायची. कारण त्यानंतर कुठे जातील त्याचा भरवसा नव्हता. पोरं त्यांना शोधायचं कारण म्हणजे वैमानिक आजोबा गणित व इंग्रजीचे चॅम्पियन होते. ह्या दोन विषयांच्या शंका विचारायला पोरं त्यांना शोधत असायची. गणितातला कुठलाही अवघड प्रॉब्लेम, इंग्रजी व्याकरण, धड्याचा अर्थ यासाठी वैमानिक आजोबांशिवाय गावात पर्याय नव्हता. धाडधाड सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन चालायला लागायचे.

वैमानिक आजोबा व माझे आजोबा जवळपास बरोबरीचे. घरी वेदविद्यापारंगत वडील, दोन तीन भाऊ बहिणी असा परिवार होता. एकाच सुमारास माझे आजोबा आर्मीत व वैमानिक आजोबा वायुदलात दाखल झाले. विंग कमांडर होते ते. बायको, दोन मुली असा संसार होता. सगळं काही छान दृष्ट लागण्यासारखं होतं. आणि ती लागलीच.

कुठेतरी अंबाला पठाणकोटच्या बाजूला त्यांचं पोस्टिंग होतं. एक दिवस नेहमीसारखे ड्युटीवर निघाले. बायकोला सकाळपासून जरा अस्वस्थ वाटत होतं. त्यादिवशी त्यांनी  सुट्टी घेऊन जरा घरी थांबावं असं बायकोला वाटत होतं. पण विनाकारण सुट्टी टाकणं ह्यांच्या सैनिकी शिस्तीत बसेना. आलोच, म्हणून कामावर गेले. दुपारी जेवायला परत आले तर सोफ्यावर बायको कायमची सोडून गेली होती. मुलींना बहिणीच्या हाती सोपवलं व नोकरीचा राजीनामा देऊन गावी परत आले. दोघं भाऊ नोकरीधंद्यानिमित्त दुसऱ्या शहरात होते. गावात आता त्यांचं कुणीच नव्हतं.

बायकोचं न ऐकल्याचं दुःख मनाशी बाळगत, शेवटपर्यंत एकटेच गावात भटकत, फिरत राहिले.

त्यांनी त्यांचा सुखी संसार गमावला होता व देशानं एक गुणी वैमानिक....


© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत