मुख्य सामग्रीवर वगळा

व्रतवैकल्ये : एक विपर्यास

गेले काही दिवस जाता येता विविध हॉटेल्स (विशेषतः मांसाहारी) व धाब्यांच्या 'आखाड पार्टी' संबंधी मोठमोठ्या जाहिराती नजरेस पडत होत्या. कारण स्वच्छ होतं. पुढील काही दिवसात श्रावण महिना सुरु होणार होता. श्रावणात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असल्यामुळे आत्ताच काय तो कोटा भरून घ्या, नंतर महिनाभर काहीही मिळणार नाहीये, या भावनेने मांसाहारप्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने ह्या आखाड पार्ट्यांचा आनंद लुटला. शाकाहारी मंडळी अर्थातच सर्व कोनांमधून नाकं मुरडून घेतली. त्यावर सोशल मीडियावर अनेक विनोद, चुटकुले व व्यंगचित्रे पसरली. आषाढाच्या शेवटच्या दिवसाला 'दिव्याची अमावस्या' म्हणावे का 'गटारी' म्हणावे यावर अनेक भावनाभरीत वादंग झडले. ज्यानं त्यानं आपल्याला हवं तेच केलं व अखेर श्रावण सुरु झाला.

ह्या सगळ्या भानगडीत होतंय काय की ह्या व्रतवैकल्यांमागे जी काही शास्त्रीय कारणे आहेत त्याचा शोधच घेतला जात नाही. कारण ही व्रतवैकल्ये पाळणारी जी कर्मठ मंडळी आहेत ती केवळ 'बाबा वाक्यम प्रमाणं' या पद्धतीने त्याचं पालन करत आहेत तर बुद्धीप्रामाण्यवादी त्याचा शोध घेण्याऐवजी केवळ विरोध म्हणून न पाळण्याचा हटवादीपणा करत आहेत.

'देव दानवा नरे निर्मिले' हे संतवचन योग्य मानायचे, तर एक विचार असा मनात येतो की मग आपल्या पूर्वजांनी ही व्रतवैकल्ये का तयार केली असतील? ह्यासाठी मी काही अशा व्रतांचा शास्त्रीय संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला. मी काही शास्त्र शाखेचा विद्यार्थी नाही. त्यामुळे माझी ही मते बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. पण त्यानिमित्ताने त्यामागील शास्त्रीय कारणांचा अभ्यास होऊन ती लोकांपुढे यावीत एव्हढाच एक हेतू आहे.

लहानपणी आमच्या बालमैत्रिणी श्रावणात दर सोमवारी पत्री गोळा करत. ही पत्री म्हणे कुमारिकांनीच गोळा करायची. हे आपल्या गावातल्या सगळ्या पोरी सकाळी सकाळी गावाबाहेर जाऊन, बकऱ्या चरल्यागत, दिसेल त्या झाडाझुडुपांची पानं ओरबाडून आणायच्या. पुजारी वा भिक्षुक मंडळी 'हल्ली पत्री पूर्वीसारखी मिळत नाही' म्हणत, हाताशी येतील ती पानं पूजेला वापरत व (यजमानाच्या तोंडाला पानं पुसून), दक्षिणेची सोय करून घेत. माझ्या मते याला खूप चांगली शास्त्रीय परंपरा असावी. पूर्वी गावात डॉक्टर्स नसत. लहानमोठ्या दुखण्यावर 'आजीबाईचा बटवा' हा एकच आधार असे. ह्या बटव्यात अनेक औषधी वनस्पती असत. ह्या सगळ्यांची लहानपणापासून नीट माहीती व्हावी म्हणून ह्या 'आजीबाई'ना, 'कुमारिका' असल्यापासून पत्री गोळा करायला गावाबाहेर पाठवत असावेत. श्रावणात अथवा नंतर गणपतीला वाहील्या जाणाऱ्या प्रत्येक वनस्पतीचा औषधी उपयोग आहे. पुढल्या महिन्यात गणपती बसतील, तेंव्हा हवं तर तपासून बघा.

श्रावणात, म्हणजेच पावसाळ्यात, मांसाहार वर्ज्य असण्याचेही कारण आहे. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी होते. (हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे). त्यामुळे पचण्यासाठी थोडे कठीण असणारे पदार्थ वर्ज्य मानले आहेत. ह्या यादीत वांगं, कांदा वगैरे शाकाहारी सदस्य पण आहेत. पण याचा विचार न करता, धर्ममार्तंड तावातावाने फक्त मांसाहारावर वाद घालतात व बुद्धीमार्तंड मुद्दाम श्रावणात त्यावर ताव मारतात.

नुकतेच खंडग्रास ग्रहण होऊन गेले. ग्रहणात काही खाऊ नये, अन्न उरल्यास ते टाकून द्यावे, घराबाहेर पडू नये इ. अनेक कर्मकांडांचा मारा झाला. खरं कारण असं असणार की पूर्वीच्या काळी वीज किंवा बॅटरी वगैरे नव्हत्या. अचानक अंधार झाल्यामुळे प्राणी, कीटक बाहेर पडत. असे कीटक अन्नात पडण्याची शक्यता होती. म्हणून अन्न झाकून ठेवायचे व शक्यतो खायचे टाळायचे. बाहेर फिरताना साप किरडू किंवा विंचू काटा डसण्याची शक्यता होती, म्हणून घरात बसायचे. शाळेत असताना अशाच एका खग्रास ग्रहणाचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली होती. सूर्य पूर्ण झाकला गेल्यानंतर प्राणी, पक्षी व कीटक, किती विचित्र (weird) वागतात हे मी स्वतः अनुभवले आहे.

मला सदैव प्रश्न पडे की मग आपल्या पूर्वजांनी ही अशी व्रतवैकल्ये का काढली असतील. मध्यंतरी आलेला, परेश रावळ, मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव व अक्षयकुमार यांचा अप्रतिम अभिनय असलेला चित्रपट 'ओ एम जी' पाहताना मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. एका प्रसंगात एक स्वामी (मिथुन चक्रवर्ती) नायकाला (परेश रावळ) म्हणतो की we are not God loving people, we are God fearing people. आपल्या पूर्वजांना हे नक्कीच माहित होते. प्रत्येक अशा नियमाचे कारण प्रत्येक व्यक्तीला समजवून सांगणे केवळ अशक्य आहे. विशेषतः त्या काळी जेंव्हा शिक्षण व संपर्क साधने यांचा अभाव असल्यामुळे, प्रत्येकाला समजावत बसण्यापेक्षा, अशा प्रत्येक नियमाची गाठ, एखाद्या व्रताशी घालून दिली असावी. अमुक एक करा, स्वर्ग मिळेल. तमुक एक करू नका, केल्यास नरकात जाल. अशा स्वरूपाच्या आदेशांद्वारे ह्या नियमाचे पालन होण्याची एक सिस्टिम निर्माण झाली असावी. पुढल्या हजारो वर्षांत हरदास व भिक्षुक मंडळींनी त्यानिमित्ताने आपापल्या मम्मं ची सोय करून घेतली.

ह्या सगळ्याचा शास्त्रीय कार्यकारणभाव लोकांसमोर येणे आवश्यक आहे. तरच कर्मठ गटाकडून होणारा 'मी सांगतो म्हणून' होणारा विपर्यास व त्याला काउंटर करण्यासाठी 'तू सांगतोस ना, आता उलटच वागतो' असा बुद्धीवादी गटाकडून होणार विपर्यास, याला आळा बसून, मनुष्याकरिता योग्य अशा काही जीवनशैलीप्रमाणे आपण सर्व, समजून उमजून, वागू शकू.

                                                                                                                                                                  © chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

  1. विचार पटणारे आहेत. बरेच बुद्धिप्रामाण्यवादी,उदा. मी गेल्या 4 वर्षा पासून मला पटले तरच खरे असे वागत आहे. त्यामुळे कारणमीमांसा माहीत न होता भीती पोटी काहीं करत नाही. मुद्दाम भावनांचा अनादर करण्याचे टाळतो. तेव्हा सर्व बुद्धिप्रामाण्यवादी हटवादी असतात असे नव्हे. आपल्या लेखात तसा उल्लेख नाही. लेख व्यवस्थित समतोल साधणारा आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...