मुख्य सामग्रीवर वगळा

वैमानिक आजोबा

गावातली सगळी पोरं त्यांना वैमानिक आजोबा ह्याच नावानं ओळखायची.

अगदी पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं व त्यांचं हे नाव कळालं तेंव्हा आश्चर्याशिवाय कुठलीही भावना मनात आली नाही. कुठल्यातरी कार्यानिमित्त ब्राम्हण म्हणून ते जेवायला आले होते. शिडशिडीत पण अशक्त नाही अशी देहयष्टी, गोरे पान, घारे डोळे, छातीपर्यंत वाढलेली दाढी, विस्कटलेले केस,  सुमारे पावणे सहा फूट उंची, स्वच्छ धुतलेलं धोतर व बंडी असा वेष व पायात साध्या स्लीपर्स असूनसुद्धा एखाद्या सैनिकासारखी रुबाबदार चाल, अशा गोंधळात टाकणाऱ्या अवतारात ते आले.

"अनंतराव, पोटभर जेवा हं" माझ्या आजोबांनी त्यांना आदराने पाटावर बसवलं व आग्रह केला. एकही शब्द न बोलता, ते बसले व पोटभर जेवले. हात धुतल्यावर ब्राह्मण या नात्याने समोर ठेवलेली दक्षिणा उचलली व माझ्या हातावर ठेवून सरळ चालू लागले. एकंदरीतच सगळा प्रकार कळण्याच्या पलीकडे गेला होता.

गावात कुठेही फिरताना ते दिसत. कधी बाजारात, कधी पुलावर, कधी स्टॅण्डवर, कधी एखाद्या देवळात बसलेले असत तर कधी नदीकाठच्या घाटावर दिसत. कुणाशीही एक शब्द बोलताना मी त्यांना पाहिलं नव्हतं. गावातली पोरं मात्र सकाळपासून त्यांच्या मागावर असायची. रोज सकाळी नित्यनेमाने ते विष्णूच्या देवळात जायचे. हीच वेळ होती त्यांना गाठायची. कारण त्यानंतर कुठे जातील त्याचा भरवसा नव्हता. पोरं त्यांना शोधायचं कारण म्हणजे वैमानिक आजोबा गणित व इंग्रजीचे चॅम्पियन होते. ह्या दोन विषयांच्या शंका विचारायला पोरं त्यांना शोधत असायची. गणितातला कुठलाही अवघड प्रॉब्लेम, इंग्रजी व्याकरण, धड्याचा अर्थ यासाठी वैमानिक आजोबांशिवाय गावात पर्याय नव्हता. धाडधाड सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन चालायला लागायचे.

वैमानिक आजोबा व माझे आजोबा जवळपास बरोबरीचे. घरी वेदविद्यापारंगत वडील, दोन तीन भाऊ बहिणी असा परिवार होता. एकाच सुमारास माझे आजोबा आर्मीत व वैमानिक आजोबा वायुदलात दाखल झाले. विंग कमांडर होते ते. बायको, दोन मुली असा संसार होता. सगळं काही छान दृष्ट लागण्यासारखं होतं. आणि ती लागलीच.

कुठेतरी अंबाला पठाणकोटच्या बाजूला त्यांचं पोस्टिंग होतं. एक दिवस नेहमीसारखे ड्युटीवर निघाले. बायकोला सकाळपासून जरा अस्वस्थ वाटत होतं. त्यादिवशी त्यांनी  सुट्टी घेऊन जरा घरी थांबावं असं बायकोला वाटत होतं. पण विनाकारण सुट्टी टाकणं ह्यांच्या सैनिकी शिस्तीत बसेना. आलोच, म्हणून कामावर गेले. दुपारी जेवायला परत आले तर सोफ्यावर बायको कायमची सोडून गेली होती. मुलींना बहिणीच्या हाती सोपवलं व नोकरीचा राजीनामा देऊन गावी परत आले. दोघं भाऊ नोकरीधंद्यानिमित्त दुसऱ्या शहरात होते. गावात आता त्यांचं कुणीच नव्हतं.

बायकोचं न ऐकल्याचं दुःख मनाशी बाळगत, शेवटपर्यंत एकटेच गावात भटकत, फिरत राहिले.

त्यांनी त्यांचा सुखी संसार गमावला होता व देशानं एक गुणी वैमानिक....


© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...