मुख्य सामग्रीवर वगळा

बापू

बापू.....
नक्की कोण होता हे मला आजतागायत माहिती नाहीये. पण बहुधा शेतकरी असावा.  माझ्या आजोळी,  बहुतेक सगळे शेतकरीच होते. त्यामुळे बापूसुद्धा अर्थातच शेतकरी असणार, असा मी अंदाज बांधलाय. मातकट रंगाचं धोतर, तशाच रंगाचा शर्ट व गांधी टोपी, पायात जाड पायताण असा त्याचा वेष असे. मध्यम उंची, किरकोळ अंग, तोंडातले निम्मे दात गायब असा त्याचा अवतार होता. हसला की तोंडाचं अर्ध बोळकं व उरलेले, तंबाकू खाऊन पिवळे झालेले, दात नीट दिसायचे. सुमारे पन्नाशीचा हा काळासावळा माणूस माझ्या आजोबांकडे कशासाठी येत असे हे मला कधीच कळलं नाही. आला की आधी माझ्या आजीकडे जायचा व हक्कानं चहा प्यायचा. कधी तिची काही छोटीमोठी कामं करायचा. मग आजोबांकडे जाऊन, त्यांच्या चांदीच्या डबीतला तंबाकू खायचा. बहुतेक वेळा शेतीसंबंधी काहीबाही बोलत बसायचा. क्वचित काही न बोलता, ओटीवर बसून आकाशाकडे बघत बसायचा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो की हा हमखास भेटायचा. मी, माझी आई, माझा धाकटा भाऊ, असे सगळे जणू त्याचेच पाहुणे असल्यासारखा आनंदून जायचा. माझा भाऊ मला दादा म्हणतो म्हणून बापू पण मला दादा म्हणायचा. कधी आम्हाला नदीवर फिरायला न्यायचा. माशाची छोटी पिल्लं ओंजळीत पकडायचा आणि पुन्हा पाण्यात सोडून द्यायचा. कधी आंबे, तुती, बोरं, कणसं असा रानमेवा घेऊन यायचा.

एकदा मी एकटाच आजोळी गेलो होतो. खरं तर तिकडे मित्रांची अख्खी गॅंग होती. पण त्यादिवशी मी एकटाच घरी होतो. जाम कंटाळा आला होता. नेमका बापू उगवला. माझा कंटाळा घालवायला धनुष्यबाण करायचा त्यानं घाट घातला. परसातला एक बांबू घेऊन त्यानं एक सुरेख धनुष्य व पाच सहा बाण मला बनवून दिले. एका झाडावर विटकरीच्या तुकड्याने एक गोल काढला व म्हणाला, मारा आता बाणावर बाण. मी खूष. पण नंतर मात्र मला काही ते धनुष्य घेऊन बाण मारता येईनात. कधी नुसतीच दोरी टंकारायची व बाण हातातच राहायचा, तर कधी तिसरीकडेच जाऊन पडायचा. जाम चिडचिड झाली होती. तेव्हढ्यात बापू बाहेर आला.

"बापू, हे तुझं धनुष्य अगदी बेकार आहे..." नेम न लागल्याचा राग मी बापूवर काढला.

"बापूनं बनवलेलं हत्यार कधी बेकार जात नसतंय..." असं म्हणून त्यानं ते धनुष्य घेतलं व सपासप चार बाण त्या गोलात मारून दाखवले. मग धनुष्य माझ्या हातात देऊन, नीट बाण कसा मारायचा तेही शिकवलं. दोन चार बाण मारेपर्यंत खरोखरच माझाही नेम नीट लागायला लागला.

"हत्यार चांगलं का वाईट ते धरणाऱ्या हातावर ठरतं, दादा. हात चांगला तर हत्यार बी चांगलं. आयुष्यात कदीबी हात पक्का ठेवा, हत्यार आपोआप कामाला लागंल..." असं म्हणून तो निघून गेला.

आज बापू नाही. त्यानं बनवलेले ते धनुष्यबाण कधीच हरवले. मीच आता बापूच्या वयाला आलोय. पण आजही अडचणीच्या प्रसंगी बापूचे शब्द आठवतात. "आयुष्यात कदीबी हात पक्का ठेवा, हत्यार आपोआप कामाला लागंल..."

कोण कुठला बापू, पण आयुष्यभराचा नेम पक्का करून गेला.....


© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत