मुख्य सामग्रीवर वगळा

डोळा - एक वापरणे

गेले दोन दिवस, युवराजांनी महाराजांना दिलेली झप्पी व त्यानंतर केलेली जादुई नेत्रपल्लवी याची सर्वच माध्यमातून चर्चा होत आहे. काही प्रमाणात चेष्टा, टवाळी होतेय तर काही जण ही कृती कशी 'डिप्लोमॅटिक' आहे हे पटवून देत आहेत. काही जण इंग्लिश मराठी शब्द एकत्र जोडून युवराजांवर वार करत आहेत, तर काही जण व्यंगचित्रांद्वारे महाराजांवर शरसंधान करत आहेत. असो. आजच्या ह्या ब्लॉगचा विषय हा नाहीये. त्यानिमित्ताने  विचार करत असता विविध कारणांकरता होणारा डोळ्यांचा वापर  लक्षात येऊ लागला. इथे मुद्दा, डोळयांमधून सहजपणे व्यक्त होणारे भाव हा नसून डोळ्यांचा मुद्दाम होणारा वापर, असा आहे. 

लहानपणची पहिली आठवण आहे ती प्राथमिक शाळेतल्या बाईंची. मुलं दंगा करू लागल्यावर त्यावर मोठा आवाज काढून त्या वर्गाला गप्प करत. मात्र त्यांच्या आवाजापेक्षा आम्हाला धाक होता तो त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांचा. नंतर अनेकांना डोळे वटारताना मी पाहीले आहे. मात्र आमच्या त्या बाईंच्या डोळे वटारण्याची सर कुणालाही नाही.

मे महिन्याच्या सुट्टीत डोळ्यांचा जेव्हढा वापर झाला तेव्हढा परत कधीही झाला नसेल. लॅडीस खेळताना आपल्या पार्टनर कडे कोणती पाने आहेत किंवा उतारी काय करायची यासंबंधीच्या खाणाखुणा केवळ डोळ्यांनीच चालत. कधीकधी एखादा इशारा कळत नसे व त्यामुळे चुकीची उतारी होई. अथवा विरोधी पक्षाला त्या खुणा नीटच कळत. त्यावरून मग भांडणं होत. मग यावर उपाय म्हणून खेळ सुरु होण्याआधीच इशारे ठरवून घेतले जात. 

एखाद्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याला 'डोळ्यात तेल घालणे' का म्हणतात ह्याचा मात्र मला कधीच उलगडा झालेला नाहीये. डोळ्यात काजळ अथवा सुरमा घातलेला पाहिलाय. पण डोळ्यात तेल घालून आलेला कोणीही इसम मी अद्याप पाहिलेला नाही. असाच एक न कळलेला दुसरा शब्दप्रयोग म्हणजे 'डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार होता'. आता डोळ्यात बोट घातल्यावर अंधारात दिसू लागतं हे कसं खरं मानायचं? अहो, इथे दिवसाढवळ्या चुकून डोळ्यात बोट गेलं तर पाच मिनिटं डोळ्यासमोर अंधारी येते. 

त्यामानाने 'डोळा मारणे' या वापराशी संबंध जरा उशिराच आला. मुळात या पद्धतीचा संबंध हा चावटपणाशी जास्त आहे. 'केला इशारा जाता जाता' किंवा 'आंधळा मारतो डोळा' अशा शब्दप्रयोगातून डोळ्याचा मारण्यासाठी होणार वापर अधोरेखित होतो. त्यामुळे डोळा मारणारा किंवा मारणारी जरा 'तसलाच' किंवा 'तसलीच' आहे असे मानले जाते. एखाद्या गोष्टीचा सिरियसनेस घालवण्याकरता साधारणपणे डोळा मारला जातो. अचानक डोळा मिटला गेल्यामुळे अर्थाचा अनर्थ कसा होतो हे सांगणारी एक कविता, अभिनेते कै. यशवंत दत्त अतिशय बहारदारपणे सादर करत असत.  

तर हे झाले डोळ्याच्या वापरासंबंधी थोडेसे. मात्र युवराजांच्या नेत्रपल्लवीतून काय अर्थ निघतोय व त्यामुळे पुढील काळात काय अनर्थ होतोय याकडे आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार हे मात्र निश्चित.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून