मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींचा दरवळ

काल संध्याकाळी ऑफिस मधून घरी येताना रस्त्याच्या एका कोपऱ्यावर गाडीवाल्याने माझ्यासमोर वड्यांचा घाणा कढईत सोडला व त्या स्वर्गीय वासाने सारा आसमंत दरवळून गेला. हा वास माझ्या खूप लहानपणापासून परिचयाचा आहे. लहानपणी गावात रहात असताना आईबरोबर मंडईत गेल्यावर हा वास अवश्य येत असे. पण त्याकाळी बाहेरचे खाणे हे बऱ्यापैकी निषिध्द असल्यामुळे त्या वासाशी निगडीत असलेला स्वाद चाखायला मिळाला नव्हता.  बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधे गेल्यानंतर त्या स्वादाशीही संबंध  आला.  इतका आला की नंतर नंतर नुसत्या वासावरून, सोडलेला घाणा हा भज्यांचा आहे का वड्यांचा, हेही ओळखता येऊ लागले. पण आजही तो वास आला की मला लहानपणी आईचे बोट धरून मंडईत गेल्याची आठवण येतेच.

कुठल्या गोष्टीमुळे मन भूतकाळात खेचले जाईल त्याचा नेम नाही. एखादी वस्तू, व्यक्ती, गाणं, आवाज आणि अर्थातच वास. हे सगळे कधी ना कधीतरी घडलेल्या घटनांचे, प्रसंगांचे भागीदार, साक्षीदार असतात. आयुष्याच्या पुढल्या टप्प्यांवर अचानक भेटतात व आपल्याला पुन्हा मागे ओढून नेतात.

मला काही वेळा तर असे वाटते की ज्ञानेश्वरांच्या सुद्धा अशा काही वासांशी जुळलेल्या आठवणी असणार. उगाच नाही त्यांनी 'अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू' म्हणलंय.

आपल्या सर्वांच्या लहानपणाशी जुळलेला एक कॉमन वास म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होतानाच्या दिवसात येणारा नव्याकोऱ्या वह्यापुस्तकांचा वास. मलाच काय, प्रत्येकालाच तो विशिष्ट खळीचा वास, शालेय दिवसात ओढून नेतो.

असाच एका विशिष्ट उदबत्तीचा वास मला आजोळी घेऊन जातो. माझ्या आजोबांना पूजेसाठी तीच उदबत्ती लागायची. आमचे आजोबा सकाळी स्नानानंतर बराच वेळ पूजा करीत. त्यांची पूजा होऊन नैवेद्य दाखवल्याशिवाय आजी जेवायला वाढत नसे. आम्हा सगळ्यांना सकाळपासून खेळल्यामुळे भूक लागलेली असायची. त्यामुळे आमचे लक्ष ह्या वासाकडे असायचे. उदबत्तीचा तो वास आला की आम्ही ओळखायचो की आता लगेच नैवेद्य आणि पुढे पाच मिनिटात जेवायला वाढणार. आजही त्या उदबत्तीच्या वासाने मी मे महिन्यातल्या, आजोळच्या गावातल्या, साडेबारा पाऊणच्या माहौल मधे जातो.

थंडीच्या दिवसात, शनिवारी सकाळची शाळा म्हणजे एक संकट असायचं. भल्या सकाळी साखरझोपेतून जागे होऊन, तसल्या थंडीत आंघोळ करून, शाळेत जायला जिवावर यायचं. मग जाताजाता कुठे एखादी शेकोटी पेटवली असेल तर दोन मिनिटं तिथे हातपाय शेकून पुढं जायचं. अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची कामं चालू असत. ते कामगार डांबर गोठू नये म्हणून त्या पातळ डांबराच्या बॉयलरखाली रात्रभर निखारा पेटता ठेवत. मग आम्ही त्या बॉयलरपाशीसुद्धा एखादा हॉल्ट अवश्य घेत असू. त्या लाकडांच्या निखाऱ्याचा आणि त्या डांबराचा एकत्रित वास असा काही  नाकात बसलाय की कधीही तो वास आला की मला थंडीतल्या शनिवारची शाळा आठवते.

असे अनेक वास, अत्तराचे, धुपाचे, वाटणाचे, तळणाचे, कुटण्याचे, दळण्याचे, सालींचे, गवताचे, मातीचे, झाडांच्या पाल्याचे, शेणाचे, कोळशाचे, चुलीचे, इस्त्रीचे, बसच्या धुराचे,  आणि कसलेकसले वास, कुठल्या ना कुठल्या आठवणी जाग्या करतातच.

मात्र या सगळ्यात प्राजक्ताच्या फुलांचा वास व त्याला जोडून येणारी एका छोट्या मुलीची आठवण 'जरा हटकें' आहे. लहानपणी गावात, श्रावणातल्या एका पावसाळी सकाळी, माझ्या आजीने, पलीकडच्या बर्वे वाड्यातून प्राजक्ताची फुलं आणायला पाठवलं. बर्वेआजी तशा अतिशय खाष्ट होत्या. एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्या राहायच्या. पोराटोरांना त्यांच्या बागेत प्रवेश नसे. पण माझ्या आजीची मैत्रीण असल्यामुळे मी कधीही त्यांच्या बागेत घुसू शकत असे. तर बागेत पोचून मी झाडाखाली किती फुलं पडलीत त्याचा अंदाज घेतला व वेचायला सुरुवात केली. हलकासा पाऊस पडून गेला होता. प्राजक्ताच्या त्या फुलांचा मस्त वास सुटला होता. तेव्हढ्यात कुणीतरी झाड हलवलं. पाण्याचे थेंब अचानक अंगावर पडले. मी शहारून वर पाहीले. एका माझ्याच वयाच्या मुलीने झाड हलवलं होतं. घारी, गोरी, 'बर्वे' आडनावाला शोभणारी, बर्वेआजींची कोणी नात होती ती.

'भरपूर फुलं घे की. चल, मी मदत करते...... '

भराभरा तिनं फुलं वेचली. तोंडानी नॉनस्टॉप बोलत होती. माझ्या हातातली दुरडी भरल्यावरच ती थांबली. मी घरी परत आलो.

आजतागायत ती मला परत दिसली नाहीये. पण कधीही, कुठेही, प्राजक्ताच्या फुलांचा वास मला, तो श्रावण, ते अचानक अंगावर पडलेले पाण्याचे थेंब व त्या छोट्या मुलीची आठवण देऊन जातोच.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून