मुख्य सामग्रीवर वगळा

बिनडोक आंदोलने

व्यथित....

माझ्या आत्ताच्या मनःस्थितीला दुसरा शब्द नाही. आणि माझ्यासारखाच प्रत्येक सामान्य मनुष्य असाच व्यथित झालेला असणार आहे. अरे चाललंय काय? लाखो लिटर दूध सरळ ओतून देताय? दुधाला योग्य तो भाव मिळत नाहीये, हे कारण आम्हाला माहीत आहे आणि मान्य पण आहे. योग्य भाव मिळालाच पाहिजे यात वाद नाही. पण त्यासाठी पत्करलेला मार्ग सर्वस्वी अयोग्य व अन्यायकारक आहे.

दूधच का? हल्ली प्रत्येक पीक रस्त्यावर टाकून नाश करायचा व आम्ही आंदोलन करतोय असे म्हणायचे, ही एक फॅशन झालीय. मागे टोमॅटो टाकले, त्याआधी कांदे झाले, कोथिंबीर झाली. आज वळून पाहिले तर नक्की कोणाचा फायदा झाला हे लगेच लक्षात येईल. शेतकऱ्याचा नक्कीच झालेला नाहीये.

प्रत्येक वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला तरी वेठीला धरायचे व काम संपल्यावर अलगद कल्टी मारायची. आंदोलन करणाऱ्यांपैकी नक्की किती जण स्वतः पोळलेले असतात हे पाहिले तर लक्षात येते की केवळ गुंडापुंडांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांचा व गवळ्यांचा माल हिसकावून घेऊन तो रस्त्यात टाकला गेलाय. कमी तर कमी, दोन पैसे मिळाले असते, ते ही गेले.

आंदोलनामुळे साद्ध्य काय झाले? काही नाही. हजारो, लाखो लोक ज्यांचा ह्या भाव ठरवण्याशी काही संबंध नाही, असे लोक निष्कारण भरडले गेले. कितीतरी कच्चीबच्ची असतील, कितीतरी आजारी, वृद्ध असतील, कितीतरी खेळाडू असतील, ज्यांना आज गरज असून दूध मिळालं नसेल. रस्त्यावर ओतून देण्यापेक्षा त्या मेळघाटातल्या, हेमलकासातल्या कुपोषित मुलांना वाटले असतेत ना, शेतकरीच काय, सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता.

बरं. आंदोलनाचे कारण काय तर शासनाचे डोळे उघडावेत म्हणून. मला एक सांगा, प्रत्येक गोष्टीला शासन जबाबदार? प्रत्येक गोष्ट शासनाने करावी. अरे पण मग तुम्ही काय करणार? मुख्य कारणं राहिली बाजूला. सगळ्यात मोठे कारण आहे मधले दलाल. पण त्यांना हात नाही लावणार. कारण एक तर स्वतःचाच तो व्यवसाय आहे किंवा असे दलालच ह्यांचे पोशिंदे आहेत.

ज्यांना मनापासून ह्या गोष्टीची जाणीव आहे ना, ते कुणासाठीही न थांबता योग्य ते काम करत आहेत. अगदी कॉर्पोरेट, व्यावसायिक पद्धतीने करत आहेत. श्रीरामपूरचं 'प्रभात' आहे, भिलवडीचे 'चितळे' आहेत. वर्षानुवर्षे शेतकरी ह्यांना दूध विकताहेत. पण कुणाचीही तक्रार नाहीये. ह्या व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या अनेक सोयी केल्यात, त्यांना मदत केली आहे. त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या पद्धतीने, शासनाकडे न बघता. ह्यांना दूध विकून लोकांनी संसार उभे केलेत.

असं काही विधायक  करण्याऐवजी, अत्यंत बिनडोक पद्धतीने, विध्वंसक वागणं चालू आहे. तुम्ही, मी, आपण सामान्य लोक, एकएकटे काही करू शकत नाही. पण हे कशासाठी चालू आहे ते आपणा सर्वांना नक्कीच कळतंय.  योग्य वेळी, योग्य पद्धतीने आपण ह्या झुंडांना, पुंडांना व गुंडांना धडा नक्कीच शिकवू शकतो. ती वेळ आलेली आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत