मुख्य सामग्रीवर वगळा

फ्रेंडशिप डे

कशासाठी असतो हो हा? मला आजतागायत कळलंच नाहीये की मित्र आणि मैत्री यासाठी एखादा विशिष्ट दिवस का पाहीजे.

शाळेत रोज पाच सात तास एकत्र घालवून नंतर पुन्हा संध्याकाळी दोन तास एकत्र खेळणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

मधल्या सुट्टीत एकमेकांचा डबा आनंदाने शेअर करणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

आठवडाभर एकत्र घालवून सुद्धा रविवारी एकमेकांशिवाय न करमणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

मित्र बाहेरच्या जगात कोणी का असेना, भेटल्यानंतर त्याला मूळ नावाने हाक मारून, त्याला जमिनीवर आणणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस? कितीही मोठे गॅझेटेड अधिकारी झालात तरी तुम्ही वामन्या आणि भद्र्याच, बोटीवर कॅप्टन असलास तरी तू लल्ल्याच, मोठ्या कंपनीचा सर्वोच्च अधिकारी असलास तरी तू विन्याच, कितीही मोठा आयएसओ ऑडिटर असलास तरी तू अवध्याच, सीए होऊन एखाद्या मोठ्या फर्मचा पार्टनर असलास तरी तू लिंब्याच, प्रसिद्ध डॉक्टर झालास तरी तू आमच्यासाठी डम्ब्याच.....

शाळा संपली, मार्ग बदलले, वर्षावर्षात गाठभेट पडत नाही, पण कधीही भेटलो तरी 'काय रे लिंब्या' म्हणणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

मैत्रिणीशी बोलत असताना, 'ए तुझा सासरा येतोय रे' असं म्हणून सावध करणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

स्वतः कॉमर्सला असला तरी इंजिनीरिंग करणाऱ्या मित्राबरोबर सबमिशनच्या वेळी जागत बसणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

पाय मोडलेल्या मित्राच्या घरी जाऊन, एक्झाम फॉर्मवर त्याची सही घेऊन, वेळच्यावेळी सबमिट करणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

वर्षातले नऊ दहा महिने बोटीवर असणाऱ्या मित्राच्या आईवडिलांची, स्वतःच्या आईवडिलांसारखी काळजी घेणाऱ्यासाठी फक्त एक दिवस?

परदेशात राहणाऱ्या मित्राची भारतातील सगळी कामं पदरमोड करून पूर्ण करणाऱ्या मित्रासाठी फक्त एक दिवस?

मित्राच्या आजारी बायकोवर उपचार होण्यासाठी वणवण फिरणाऱ्या, त्यासाठी जमेल तेव्हढे काँट्रीब्युशन काढणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

एव्हढं करूनही ती गेल्यानंतर, वैकुंठावर, जगातल्या सगळ्या भाषांमधल्या सगळ्या भावना व्यक्त करणारी, एक थाप पाठीवर टाकणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

आज इतके मोठे झाल्यानंतरसुद्धा शाळेत असल्यासारखे वागणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

अरे नाही रे नाही....

सगळं आयुष्य ज्या मित्रांवर अवलंबून आहे, त्यांच्यासाठी फक्त एक दिवसच काय, अख्ख आयुष्य कुर्बान आहे.



© chamanchidi.blogspot.com 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून