मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींचा दरवळ

काल संध्याकाळी ऑफिस मधून घरी येताना रस्त्याच्या एका कोपऱ्यावर गाडीवाल्याने माझ्यासमोर वड्यांचा घाणा कढईत सोडला व त्या स्वर्गीय वासाने सारा आसमंत दरवळून गेला. हा वास माझ्या खूप लहानपणापासून परिचयाचा आहे. लहानपणी गावात रहात असताना आईबरोबर मंडईत गेल्यावर हा वास अवश्य येत असे. पण त्याकाळी बाहेरचे खाणे हे बऱ्यापैकी निषिध्द असल्यामुळे त्या वासाशी निगडीत असलेला स्वाद चाखायला मिळाला नव्हता.  बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधे गेल्यानंतर त्या स्वादाशीही संबंध  आला.  इतका आला की नंतर नंतर नुसत्या वासावरून, सोडलेला घाणा हा भज्यांचा आहे का वड्यांचा, हेही ओळखता येऊ लागले. पण आजही तो वास आला की मला लहानपणी आईचे बोट धरून मंडईत गेल्याची आठवण येतेच.

कुठल्या गोष्टीमुळे मन भूतकाळात खेचले जाईल त्याचा नेम नाही. एखादी वस्तू, व्यक्ती, गाणं, आवाज आणि अर्थातच वास. हे सगळे कधी ना कधीतरी घडलेल्या घटनांचे, प्रसंगांचे भागीदार, साक्षीदार असतात. आयुष्याच्या पुढल्या टप्प्यांवर अचानक भेटतात व आपल्याला पुन्हा मागे ओढून नेतात.

मला काही वेळा तर असे वाटते की ज्ञानेश्वरांच्या सुद्धा अशा काही वासांशी जुळलेल्या आठवणी असणार. उगाच नाही त्यांनी 'अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू' म्हणलंय.

आपल्या सर्वांच्या लहानपणाशी जुळलेला एक कॉमन वास म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होतानाच्या दिवसात येणारा नव्याकोऱ्या वह्यापुस्तकांचा वास. मलाच काय, प्रत्येकालाच तो विशिष्ट खळीचा वास, शालेय दिवसात ओढून नेतो.

असाच एका विशिष्ट उदबत्तीचा वास मला आजोळी घेऊन जातो. माझ्या आजोबांना पूजेसाठी तीच उदबत्ती लागायची. आमचे आजोबा सकाळी स्नानानंतर बराच वेळ पूजा करीत. त्यांची पूजा होऊन नैवेद्य दाखवल्याशिवाय आजी जेवायला वाढत नसे. आम्हा सगळ्यांना सकाळपासून खेळल्यामुळे भूक लागलेली असायची. त्यामुळे आमचे लक्ष ह्या वासाकडे असायचे. उदबत्तीचा तो वास आला की आम्ही ओळखायचो की आता लगेच नैवेद्य आणि पुढे पाच मिनिटात जेवायला वाढणार. आजही त्या उदबत्तीच्या वासाने मी मे महिन्यातल्या, आजोळच्या गावातल्या, साडेबारा पाऊणच्या माहौल मधे जातो.

थंडीच्या दिवसात, शनिवारी सकाळची शाळा म्हणजे एक संकट असायचं. भल्या सकाळी साखरझोपेतून जागे होऊन, तसल्या थंडीत आंघोळ करून, शाळेत जायला जिवावर यायचं. मग जाताजाता कुठे एखादी शेकोटी पेटवली असेल तर दोन मिनिटं तिथे हातपाय शेकून पुढं जायचं. अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची कामं चालू असत. ते कामगार डांबर गोठू नये म्हणून त्या पातळ डांबराच्या बॉयलरखाली रात्रभर निखारा पेटता ठेवत. मग आम्ही त्या बॉयलरपाशीसुद्धा एखादा हॉल्ट अवश्य घेत असू. त्या लाकडांच्या निखाऱ्याचा आणि त्या डांबराचा एकत्रित वास असा काही  नाकात बसलाय की कधीही तो वास आला की मला थंडीतल्या शनिवारची शाळा आठवते.

असे अनेक वास, अत्तराचे, धुपाचे, वाटणाचे, तळणाचे, कुटण्याचे, दळण्याचे, सालींचे, गवताचे, मातीचे, झाडांच्या पाल्याचे, शेणाचे, कोळशाचे, चुलीचे, इस्त्रीचे, बसच्या धुराचे,  आणि कसलेकसले वास, कुठल्या ना कुठल्या आठवणी जाग्या करतातच.

मात्र या सगळ्यात प्राजक्ताच्या फुलांचा वास व त्याला जोडून येणारी एका छोट्या मुलीची आठवण 'जरा हटकें' आहे. लहानपणी गावात, श्रावणातल्या एका पावसाळी सकाळी, माझ्या आजीने, पलीकडच्या बर्वे वाड्यातून प्राजक्ताची फुलं आणायला पाठवलं. बर्वेआजी तशा अतिशय खाष्ट होत्या. एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्या राहायच्या. पोराटोरांना त्यांच्या बागेत प्रवेश नसे. पण माझ्या आजीची मैत्रीण असल्यामुळे मी कधीही त्यांच्या बागेत घुसू शकत असे. तर बागेत पोचून मी झाडाखाली किती फुलं पडलीत त्याचा अंदाज घेतला व वेचायला सुरुवात केली. हलकासा पाऊस पडून गेला होता. प्राजक्ताच्या त्या फुलांचा मस्त वास सुटला होता. तेव्हढ्यात कुणीतरी झाड हलवलं. पाण्याचे थेंब अचानक अंगावर पडले. मी शहारून वर पाहीले. एका माझ्याच वयाच्या मुलीने झाड हलवलं होतं. घारी, गोरी, 'बर्वे' आडनावाला शोभणारी, बर्वेआजींची कोणी नात होती ती.

'भरपूर फुलं घे की. चल, मी मदत करते...... '

भराभरा तिनं फुलं वेचली. तोंडानी नॉनस्टॉप बोलत होती. माझ्या हातातली दुरडी भरल्यावरच ती थांबली. मी घरी परत आलो.

आजतागायत ती मला परत दिसली नाहीये. पण कधीही, कुठेही, प्राजक्ताच्या फुलांचा वास मला, तो श्रावण, ते अचानक अंगावर पडलेले पाण्याचे थेंब व त्या छोट्या मुलीची आठवण देऊन जातोच.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत