मुख्य सामग्रीवर वगळा

दोन झेन कथा

गेल्या दोन - चार दिवसात काही कारणांनी झेन बुद्धपंथातल्या दोन गोष्टी वाचनात आल्या. या पंथातल्या गोष्टी तशा छोट्याशाच असतात, पण खूप काही शिकवणाऱ्या असतात.  मला आवडलेल्या दोन गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय. तुम्ही कदाचित आधीच वाचल्या असतील.

१. 
प्रचंड थंडी पडली होती. एक भिक्षू झोपडीच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. समोरून एक वाटसरू चालत चालला होता. शेकोटी पेटलीय पाहून थोडा वेळ शेकायच्या इराद्याने तिथे येऊन बसला. काही वेळाने त्याने पाहिले की शेकोटीत लाकूड म्हणून जे घातले होते, ती एक बुद्धाची मूर्ती होती. वाटसरू भडकलाच. तो त्या भिक्षूवर ओरडला,

"अरे पाप्या, हे काय करतोयस?"

"लाकडातून बुद्धाला मुक्त करतोय." भिक्षू शांतपणे म्हणाला.

"अरे मूर्खा, बुद्ध काय असा लाकडात असतो का?"

"नाही ना? मग ते लाकूड जाळण्यात पाप कसलं?"

२.
एक माणूस आपल्या मुलाला शिकण्यासाठी बुद्ध मठात पाठवायचं ठरवतो व त्याला घेऊन मठात येतो. हा मठ व त्यातील गुरु खूप नावाजलेले होते. मठात आल्यावर बघतो तर काय? सगळे शिष्य आपापली कामं किंवा अभ्यास करत होते. गुरुंचेही काही स्वतःचे वाचन चालू होते. त्या माणसाची अपेक्षा होती की वर्ग चालू असतील, गुरु काही शिकवत असतील. इथे काहीतरी वेगळेच दिसत होते. शिष्यांनी जर सगळं स्वतःहूनच करायचं असेल तर ह्या गुरुचं इथे काय काम? असा त्याला प्रश्न पडला. नाराज होऊन तो परत जायला निघाला. गुरूंच्या ते लक्षात आले. त्यांनी त्या माणसाला थांबवलं व बाहेर बागेत घेऊन आले.

त्यांनी एका तरुण, उत्साही शिष्याला बोलावलं व समोरच्या उंच, सरळसोट झाडावर न थांबता चढून, उतरायला सांगितलं. कुणा पाहुण्यांसमोर गुरूंनी काही करायला सांगितलंय म्हणल्यावर तो शिष्य चपळाईने सरासरा चढून गेला व तितक्याच चपळाईने उतरू लागला. त्या माणसाचा जीव वरखाली होत होता. पण गुरु मात्र शांत होते. शिष्य शेवटच्या फांदीपर्यंत पोचला आणि आता खाली उडी मारणार, तितक्यात गुरु म्हणाले, थांब, जरा खाली बघ आणि मग उडी मार. शिष्याने थांबून पाहीले तर एक काटेरी फांदी पडली होती. फांदी दिसल्यावर त्याने जपून थोडी पलीकडे उडी मारली. गुरूंनी त्याची पाठ थोपटली व त्याला जायला सांगितले.

त्या माणसाकडे वळून त्यांनी विचारलं, आमचं काम काय आहे ते लक्षात आलं ना...?


मला वाटतं ह्या दोन गोष्टींवर बाकी काहीही भाष्य करायची आवश्यकता नाहीये.



© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत