मुख्य सामग्रीवर वगळा

बिनडोक आंदोलने

व्यथित....

माझ्या आत्ताच्या मनःस्थितीला दुसरा शब्द नाही. आणि माझ्यासारखाच प्रत्येक सामान्य मनुष्य असाच व्यथित झालेला असणार आहे. अरे चाललंय काय? लाखो लिटर दूध सरळ ओतून देताय? दुधाला योग्य तो भाव मिळत नाहीये, हे कारण आम्हाला माहीत आहे आणि मान्य पण आहे. योग्य भाव मिळालाच पाहिजे यात वाद नाही. पण त्यासाठी पत्करलेला मार्ग सर्वस्वी अयोग्य व अन्यायकारक आहे.

दूधच का? हल्ली प्रत्येक पीक रस्त्यावर टाकून नाश करायचा व आम्ही आंदोलन करतोय असे म्हणायचे, ही एक फॅशन झालीय. मागे टोमॅटो टाकले, त्याआधी कांदे झाले, कोथिंबीर झाली. आज वळून पाहिले तर नक्की कोणाचा फायदा झाला हे लगेच लक्षात येईल. शेतकऱ्याचा नक्कीच झालेला नाहीये.

प्रत्येक वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला तरी वेठीला धरायचे व काम संपल्यावर अलगद कल्टी मारायची. आंदोलन करणाऱ्यांपैकी नक्की किती जण स्वतः पोळलेले असतात हे पाहिले तर लक्षात येते की केवळ गुंडापुंडांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांचा व गवळ्यांचा माल हिसकावून घेऊन तो रस्त्यात टाकला गेलाय. कमी तर कमी, दोन पैसे मिळाले असते, ते ही गेले.

आंदोलनामुळे साद्ध्य काय झाले? काही नाही. हजारो, लाखो लोक ज्यांचा ह्या भाव ठरवण्याशी काही संबंध नाही, असे लोक निष्कारण भरडले गेले. कितीतरी कच्चीबच्ची असतील, कितीतरी आजारी, वृद्ध असतील, कितीतरी खेळाडू असतील, ज्यांना आज गरज असून दूध मिळालं नसेल. रस्त्यावर ओतून देण्यापेक्षा त्या मेळघाटातल्या, हेमलकासातल्या कुपोषित मुलांना वाटले असतेत ना, शेतकरीच काय, सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता.

बरं. आंदोलनाचे कारण काय तर शासनाचे डोळे उघडावेत म्हणून. मला एक सांगा, प्रत्येक गोष्टीला शासन जबाबदार? प्रत्येक गोष्ट शासनाने करावी. अरे पण मग तुम्ही काय करणार? मुख्य कारणं राहिली बाजूला. सगळ्यात मोठे कारण आहे मधले दलाल. पण त्यांना हात नाही लावणार. कारण एक तर स्वतःचाच तो व्यवसाय आहे किंवा असे दलालच ह्यांचे पोशिंदे आहेत.

ज्यांना मनापासून ह्या गोष्टीची जाणीव आहे ना, ते कुणासाठीही न थांबता योग्य ते काम करत आहेत. अगदी कॉर्पोरेट, व्यावसायिक पद्धतीने करत आहेत. श्रीरामपूरचं 'प्रभात' आहे, भिलवडीचे 'चितळे' आहेत. वर्षानुवर्षे शेतकरी ह्यांना दूध विकताहेत. पण कुणाचीही तक्रार नाहीये. ह्या व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या अनेक सोयी केल्यात, त्यांना मदत केली आहे. त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या पद्धतीने, शासनाकडे न बघता. ह्यांना दूध विकून लोकांनी संसार उभे केलेत.

असं काही विधायक  करण्याऐवजी, अत्यंत बिनडोक पद्धतीने, विध्वंसक वागणं चालू आहे. तुम्ही, मी, आपण सामान्य लोक, एकएकटे काही करू शकत नाही. पण हे कशासाठी चालू आहे ते आपणा सर्वांना नक्कीच कळतंय.  योग्य वेळी, योग्य पद्धतीने आपण ह्या झुंडांना, पुंडांना व गुंडांना धडा नक्कीच शिकवू शकतो. ती वेळ आलेली आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून