मुख्य सामग्रीवर वगळा

बापू

बापू.....
नक्की कोण होता हे मला आजतागायत माहिती नाहीये. पण बहुधा शेतकरी असावा.  माझ्या आजोळी,  बहुतेक सगळे शेतकरीच होते. त्यामुळे बापूसुद्धा अर्थातच शेतकरी असणार, असा मी अंदाज बांधलाय. मातकट रंगाचं धोतर, तशाच रंगाचा शर्ट व गांधी टोपी, पायात जाड पायताण असा त्याचा वेष असे. मध्यम उंची, किरकोळ अंग, तोंडातले निम्मे दात गायब असा त्याचा अवतार होता. हसला की तोंडाचं अर्ध बोळकं व उरलेले, तंबाकू खाऊन पिवळे झालेले, दात नीट दिसायचे. सुमारे पन्नाशीचा हा काळासावळा माणूस माझ्या आजोबांकडे कशासाठी येत असे हे मला कधीच कळलं नाही. आला की आधी माझ्या आजीकडे जायचा व हक्कानं चहा प्यायचा. कधी तिची काही छोटीमोठी कामं करायचा. मग आजोबांकडे जाऊन, त्यांच्या चांदीच्या डबीतला तंबाकू खायचा. बहुतेक वेळा शेतीसंबंधी काहीबाही बोलत बसायचा. क्वचित काही न बोलता, ओटीवर बसून आकाशाकडे बघत बसायचा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो की हा हमखास भेटायचा. मी, माझी आई, माझा धाकटा भाऊ, असे सगळे जणू त्याचेच पाहुणे असल्यासारखा आनंदून जायचा. माझा भाऊ मला दादा म्हणतो म्हणून बापू पण मला दादा म्हणायचा. कधी आम्हाला नदीवर फिरायला न्यायचा. माशाची छोटी पिल्लं ओंजळीत पकडायचा आणि पुन्हा पाण्यात सोडून द्यायचा. कधी आंबे, तुती, बोरं, कणसं असा रानमेवा घेऊन यायचा.

एकदा मी एकटाच आजोळी गेलो होतो. खरं तर तिकडे मित्रांची अख्खी गॅंग होती. पण त्यादिवशी मी एकटाच घरी होतो. जाम कंटाळा आला होता. नेमका बापू उगवला. माझा कंटाळा घालवायला धनुष्यबाण करायचा त्यानं घाट घातला. परसातला एक बांबू घेऊन त्यानं एक सुरेख धनुष्य व पाच सहा बाण मला बनवून दिले. एका झाडावर विटकरीच्या तुकड्याने एक गोल काढला व म्हणाला, मारा आता बाणावर बाण. मी खूष. पण नंतर मात्र मला काही ते धनुष्य घेऊन बाण मारता येईनात. कधी नुसतीच दोरी टंकारायची व बाण हातातच राहायचा, तर कधी तिसरीकडेच जाऊन पडायचा. जाम चिडचिड झाली होती. तेव्हढ्यात बापू बाहेर आला.

"बापू, हे तुझं धनुष्य अगदी बेकार आहे..." नेम न लागल्याचा राग मी बापूवर काढला.

"बापूनं बनवलेलं हत्यार कधी बेकार जात नसतंय..." असं म्हणून त्यानं ते धनुष्य घेतलं व सपासप चार बाण त्या गोलात मारून दाखवले. मग धनुष्य माझ्या हातात देऊन, नीट बाण कसा मारायचा तेही शिकवलं. दोन चार बाण मारेपर्यंत खरोखरच माझाही नेम नीट लागायला लागला.

"हत्यार चांगलं का वाईट ते धरणाऱ्या हातावर ठरतं, दादा. हात चांगला तर हत्यार बी चांगलं. आयुष्यात कदीबी हात पक्का ठेवा, हत्यार आपोआप कामाला लागंल..." असं म्हणून तो निघून गेला.

आज बापू नाही. त्यानं बनवलेले ते धनुष्यबाण कधीच हरवले. मीच आता बापूच्या वयाला आलोय. पण आजही अडचणीच्या प्रसंगी बापूचे शब्द आठवतात. "आयुष्यात कदीबी हात पक्का ठेवा, हत्यार आपोआप कामाला लागंल..."

कोण कुठला बापू, पण आयुष्यभराचा नेम पक्का करून गेला.....


© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून