मुख्य सामग्रीवर वगळा

श्रेय का हो देईना....

 सध्याच्या काळात व्हॉट्स ऍप्प हा आपल्या दिवसाचा एक अविभाज्य घटक बनला आहे, यात वाद नाही. हे असं असणं चांगलं का वाईट हा माझा मुद्दा नाहीये. मला आज एक वेगळाच विचार मांडायचा आहे. दिवसभरात आपल्याला अनेक सुंदर, सुंदर कविता, लेख, फोटो, चित्र येत असतात. काही वेळा त्या कवीचे, लेखकाचे वा चित्रकाराचे नाव खाली लिहीलेले असते, पण बहुधा नसते. बहुतांशी हे सर्व मेसेज आपल्या परिचितांनी फॉरवर्ड केलेले असतात. आपल्या ह्या परिचितांनासुद्धा ते कुणीतरी फॉर्वर्डच केलेले असतात. बरं हल्ली व्हॉट्स ऍप्पवाल्यांनी सुधारणा केल्यामुळे असला मेसेज हा फॉरवर्ड केलेला आहे, हे ही लगेच कळू शकते. पण कुठेतरी, कुणीतरी एक पहिला असणारच. अनेकवेळा जेंव्हा अशा मेसेजेसच्या खाली मूळ निर्मात्याचे नाव नसते, त्यावेळी ह्या पहिल्यांदा फॉरवर्ड करणाऱ्याला शोधून, खडसावून विचारावेसे वाटते की मूळ निर्मात्याला श्रेय न देण्यामागचा तुझा हेतू तरी काय? कारण जो पहिल्यांदा फॉरवर्ड करत असेल, त्याचा मेसेज 'फॉर्वर्डेड' नसणार. तो जणू काही त्याचा स्वतःचाच असणार.

माझा रत्नागिरीला राहणारा एक मित्र असेच काही छान छान लिहीतो व फेसबुक अथवा व्हॉट्स ऍप्पवर, स्वतःच्या नावाने, प्रसिद्ध करतो. किमान ९०% वेळा त्याचे स्वतःचेच लेख त्याला फॉरवर्ड म्हणून येतात, अर्थातच त्याचे नाव गाळून.

एखाद्या व्यक्तीला, तिने निर्मिलेल्या एखाद्या कलाकृतीचे श्रेय द्यायला इतकी जीभ जड होते? का नाव टाईप करताना हाताला कंप सुटतो? सरळ नाव गाळून टाकता? असं तर नाही ना की ती कलाकृती स्वतःच्या नावावर खपवायची आहे? तसे असेल तर खुशाल स्वतःचे नाव टाकायची हिम्मत तरी दाखवा ना. पण तेव्हढेही धारिष्ट्य नसते, कारण जगाला फसवलं तरी मनाला कसं फसवणार?

आपल्यापैकी अनेकांकडे खूप काही दडलेले टॅलेंट असते. काही ना काही कारणाने त्यांना हे टॅलेंट जगापुढे आणणे शक्य झालेले नसते. आज ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे असे अनेक दडलेले टॅलेंट आपल्यापुढे येत आहे. जरा दोन कौतुकाचे शब्द बोलून, त्या व्यक्तीच्या नावासकट पुढे फॉरवर्ड केलेत तर काय 'नरकात जाऊ' असं वाटतंय का?

काल परवा माझ्या वेगवेगळ्या ग्रूपवरच्या मित्रांनी दोन वेगवेगळ्या कविता फॉरवर्ड केल्या आहेत. मला खूप आवडल्या. अर्थातच खाली कवीचे नाव नाहीये. माझ्या मित्रांनाही ते नाव माहीत नाहीये. इथे खाली मी त्या कविता मुद्दाम देतोय. ह्या दोन्ही कविता माझ्या नाहीत. एक कणभरसुद्धा त्याचे श्रेय मला नकोय. कृपया कुणाला मूळ कवीचे नाव माहीत असेल तर मला कळवायची तसदी घ्या. आणि ह्यापुढे जेंव्हा कधी एखादी चांगली कलाकृती फॉरवर्ड कराल तेंव्हा मूळ निर्मात्याला त्याचे श्रेय द्यायला विसरू नका, ही कळकळीची विनंती.... 

पहिली कविता:

आज का असे वाटते जातीचा रंग सच्चा आहे
आयुष्यातल्या मैत्रीचा धागा मात्र कच्चा आहे

मुंजीला जेवलो तो बर्व्या आज ब्राम्हण आहे
भंडारा लावून जेजुरी चढलो तो सुर्व्या मराठा आहे
कांबळ्याने सोललेला ऊस खाल्ला तो दलित आहे
खरंच का हेच आमच्या मैत्रीचे फलित आहे

लहानपणी खेळताना कधीच नव्हते कळले
कोणालाही लागले तरीही थुंकी लावून चोळले
चिखल असो वा माती नखशिखांत अंगभर लोळले
मैत्रीचे सारे नियम बिनदिक्कतपणे पाळले

बर्व्याचे बाबा गंभीर असताना रक्तदान केले
सुर्व्याने दिलेल्या रक्ताने बर्व्याचे बाबा वाचले
कांबळ्याने आणलेल्या औषधाचे पैसे कुणी दिले
त्यावेळी हे हिशोब कुणीच नाही मागितले

बाबा वाचले म्हणून बर्व्याने देवाला पेढे ठेवले
पण पहिले दोन पेढे मैत्रीच्या देवांना दिले
अश्रु भरल्या डोळ्यांनी छातीशी कवटाळले
एका बापामुळे तिघे पोरके होताना वाचले

सुर्व्याच्या बाबांचे कलेवर सीमेवरून आले
शत्रूच्या गोळ्यांनी शरीर पिंजून सारे गेले
जातीचे प्रमाणपत्र गोळ्यांनी नाही पाहिले
खांद्यावर घेताना तिघे हमसाहमशी रडले

अशा ह्या मैत्रीला ग्रहण कशामुळे लागले 
खट्याळपणा कुणाचा अन् सारे रान पेटले
इतिहासातल्या घटनांवरून राजकारण तापले
जिवाभावाच्या मित्रांचे चेहरे कावरेबावरे झाले....

दुसरी कविता:

मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"🙁

मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"☹

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मी "अहिल्या देवींवर" कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का?"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही.....🤔

वाट पाहतोय.......🙄
"ती" माणसे गेली कुठे...

माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त जात जिवंत ठेवली आहे..... 

ह्या कवितांच्या अर्थावर चर्चा तर होईलच, व्हायलाही हवी, पण त्यासोबत आजच्या ह्या ब्लॉगच्या मूळ उद्देशावर मत व्यक्त झाल्यास, ब्लॉगचा हेतू थोडाफार सफल होईल. 


© chamanchidi.blogspot.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...