मुख्य सामग्रीवर वगळा

डोळा - एक वापरणे

गेले दोन दिवस, युवराजांनी महाराजांना दिलेली झप्पी व त्यानंतर केलेली जादुई नेत्रपल्लवी याची सर्वच माध्यमातून चर्चा होत आहे. काही प्रमाणात चेष्टा, टवाळी होतेय तर काही जण ही कृती कशी 'डिप्लोमॅटिक' आहे हे पटवून देत आहेत. काही जण इंग्लिश मराठी शब्द एकत्र जोडून युवराजांवर वार करत आहेत, तर काही जण व्यंगचित्रांद्वारे महाराजांवर शरसंधान करत आहेत. असो. आजच्या ह्या ब्लॉगचा विषय हा नाहीये. त्यानिमित्ताने  विचार करत असता विविध कारणांकरता होणारा डोळ्यांचा वापर  लक्षात येऊ लागला. इथे मुद्दा, डोळयांमधून सहजपणे व्यक्त होणारे भाव हा नसून डोळ्यांचा मुद्दाम होणारा वापर, असा आहे. 

लहानपणची पहिली आठवण आहे ती प्राथमिक शाळेतल्या बाईंची. मुलं दंगा करू लागल्यावर त्यावर मोठा आवाज काढून त्या वर्गाला गप्प करत. मात्र त्यांच्या आवाजापेक्षा आम्हाला धाक होता तो त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांचा. नंतर अनेकांना डोळे वटारताना मी पाहीले आहे. मात्र आमच्या त्या बाईंच्या डोळे वटारण्याची सर कुणालाही नाही.

मे महिन्याच्या सुट्टीत डोळ्यांचा जेव्हढा वापर झाला तेव्हढा परत कधीही झाला नसेल. लॅडीस खेळताना आपल्या पार्टनर कडे कोणती पाने आहेत किंवा उतारी काय करायची यासंबंधीच्या खाणाखुणा केवळ डोळ्यांनीच चालत. कधीकधी एखादा इशारा कळत नसे व त्यामुळे चुकीची उतारी होई. अथवा विरोधी पक्षाला त्या खुणा नीटच कळत. त्यावरून मग भांडणं होत. मग यावर उपाय म्हणून खेळ सुरु होण्याआधीच इशारे ठरवून घेतले जात. 

एखाद्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याला 'डोळ्यात तेल घालणे' का म्हणतात ह्याचा मात्र मला कधीच उलगडा झालेला नाहीये. डोळ्यात काजळ अथवा सुरमा घातलेला पाहिलाय. पण डोळ्यात तेल घालून आलेला कोणीही इसम मी अद्याप पाहिलेला नाही. असाच एक न कळलेला दुसरा शब्दप्रयोग म्हणजे 'डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार होता'. आता डोळ्यात बोट घातल्यावर अंधारात दिसू लागतं हे कसं खरं मानायचं? अहो, इथे दिवसाढवळ्या चुकून डोळ्यात बोट गेलं तर पाच मिनिटं डोळ्यासमोर अंधारी येते. 

त्यामानाने 'डोळा मारणे' या वापराशी संबंध जरा उशिराच आला. मुळात या पद्धतीचा संबंध हा चावटपणाशी जास्त आहे. 'केला इशारा जाता जाता' किंवा 'आंधळा मारतो डोळा' अशा शब्दप्रयोगातून डोळ्याचा मारण्यासाठी होणार वापर अधोरेखित होतो. त्यामुळे डोळा मारणारा किंवा मारणारी जरा 'तसलाच' किंवा 'तसलीच' आहे असे मानले जाते. एखाद्या गोष्टीचा सिरियसनेस घालवण्याकरता साधारणपणे डोळा मारला जातो. अचानक डोळा मिटला गेल्यामुळे अर्थाचा अनर्थ कसा होतो हे सांगणारी एक कविता, अभिनेते कै. यशवंत दत्त अतिशय बहारदारपणे सादर करत असत.  

तर हे झाले डोळ्याच्या वापरासंबंधी थोडेसे. मात्र युवराजांच्या नेत्रपल्लवीतून काय अर्थ निघतोय व त्यामुळे पुढील काळात काय अनर्थ होतोय याकडे आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार हे मात्र निश्चित.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत